व्हिडिओ पाहण्यासाठी

खिन्‍न झालेल्यांना सांत्वन

खिन्‍न झालेल्यांना सांत्वन

खिन्‍न झालेल्यांना सांत्वन

“सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोमकरांस ८:२२) १,९०० वर्षांपूर्वी हे लिहीले तेव्हाही मानवी समस्या बिकट होत्या. खूपजन खिन्‍न होते. यास्तव, ख्रिश्‍चनांना आर्जविण्यात आले होतेः “जे अल्पधीराचे [निराश, न्यू.व.] आहेत त्यांना धीर द्या.”—१ थेस्सलनीकाकरांस ५:१४.

आज, मानवी त्रास अधिक प्रमाणात आहे, तसेच लोकांमध्ये इतकी खिन्‍नता पूर्वी कधीही नव्हती. पण यामुळे आम्हाला आश्‍चर्य वाटू द्यावे का? नाही, कारण पवित्र शास्त्र याला ‘शेवटला काळ’ अशी ओळख देते व यांची “कठीण दिवस” अशी माहिती देते. (२ तीमथ्य ३:१-५) येशू ख्रिस्ताने भाकित केले होते की शेवटल्या काळी, “राष्ट्रे घाबरी” होतील व “भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील.”—लूक २१:७-११, २५-२७; मत्तय २४:३-१४.

जेव्हा लोक अति चिंता, भय, दुःख किंवा इतर नकारात्मक भावनांचा अनुभव घेतात, तेव्हा वांरवार ते खिन्‍न होतात. या खिन्‍नतेचे कारण किंवा दुःखातिशयाचे कारण, कोणा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू, घटस्फोट, नोकरी गमावणे किंवा दीर्घ आजार असू शकते. अपात्रतेची भावना उत्पादित केल्याने, किंवा नेहमी अपयशाची जाणीव व स्वतःला कमी समजण्यामुळेही काहीजन खिन्‍न बनतात. दबावपूर्ण परिस्थितीमुळे कोणीही उध्वस्त होऊ शकतो, पण जेव्हा एखाद्या मनुष्यास आशाहीनतेची भावना व वाईट परिस्थितीतून सुटण्यासाठी कोणताही मार्ग मिळत नाही असे दिसते तेव्हा, त्याचा परिणाम तीव्र खिन्‍नतेत होतो.

प्राचीन काळातील लोकांतही अशाच भावना होत्या. ईयोबला देखील आजारपण व वैयक्‍तिक आपत्ती सहन कराव्या लागल्या. त्याला वाटले की देवाने त्याचा त्याग केला, त्यामुळे त्याला जीवनाचा तिटकारा आला. (ईयोब १०:१; २९:२, ४, ५) याकोब त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे इतका खिन्‍न झाला की सांत्वन तर त्याने धिक्कारलेच पण मरण्याची इच्छा व्यक्‍त केली. (उत्पत्ती ३७:३३-३५) गंभीर पातकामुळे अपराधाची जाणीव होऊन, दावीद राजाने असा विलाप केला कीः “दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो. माझे अंग बधीर झाले आहे.”—स्तोत्रसंहिता ३८:६, ८; २ करिंथकरांस ७:५, ६.

आज देखील, स्वतःवर अधिक ताण देण्यामुळे लोक खिन्‍न होतात, ते असा दररोजचा नित्यक्रम करु पाहतात जो त्यांच्या स्वतःच्या मानसिक, भावनिक व शारिरीक क्षमतेच्या पलिकडचा आहे. स्पष्टपणे दबाव, नकारात्मक विचार व भावना यांचा शरीरावर परिणाम होतो व मेंदूतील रासायनिक समतोलता बिघडल्यामुळे खिन्‍नता जाणवू लागते.—पडताळा नीतिसूत्रे १४:३०.

त्यांना आवश्‍यक असलेले साहाय्य

पहिल्या शतकातील फिलिप्पै येथील एक ख्रिश्‍चन, एपफ्रदीत हा देखील “तो आजारी आहे हे [मंडळीतील सदस्यांच्या] कानी आले असे समजल्यावरुन चिंताक्रांत झाला होता.” प्रेषित पौलासाठी मंडळीतील लोकांनी दिलेली काही साम्रगी घेऊन रोमला गेल्यावर एपफ्रदीत आजारी पडला त्यामुळे आपण त्यांना कमीपणा आणला व आपल्या कामात अपयशी ठरलो असे एपफ्रदीतला वाटले. (फिलिप्पैकरांस २:२५-२७; ४:१८) प्रेषित पौलाने त्याचे कसे साहाय्य केले?

