व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय सहा

मृत कोठे आहेत?

मृत कोठे आहेत?
  • आपण मरतो तेव्हा आपले काय होते?

  • आपण का मरतो?

  • मृत्यूबद्दलचे सत्य माहीत झाल्याने आपल्याला सांत्वन मिळेल का?

१-३. मृत्यूविषयी लोकांच्या मनात कोणकोणते प्रश्न येतात, आणि वेगवेगळे धर्म त्यांची उत्तरे कशी देतात?

हजारो वर्षांपासून लोकांच्या मनात हे प्रश्न आले आहेत. हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. आपण कोणीही असलो, किंवा कोठेही राहत असलो तरी, आपल्या प्रत्येकाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

मागील अध्यायात आपण येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानामुळे सार्वकालिक जीवनाचा मार्ग कसा खुला झाला ते पाहिले. आपण हेही पाहिले, की बायबल अशा काळाविषयी भाकीत करते जेव्हा “मरण” नसेल. (प्रकटीकरण २१:४) पण आता आपण सर्व मरतो. सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले: ‘आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते.’ (उपदेशक ९:५) आपण जास्तीतजास्त काळ जगण्याचा प्रयत्न करतो. तरीपण, आपल्या मनात हा प्रश्न येतो, की मेल्यावर आपले काय होते.

आपले प्रिय जन मरण पावतात तेव्हा आपण शोक करतो. आपल्या मनात कदाचित असे प्रश्न येतील: ‘आपले प्रिय जन कोठे गेलेत? ते कोठे यातना तर भोगत नसतील ना? ते आपल्यावर लक्ष ठेवतात का? आपण त्यांना मदत करू शकतो का? आपण त्यांना पुन्हा कधी पाहू शकू का?’ जगातील धर्म या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे देतात. काही धर्मांची अशी शिकवण आहे, की जर सत्कर्मे केलीत तर तुम्ही स्वर्गात जाल, पण जर दुष्कर्मे केलीत तर नरकात जळत राहाल. काही धर्म असे शिकवतात, की मेल्यानंतर लोक, आपल्या पूर्वजांबरोबर राहण्यासाठी परलोकात जातात. इतर काही धर्मांची अशी शिकवण आहे, की मृतजन पाताळात जातात, तेथे त्यांचा न्याय केला जातो आणि मग त्यांचा पुनर्जन्म होतो.

४. मृत्यूविषयी अनेक धर्मांत कोणती मूळ संकल्पना दिसून येते?

या सर्व धार्मिक शिकवणींमागे एक मूळ संकल्पना दिसून येते. ती अशी की, मृत्यूनंतर आपल्या शरीरातून एक भाग जिवंत राहतो. गतकाळातील आणि सध्याचे बहुतेक सर्वच धर्म असे शिकवतात, की खरे पाहता मेल्यावरही आपण एका अर्थाने सर्वकाळ जिवंत राहतो; जसे की आपली ऐकण्याची, पाहण्याची आणि विचार करण्याची क्षमता कायम राहते. पण हे कसे शक्य आहे? आपली इंद्रियशक्ती आणि आपले विचार हे सर्व आपल्या मेंदूच्या कार्यांशी जोडलेले असतात. मृत्यूच्या वेळी मेंदू कार्य करायचा थांबतो. यानंतर आपल्या आठवणी, भावना, इंद्रियशक्ती चमत्कारिकरीत्या स्वतंत्रपणे कार्य करीत नाहीत. मेंदूचा नाश झाल्यावर त्याही नाश पावतात.

आपण मरतो तेव्हा नेमके काय होते?

५, ६. मृतांच्या स्थितीविषयी बायबलची शिकवण काय आहे?

