धडा २७
येशूच्या मृत्यूमुळे आपली सुटका कशी होते?
आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याने देवाची आज्ञा मोडल्यामुळे, आपण पापी झालो आहोत. त्यामुळे आपल्याला दुःख सोसावं लागतं आणि आपण मरतो. a पण या परिस्थितीतही आपल्याजवळ एक आशा आहे. कारण आपल्याला पाप आणि मृत्यूच्या तावडीतून सोडवण्यासाठी यहोवाने त्याच्या मुलाला, म्हणजेच येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर पाठवलं. बायबल सांगतं की येशूने त्याच्या जीवनाचं बलिदान देऊन, मानवजातीसाठी खंडणी दिली आहे. खंडणी म्हणजे एखाद्याची सुटका करण्यासाठी दिली जाणारी किंमत. येशूने मानवजातीला सोडवण्यासाठी खंडणी म्हणून त्याच्या परिपूर्ण मानवी जीवनाची किंमत दिली. (मत्तय २०:२८ वाचा.) खरंतर, परिपूर्ण असल्यामुळे येशू मानव म्हणून कायम या पृथ्वीवर जगू शकला असता, पण त्याने स्वखुषीने या हक्काचा त्याग केला. आणि यामुळे, आदाम आणि हव्वाने गमावलेलं जीवन आपल्याला पुन्हा मिळणं शक्य झालं. यावरून हेही दिसून आलं की यहोवाचं आणि येशूचं आपल्यावर खूप प्रेम आहे. या धड्यातल्या माहितीमुळे येशूच्या बलिदानाबद्दल तुमची कदर नक्कीच वाढेल.
१. येशूच्या मृत्यूमुळे आज आपल्याला कसा फायदा होतो?
आपण अपरिपूर्ण किंवा पापी असल्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी करतो ज्या यहोवाला आवडत नाहीत. आणि त्यांमुळे आपण यहोवापासून दूर जातो. पण जर आपल्याला या चुकांबद्दल मनापासून वाईट वाटत असेल, तर आपण येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाकडे यांसाठी माफी मागितली पाहिजे. आणि परत या चुका न करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. जर आपण असं केलं, तर आपल्याला पुन्हा एकदा यहोवासोबत मैत्रीचं नातं जोडता येईल. (१ योहान २:१) बायबल म्हणतं, “आपल्या पापांबद्दल, ख्रिस्ताने सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसलं. तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला. हे यासाठी, की तुम्ही देवाकडे यावं.”—१ पेत्र ३:१८.
२. येशूच्या मृत्यूमुळे भविष्यात आपल्याला कसा फायदा होईल?
यहोवाने येशूला त्याचं परिपूर्ण मानवी जीवन अर्पण करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं. “कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहान ३:१६) येशूने दिलेल्या बलिदानाच्या आधारावर यहोवा आदामच्या पापामुळे झालेल्या नुकसानाची लवकरच पूर्णपणे भरपाई करेल. याचा अर्थ, जर आपण येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवला आणि तो कार्यांतून दाखवला, तर आपल्याला या पृथ्वीवर एका सुंदर नंदनवनात कायम जीवनाचा आनंद घेता येईल.—यशया ६५:२१-२३.
आणखी जाणून घेऊ या
येशूने त्याचं जीवन का अर्पण केलं आणि आपल्याला त्याचा कसा फायदा होतो, हे आणखी स्पष्टपणे समजून घ्यायचा प्रयत्न करू या.
३. येशूच्या बलिदानामुळे आपल्याला पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळते
व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
-
देवाची आज्ञा मोडल्यामुळे आदामने कोणती संधी गमावली?
रोमकर ५:१२ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
आदामने केलेल्या पापामुळे तुमच्या जीवनावर काय परिणाम झालाय?
योहान ३:१६ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
यहोवाने त्याच्या मुलाला पृथ्वीवर का पाठवलं?
-
१. आदाम एक परिपूर्ण मनुष्य होता, पण त्याने देवाची आज्ञा मोडल्यामुळे मानवांवर पाप आणि मृत्यू ओढवला
-
२. येशू एक परिपूर्ण मनुष्य होता. त्याने देवाची आज्ञा पाळल्यामुळे, मानवाजातीला पापापासून मुक्त होऊन कायम जगण्याचा मार्ग मोकळा झाला
४. येशूच्या मृत्यूमुळे सगळ्या मानवांना फायदा होऊ शकतो
व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
-
एका माणसाच्या मृत्यूमुळे सगळ्या लोकांना कसा फायदा होऊ शकतो?
१ तीमथ्य २:५, ६ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
आदाम एक परिपूर्ण मनुष्य होता आणि त्याने देवाची आज्ञा मोडल्यामुळे मानवांवर पाप आणि मृत्यू ओढवला. येशूसुद्धा एक परिपूर्ण मनुष्य होता. मग, त्याच्या बलिदानामुळे काय शक्य झालं? आणि त्याने “सर्वांच्या मोबदल्यात [योग्य अशी] खंडणी” दिली आहे असं का म्हणता येईल?
५. खंडणीची व्यवस्था करून यहोवाने तुमच्याबद्दल प्रेम दाखवलं
खंडणीची व्यवस्था करून यहोवाने आपल्या प्रत्येकाबद्दल प्रेम दाखवलंय. आणि यहोवाचे सेवक खंडणीकडे याच दृष्टीने पाहतात. याचं एक उदाहरण जाणून घेण्यासाठी गलतीकर २:२० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
पौलला जाणीव होती, की खंडणीचं बलिदान त्याच्या स्वतःसाठी देण्यात आलंय. पौलच्या कोणत्या शब्दांवरून हे दिसून येतं?
आदामने पाप केल्यामुळे, तो आणि त्याचे सगळे वंशज मृत्युदंडासाठी पात्र ठरले. पण तुम्हाला कायम आनंदाने जगण्याची संधी मिळावी, म्हणून यहोवाने त्याच्या मुलाला मृत्यू सोसण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं.
पुढे दिलेली वचनं वाचताना कल्पना करा, की आपल्या मुलाला दुःख सोसताना पाहून यहोवाला कसं वाटलं असेल. योहान १९:१-७, १६-१८ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे केलंय, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
कदाचित कोणी विचारेल: “एका माणसाच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच जीवन कसं मिळू शकतं?”
-
तुम्ही काय उत्तर द्याल?
थोडक्यात
येशूने दिलेल्या बलिदानाच्या आधारावर यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो. या बलिदानामुळेच आपल्याला कायम जीवनाचा आनंद घ्यायची संधी मिळाली आहे.
उजळणी
-
येशूला का मरावं लागलं?
-
येशूने आपलं परिपूर्ण मानवी जीवन अर्पण करून खंडणी कशी दिली?
-
येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होऊ शकतो?
हेसुद्धा पाहा
येशूच्या परिपूर्ण मानवी जीवनाला खंडणी का म्हटलंय हे जाणून घ्या.
“येशूच्या बलिदानामुळे ‘बऱ्याच जणांसाठी खंडणी’ कशी देण्यात आली?” (वेबसाईटवरचा लेख)
तारण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जाणून घ्या.
यहोवा गंभीर पापांचीही क्षमा करतो का?
एका माणसाला ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल शिकून घेतल्यामुळे आपला स्वभाव बदलायला कशी मदत झाली हे पाहा.
a पाप म्हणजे फक्त वाईट कृत्यच नाही. तर आदाम आणि हव्वाकडून आपल्या सर्वांना चुकीची कामं करण्याची जी वृत्ती वारशाने मिळाली आहे, तिलापण हे सूचित करतं.