पौलाने एपफ्रदीतला घरी पाठविले व त्याच्यासोबत फिलिप्पैकरातील मंडळीला एक पत्र दिले ज्यात म्हटले होते: “प्रभूच्या ठायी त्याचे [एपफ्रदीत] स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा.” (फिलिप्पैकरांस २:२८-३०) प्रेषित पौलाने त्याच्याविषयी इतक्या उबदारपणे बोलल्यामुळे आणि फिलिप्पैकरांनी त्याचे आपुलकीने व प्रेमळपणे स्वागत केल्यामुळे नक्कीच एपफ्रदीतला समाधान झाले असावे व निराशेतून मुक्‍त होण्यास साहाय्य मिळाले असावे.

‘जे अल्पधीराचे [निराशा, न्यू.व.] आहेत त्यांना धीर द्या.’ हा पवित्र शास्त्राचा सल्ला उत्तम आहे यात काही शंका नाही. “तुमची एक व्यक्‍ती या नात्याने इतर काळजी घेतात हे जाणणे आवश्‍यक आहे.” असे निराशेला सामोरी गेलेली स्त्री म्हणते. “‘तुम्ही बरे व्हाल हे मला माहीत आहे,’ असे म्हणणारे कोणीतरी असावयास हवे.”

खिन्‍न व्यक्‍तीने पुढे होऊन, विश्‍वास ठेवता येईल अशा समजूतदार व्यक्‍तीचा शोध घेतला पाहिजे. अशी व्यक्‍ती चांगली ऐकणारी व सहनशील असावयास हवी. त्याने किंवा तिने निराशीत व्यक्‍तीला ‘तुला असे वाटू देऊ नये,’ किंवा ‘हा चुकीचा दृष्टीकोन आहे.’ अशी भाषणबाजी करण्याचे व निर्णयात्मक बोलणे टाळले पाहिजे. खिन्‍न झालेल्या व्यक्‍तीच्या भावना नाजूक असतात आणि अशा टिकात्मक अभिप्रायांमुळे त्याला त्याच्या स्वतःबद्दल आणखीनच वाईट वाटायला लावेल.

खिन्‍न झालेल्या व्यक्‍तीत निरुपयोगीपणाची भावना येते. (योना ४:३) परंतु एखाद्या व्यक्‍तिने हे नेहमी लक्षात ठेवावे की देव एखाद्याला कसा गणतो त्यावरुन त्याची किंमत ठरते. येशू ख्रिस्ताला लोकांनी “तुच्छ” मानले होते, पण ह्‍यामुळे देवासमोर त्याची पात्रता बदलली नाही. (यशया ५३:३) देव जशी त्याच्या पुत्रावर प्रीती करतो, तशीच तो तुम्हावरही करतो, याची खात्री असू द्या.—योहान ३:१६.

येशूला खिन्‍न व्यक्‍तींचा कळवळा आला व त्याने त्यांना त्यांची योग्यता लक्षात आणून देण्याची मदत केली. (मत्तय ९:३६; ११:२८-३०; १४:१४) त्याने स्पष्ट केले की देव लहान चिमण्यांनाही मोलाचे मानतो. त्याने म्हटले, “त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही.” मग जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात अशा मानवांना तो अधिक मोलाचे मानणार नाही का! त्यांच्याबद्दल येशू म्हणतोः “फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसहि मोजलेले आहेत.”—लूक १२:६, ७.

हे खरे आहे, की अतिशय निराश झालेला, समस्या व अशक्‍तपणा यांनी पूर्ण ग्रासून गेलेल्या व्यक्‍तीला, देव त्याला खरेच महान लेखतो असा विश्‍वास ठेवणे कठीण वाटेल. त्याला असे वाटेल की देवाकडिल प्रीतीच्या व काळजीच्या पात्रतेचा तो नाही. देवाचे वचन याची जाणीव करुन देते की, “आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते.” मग हाच अंतिम निर्वाळा आहे का? नाही. ते तसे नाही. देव हे जाणतो की पापी मनुष्य नकारात्मक विचार करु शकतो व स्वतःचा धिक्कार देखील करील. यास्तव, त्याचे वचन त्यांना सांत्वन देतेः “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.”—१ योहान ३:१९, २०.