मृत्यूच्या वेळी काय घडते हे, मेंदूची निर्मिती करणाऱ्या यहोवा देवाकरता एक कोडे नाही. त्याला सत्य काय आहे ते माहीत आहे आणि त्याचे वचन बायबल यात त्याने मृतांच्या स्थितीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. बायबलची शिकवण अगदी स्पष्ट आहे: मनुष्य मरतो तेव्हा त्याचे अस्तित्व संपते. मृत्यू जीवनाच्या उलट आहे. मृत पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत किंवा विचार करू शकत नाहीत. मृत्यूनंतर आपल्यातला कोणताही अंश जिवंत राहत नाही. आपल्याठायी अमर आत्मा वगैरे काही नाही. *

या मेणबत्तीची ज्योत कोठे गेली?

आपणाला मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळते, असे म्हटल्यानंतर शलमोनाने पुढे म्हटले: “पण मृतांस तर काहीच कळत नाही.” या मूलभूत सत्याचा अर्थ त्याने पुढे स्पष्ट केला. तो म्हणाला, की मृत प्रेम करीत नाहीत, कोणाचा द्वेष करीत नाहीत व ‘ज्या अधोलोकाकडे [अर्थात कबरेत]’ आपण जाणार आहोत तेथे “काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, ६, १०) तसेच, स्तोत्र १४६:४ म्हणते, की माणूस मरतो तेव्हा “त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” आपण मर्त्य आहोत आणि आपल्या देहाचा मृत्यू झाल्यावर आपण जिवंत राहत नाही. आपले जीवन मेणबत्तीच्या ज्योतिसारखे आहे. ज्योत विझवली जाते तेव्हा ती ज्योत दुसरीकडे कुठेही जात नाही. ती फक्त नाहीशी होते.

येशूने मृतांविषयी काय म्हटले

७. येशूने मृत्यूची तुलना कशाशी केली?

येशू ख्रिस्ताने मृतांच्या स्थितीविषयी सांगितले. त्याचा मित्र लाजर मरण पावला तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “आपला मित्र लाजर झोपला आहे.” शिष्यांना वाटले, की लाजर आजारी असल्यामुळे आराम करण्यासाठी झोपला आहे, असे येशू म्हणतोय. पण ते चुकीचा विचार करत होते. येशूने पुढे म्हटले: “लाजर मेला आहे.” (योहान ११:११-१४) लक्ष द्या, येशूने मृत्यूची तुलना आराम करण्याशी किंवा झोपेशी केली. लाजर स्वर्गात गेला नव्हता किंवा धगधगत्या नरकात गेला नव्हता. तो देवदूतांना किंवा पूर्वजांना भेटला नव्हता. मानव म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला नव्हता. तर तो मृत्यूत शांत झोपला होता; त्याला जणू बिनस्वप्नांची गाढ झोप लागली होती. इतर शास्त्रवचनेसुद्धा मृत्यूची तुलना निद्रेशी करतात. जसे की, शिष्य स्तेफन याला दगडमार करून ठार मारण्यात आले तेव्हा बायबल म्हणते, की “तो झोपी गेला.” (प्रेषितांची कृत्ये ७:६०) तसेच, प्रेषित पौलाने त्याच्या दिवसांत मरण पावलेल्या काहींविषयी असे लिहिले, की ते “महानिद्रा घेत आहेत.”​—१ करिंथकर १५:६.

यहोवाने मानवांना पृथ्वीवर सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी बनवले

८. लोकांनी मरावे हा देवाचा उद्देश नव्हता हे आपल्याला कसे समजते?

पण लोकांनी मरावे, हा देवाचा मूळ उद्देश होता का? मुळीच नाही! यहोवाने मानवाला पृथ्वीवर अनंतकाळ जगण्यासाठी बनवले. या पुस्तकाच्या सुरुवातीला आपण वाचले, की देवाने पहिल्या मानवी जोडप्याला एका आल्हाददायक परादीसमध्ये ठेवले होते. त्याने त्यांना परिपूर्ण आरोग्य दिले. यहोवाने त्यांच्याबद्दल चांगलेच उद्देशिले होते. कोणतेही प्रेमळ पालक, आपल्या मुलांनी वृद्ध होऊन मरून जावे, अशी इच्छा करतील का? मुळीच नाही! यहोवाचे त्याच्या मुलांवर प्रेम होते आणि त्यांनी पृथ्वीवर अनंतकाळ सुखी राहावे, अशी त्याची इच्छा होती. यहोवाने “मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे,” असे बायबल मानवांविषयी म्हणते. (उपदेशक ३:११) अनंतकाळ जगण्याच्या इच्छेसह देवाने आपल्याला निर्माण केले आहे. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने एक मार्गही तयार केला आहे.

मानव का मरतात?

९. यहोवाने आदामावर कोणते बंधन घातले, आणि ही आज्ञा पाळायला कठीण का नव्हती?

मग मानव का मरतात? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याकरता आपण, पृथ्वीवर फक्त एकच पुरुष आणि एकच स्त्री होती तेव्हा काय घडले त्याचा विचार केला पाहिजे. बायबल म्हणते: “परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, . . . जमिनीतून उगवविली.” (उत्पत्ति २:९) परंतु, त्यांच्यावर एक बंधन होते. यहोवाने आदामाला सांगितले: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) ही आज्ञा पाळायला कठीण नव्हती. बागेत अशी अनेक झाडे होती ज्यांचे फळ आदाम आणि हव्वा खाऊ शकत होते. पण आता त्यांना, ज्याने आवश्यक त्या सर्व गोष्टी तसेच परिपूर्ण जीवन दिले होते त्याला कृतज्ञता दाखवण्याची एक खास संधी मिळाली होती. ते आज्ञाधारक राहिले असते तर त्यांनी दाखवून दिले असते, की त्यांना आपला स्वर्गीय पिता याच्या अधिकाराबद्दल आदर आहे आणि त्याचे प्रेमळ मार्गदर्शन हवे आहे.

१०, ११. (क) पहिल्या मानवी जोडप्याने देवाची आज्ञा कशी मोडली? (ख) आदाम आणि हव्वेने केलेला हा आज्ञाभंग गंभीर का होता?

१० पण दुःखाची गोष्ट, पहिल्या मानवी जोडप्याने देवाची आज्ञा मोडण्याचे निवडले. सैतानाने एका सर्पाद्वारे हव्वेला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” हव्वेने त्याला उत्तर दिले: “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ‘ते खाऊ नका; त्याला स्पर्शहि करू नका, कराल तर मराल.’”​—उत्पत्ति ३:१-३.

११ सैतान तिला म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:४, ५) मना केलेले फळ खाल्ले तर आपले भले होईल, असा हव्वेने विचार करावा, अशी सैतानाची इच्छा होती. त्याच्या मते, बरोबर काय आणि चूक काय हे ठरवण्याचा तिला अधिकार होता; ती तिच्या मर्जीस येईल त्याप्रमाणे वागू शकत होती. सैतानाने यहोवावर असाही दोषारोप लावला, की फळ खाल्ल्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी यहोवा लबाड बोलला होता. हव्वेने सैतानावर विश्वास ठेवला. त्यामुळे तिने फळ तोडले आणि ते खाल्ले. मग तिने ते आपल्या पतीसही दिले व त्यानेही ते खाल्ले. त्यांचे हे कार्य अज्ञानात केलेले कार्य नव्हते. तुम्ही असे करू नका असे जे देवाने त्यांना सांगितले होते त्याच्या अगदी उलट आपण करतोय, याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. फळ खाण्याद्वारे त्यांनी मुद्दामहून एक साधीशी व तर्कशुद्ध आज्ञा मोडली. त्यांनी आपला स्वर्गीय पिता आणि त्याचा अधिकार यांचा अनादर केला. त्यांच्या प्रेमळ निर्माणकर्त्याबद्दल असा अनादर नक्कीच अक्षम्य होता!

१२. आदाम आणि हव्वेने यहोवाच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा त्याला कसे वाटले असेल, हे समजण्यासाठी कोणते उदाहरण आहे?

१२ समजा, तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला लहानाचे मोठे केले, त्याची/तिची प्रेमाने काळजी घेतली. पण नंतर त्यांनी तुमची आज्ञा मोडली आणि आपल्या कार्यांवरून दाखवले, की त्याला किंवा तिला तुमच्याबद्दल कसलाच आदर वाटत नाही किंवा प्रेम नाही. तुम्हाला अर्थातच यामुळे खूप वाईट वाटेल. आदाम आणि हव्वेने यहोवाच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा त्याला किती अतोनात दुःख झाले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का?