होय, आमचा स्वर्गीय पिता आमचे पाप व चुका यापेक्षा आणखी काही पाहतो. तो परिस्थितीचे गांभीर्य, आमचा जीवनक्रम, आमची प्रवृत्ती तसेच हेतू जाणतो. आम्हावर वारसाने पाप, आजारपण व मृत्यू आल्यामुळे खूप मर्यादा असल्याचे तो जाणतो. वस्तुतः आम्ही स्वतः त्रस्त व कष्टी होतो हे, आम्ही पाप करु इच्छित नाही व हाताबाहेर गेलेलो नाही याचाच पुरावा आहे. पवित्र शास्त्र सांगते की आम्ही आमच्या इच्छेविरुद्ध “व्यर्थतेच्या स्वाधीन” झालो आहोत. यास्तव, आमच्या दीन स्थितीबद्दल देवाला सहानुभूती आहे व आमचा अशक्‍तपणा तो दयाळूपणे लक्षात घेतो.—रोमकरास ५:१२; ८:२०.

“परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] दयाळू व कृपाळू आहे” याची आम्हाला खात्री दिली आहे. “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्या पासून दूर केले आहेत. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्रसंहिता १०३:८, १२, १४) खरेच, यहोवा हा “सर्व सांत्वनदाता देव, [असून] तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो.”— २ करिंथकरांस १:३, ४.

खिन्‍न झालेल्यांना आवश्‍यक असणारी मदत त्यांच्या दयाळू देवाजवळ जाण्याने व ‘आपला भार यहोवावर टाका.’ हे आमंत्रण स्वीकारल्याने मिळते. तो खरोखर “अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करितो.” (स्तोत्रसंहिता ५५:२२; यशया ५७:१५) यास्तव देवाचे वचन प्रार्थना करण्याचे उत्तेजन देते, व म्हणते: “त्याच्यावर [यहोवावर], तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) होय, प्रार्थना व विनंतीद्वारेच एखादी व्यक्‍ती देवाच्या नजीक येऊ शकते व “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती” हिचा आनंद लुटू शकते.—फिलिप्पैकरास ४:६, ७; स्तोत्रसंहिता १६:८, ९.

निराशेच्या मनोवृत्तीत बदल करण्यास जीवनाच्या पद्धतीत व्यवहार्य तडजोडी करणे हे देखील मदतीचे ठरते. शारिरीक व्यायाम, पौष्टिक आहार, ताजी हवा व पुरेपूर विश्रांती आणि दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमाणाबाहेर पाहण्याचे टाळणे यासर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जोमदारपणे चालावयास लावल्यामुळे एका स्त्रीने खिन्‍न झालेल्यांना मदत केली. खिन्‍न झालेल्या एका स्त्रीने जेव्हा म्हटलेः “मी फिरावयास जाणार नाही,” तेव्हा त्या स्त्रीने सौम्यतेने पण ठामपणे उत्तर दिलेः “होय, तुम्हाला जावे लागेल.” ती स्त्री कळवतेः ‘आम्ही चार मैल [६किलो मीटर] चाललो. आम्ही परत आलो तेव्हा, ती थकली होती पण तिला खूप बरे वाटत होते. जोराचा व्यायाम किती फायदेकारक आहे हे तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही.’

तथापि, काहीवेळेस सर्व प्रयत्न करून व वैद्यकिय उपचार घेऊनही खिन्‍नतेवर संपूर्ण मात करणे अशक्य होते. “मी हर तऱ्‍हेचे प्रयत्न करून पाहिले, पण खिन्‍नता तशीच राहिली,” असे एक मध्यमवयीन स्त्री म्हणते. आंधळा, बहिरा किंवा लंगडा यांना बरे करणे अशक्य आहे त्याप्रकारेच ह्‍याचेही आहे. तरीही, नियमितरित्या देवाच्या वचनाचे वाचन केल्याने खिन्‍न झालेल्यांना सांत्वन व आशा मिळू शकते, जी मानवी आजारातून कायमस्वरुपी आराम मिळण्याची आशा पुरविते.—रोमकरांस १२:१२; १५:४.

जेव्हा कोणीही परत खिन्‍न होणार नाही

शेवटल्या दिवसात भयानक गोष्टी पृथ्वीवर घडतील असे सांगताना, येशू पुढे म्हणतोः “ह्‍या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.” (लूक २१:२८) येशू येथे देवाच्या नीतीमान नवीन जगात बचावून जाण्याबद्दल बोलत होता, जेथे “सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळेल.—रोमकरांस ८: २१.

भूतकाळातील कोणत्याही गोष्टींच्या दबावापासून मानवजात मुक्‍त असल्याने, प्रत्येक दिवशी स्वच्छ मनाने उठून दिवसभराच्या हालचाली आवेशाने झटपट आवरण्यासाठी उठणे किती आरामदायक वाटेल! खिन्‍नतेच्या ढगाचा तेथे कोणालाही अडथळा नसणार. मानवजातीला देव “त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील;’ ह्‍यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या” या आशीर्वादाची खात्री असणार.—प्रकटीकरण २१:३, ४.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.