आदाम मातीतून आला आणि पुन्हा मातीत गेला

१३. आदामाचा मृत्यू झाल्यावर त्याचे काय होईल असे यहोवा म्हणाला होता, आणि याचा काय अर्थ होतो?

१३ आज्ञाभंजक आदाम आणि हव्वेला अनंतकाळ जिवंत ठेवण्यास यहोवाकडे कसले कारण उरले नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे ते मरण पावले. आदाम आणि हव्वा यांचे अस्तित्व संपले. ते कोणत्याही आत्मिक जगात गेले नाहीत. आदामाने पाप केल्यानंतर यहोवाने त्याला जाब विचारताना जे म्हटले त्यावरून आपण हे सांगू शकतो, की आदाम आणि हव्वा मरण पावल्यानंतर ते कोणत्याही आत्मिक जगात गेले नाहीत. देव त्यांना म्हणाला: “[तू] अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) देवाने आदामाला मातीतून बनवले होते. (उत्पत्ति २:७) त्याआधी आदाम अस्तित्वात नव्हता. यास्तव, तू मातीला परत जाऊन मिळशील असे यहोवा आदामाला म्हटला तेव्हा आदाम पुन्हा अस्तित्वविरहीत होईल, असा यहोवाच्या म्हणण्याचा अर्थ होता. आदामाला ज्या मातीपासून बनवले होते त्या मातीसारखाच तो निर्जीव होणार होता.

१४. आपण का मरतो?

१४ आज आदाम आणि हव्वा जिवंत असले असते, पण त्यांनी देवाची आज्ञा मोडण्याची निवड करून पाप केल्यामुळे ते मरण पावले. आदामाची पापी अवस्था तसेच मृत्यू त्याच्या सर्व संततीला मिळाल्यामुळे आपणही मरतो. (रोमकर ५:१२) हे पाप आनुवांशिकतेमुळे झालेल्या एका अतिशय भयंकर आजाराप्रमाणे आहे ज्यातून कोणीही सुटू शकत नाही. याचा परिणाम मृत्यू आहे; तो एक शाप आहे. मृत्यू मित्र नव्हे तर शत्रू आहे. (१ करिंथकर १५:२६) या भयानक शत्रूपासून आपली सुटका करण्यासाठी यहोवाने खंडणीची तरतूद केल्याबद्दल आपण त्याचे किती आभारी असले पाहिजे!

मृत्यूविषयीचे सत्य माहीत झाल्याने आपल्याला सांत्वन मिळते

१५. मृतांविषयी सत्य माहीत होणे सांत्वनदायक का आहे?

१५ मृतांच्या स्थितीविषयी असलेली बायबलची शिकवण सांत्वनदायक आहे. आपण पाहिले त्याप्रमाणे मृत लोक कसलेही दुःख किंवा यातना भोगत नसतात. आपण त्यांना भिण्याचे काही कारण नाही, कारण ते आपलं काही वाईट करू शकत नाहीत. त्यांना आपल्या मदतीची गरज नाही, किंवा तेही आपल्याला मदत करू शकत नाहीत. आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही, आणि तेही आपल्याशी बोलू शकत नाहीत. पुष्कळ धार्मिक नेते असा खोटा दावा करतात, की ते मेलेल्या लोकांना मदत करू शकतात; आणि अशा धार्मिक नेत्यांवर विश्वास ठेवणारे लोक त्यांना पैसे देतात. पण सत्य माहीत झाल्यामुळे लबाडी करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांपासून आपले संरक्षण होते.

१६. अनेक धर्मांच्या शिकवणुकींवर कोणाचा प्रभाव आहे, तो कसा?

१६ मृतांविषयी बायबल देत असलेली शिकवण तुमच्याही धर्मात दिली जाते का? पुष्कळ धर्म अशी शिकवण देत नाहीत. का नाही? कारण त्यांच्या शिकवणुकींवर सैतानाचा प्रभाव आहे. तो खोट्या धर्माचा उपयोग करून लोकांना असे मानायला लावतो, की त्यांचे शरीर मेल्यानंतर ते एका आत्मिक जगात जिवंत राहतात. यासारख्या इतर अनेक खोट्या शिकवणी देऊन सैतान लोकांना यहोवा देवापासून दूर नेत आहे. ते कसे?

१७. युगानुयुगे पीडा देण्याची शिकवण यहोवाचा अनादर करणारी का आहे?

१७ आधी उल्लेख केल्याप्रमाणे, काही धर्मांची अशी शिकवण आहे, की मनुष्याने आयुष्यभर दुष्कर्मे केलीत तर मृत्यूनंतर तो अनंतकाळ पीडा भोगण्यासाठी नरकात जातो. ही शिकवण देवाचा अनादर करणारी आहे. यहोवा देव प्रीती आहे आणि तो अशाप्रकारे लोकांना मुळीच पीडित करणार नाही. (१ योहान ४:८) तुम्ही अशा मनुष्याविषयी काय विचार कराल, की जो आपल्या मुलाने आपले म्हणणे ऐकले नाही म्हणून त्याचा हात आगीवर धरतो? अशा मनुष्याचा तुम्ही आदर कराल का? किंबहुना, अशा मनुष्याशी ओळख करून घ्यावी असे तुम्हाला वाटेल का? मुळीच नाही! काय क्रूर माणूस आहे हा, असाच विचार तुम्ही त्याच्याबद्दल कराल. सैतान आपल्याला असेच मानायला लावू पाहत आहे, की यहोवा लोकांना अग्नीत युगानुयुगे पीडा देतो.

१८. मृतांची पूजा कोणत्या खोट्या धार्मिक शिकवणीवर आधारित आहे?

१८ सैतान काही धर्मांद्वारे अशीही शिकवण देतो, की मृत्यूनंतर लोक आत्मे बनतात व जिवंत असलेल्यांनी या आत्म्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे. या शिकवणीनुसार, मृतांचे आत्मे एकतर शक्तिशाली मित्र बनू शकतात किंवा जहाल शत्रू बनू शकतात. पुष्कळ लोक या खोट्या शिकवणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना मृतांची भीती वाटते आणि ते त्यांना मान देतात, त्यांची पूजा करू लागतात. पण बायबल असे शिकवते, की मृत निद्रावस्थेत आहेत आणि आपण फक्त एकच खरा देव यहोवा याची उपासना केली पाहिजे कारण तो आपला निर्माणकर्ता व दाता आहे.​—प्रकटीकरण ४:११.

१९. मृत्यूविषयीचे सत्य माहीत झाल्यामुळे आपण बायबलची दुसरी कोणती शिकवण समजू शकतो?

१९ मृतांच्या स्थितीविषयी सत्य माहीत असल्यामुळे खोट्या धार्मिक शिकवणींमुळे फसवणूक होण्यापासून तुमचे संरक्षण होते. हे सत्य तुम्हाला बायबलच्या इतर शिकवणी समजायला मदत करते. जसे की, मृत्यूनंतर लोक आत्मिक जगात प्रवेश करीत नाहीत हे जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा, पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाचे अभिवचन तुम्हाला खरे वाटू लागते.

२०. पुढील अध्यायात कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली आहे?

२० फार पूर्वी, धार्मिक मनुष्य ईयोब याने असा प्रश्न विचारला होता: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” (ईयोब १४:१४) मृत्यूची गाढ झोप घेणाऱ्या निर्जीव व्यक्तीला पुन्हा जिवंत केले जाईल का? अतिशय सांत्वनदायक असलेल्या या विचाराबाबत बायबलची काय शिकवण आहे ते पुढील अध्यायात सांगण्यात आले आहे.

^ परि. 5 “जीव/प्राण” व “आत्मा” या शब्दांचे स्पष्टीकरण हवे असेल तर पृष्ठे २०८-११ वरील परिशिष्ट पाहा.