व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे राज्य काय साध्य करील

देवाचे राज्य काय साध्य करील

देवाचे राज्य काय साध्य करील

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:१०.

१. देवाचे राज्य येईल म्हणजे काय होईल?

येशूने आपल्या शिष्यांना देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करायला शिकवले तेव्हा, देवाच्या मदतीविना हजारो वर्षांपासून स्वतंत्रपणे चालत आलेले मानवी शासन, देवाचे राज्य आल्यावर संपुष्टात येईल हे त्याला ठाऊक होते. मानवी शासनादरम्यान, पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण केली जात नव्हती. (स्तोत्र १४७:१९, २०) परंतु, स्वर्गामध्ये देवाच्या राज्याची स्थापना झाल्यावर सगळीकडे देवाची इच्छा पूर्ण केली जाणार आहे. मानवी शासनाचा अंत केला जाऊन देवाचे स्वर्गीय राज्य येण्याची ही अद्‌भुत वेळ फार जवळ आली आहे.

२. मानवी शासनाचा अंत झाल्यावर, देवाच्या राज्याचे शासन सुरू होईल तेव्हा काय घडेल?

मानवाचे राज्य जाऊन देवाचे राज्य येण्याआधी “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट” येईल, असे येशू म्हणाला होता. (मत्तय २४:२१) हा कालावधी नेमका किती असेल याविषयी बायबल काही सांगत नाही परंतु, त्या दरम्यान येणाऱ्‍या विपत्ती मात्र अभूतपूर्व असतील. मोठ्या संकटाच्या सुरवातीला सर्व खोट्या धर्मांचा नाश केला जाईल. हे घडेल तेव्हा पृथ्वीवरील लोकांना जबरदस्त धक्का बसेल. यहोवाच्या साक्षीदारांना मात्र असा धक्का बसणार नाही कारण बऱ्‍याच काळापासून ते याची अपेक्षा करत होते. (प्रकटीकरण १७:१, १५-१७; १८:१-२४) मग, हर्मगिदोनात या मोठ्या संकटाचा अंत होईल तेव्हा देवाचे राज्य या सैतानी व्यवस्थेचा चुराडा करील आणि तिचे नामोनिशाण मिटवून टाकील.—दानीएल २:४४; प्रकटीकरण १६:१४, १६.

३. अवज्ञाकारी लोकांचा शेवट कसा होईल असे यिर्मया सांगतो?

परंतु “जे देवाला ओळखत नाहीत” व ख्रिस्ताच्या हवाली असलेल्या स्वर्गीय राज्याची “सुवार्ता मानीत नाहीत” त्यांचे काय होईल? (२ थेस्सलनीकाकर १:६-९) बायबलची भविष्यवाणी सांगते: “पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्‌भवेल. त्या दिवशी परमेश्‍वराने संहारिलेले, पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांकरिता कोणी शोक करणार नाही, त्यांस कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.”—यिर्मया २५:३२, ३३.

दुष्टाईचा अंत

४. यहोवा या दुष्ट व्यवस्थेचा अंत करील हे योग्य का आहे?

हजारो वर्षांपासून यहोवा देवाने दुष्टाई सहन केली आहे. मानवी शासन पूर्णतः विनाशकारक आहे हे पाहण्यासाठी त्याने नम्र अंतःकरणाच्या लोकांना पुरेसा कालावधी दिला. मानवी शासन विनाशकारक कसे ठरले आहे याचे उदाहरण घेतले तर एका सूत्रानुसार, केवळ २० व्या शतकातच युद्धे, क्रांती आणि इतर दंगलींनी १५ कोटींहून अधिक लोकांचा बळी घेतला. विशेषतः दुसऱ्‍या महायुद्धात, सुमारे ५ कोटी लोक मृत्यूमुखी पडले तेव्हा मानवाची पाशवी वृत्ती दिसून आली. त्यातल्या कित्येक लोकांचा नात्सी छळ छावण्यांमध्ये भीषण मृत्यू घडला. आपल्या काळात ‘दुष्ट व भोंदू माणसे दुष्टपणात अधिक सरसावतील’ ही बायबलची भविष्यवाणी खरी ठरली आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) आज, अनैतिकता, गुन्हेगारी, हिंसा, भ्रष्टाचार आणि देवाच्या नियमांबद्दल अनादर या गोष्टी तर सर्रास पाहायला मिळतात. त्यामुळे, यहोवा या दुष्ट व्यवस्थेचा अंत करील हे योग्यच आहे.

५, ६. प्राचीन कनान देशातील दुष्टपणाचे वर्णन करा.

आताची परिस्थिती सुमारे ३,५०० वर्षांआधीच्या कनानमधील परिस्थितीसारखीच आहे. बायबल सांगते: “ज्या गोष्टींचा परमेश्‍वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलांमुलींचा देखील होम करीत असतात.” (अनुवाद १२:३१) यहोवाने इस्राएल राष्ट्राला असे सांगितले: “त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे . . . तुझा देव परमेश्‍वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.” (अनुवाद ९:५) बायबल इतिहासकार हेन्री एच. हॅली यांनी लिहिले: “बआल, अश्‍तोरथ आणि इतर कनानी दैवतांचे उपासना विधी फार थाटामाटात पार पाडले जात; त्यांच्या मंदिरांमध्ये हरतऱ्‍हेची वाईट कामे चालत होती.”

त्यांची दुष्टता किती टोकाला पोहंचली होती याचे वर्णन हॅली यांनी केले कारण, बऱ्‍याच ठिकाणी पुरातनवस्तूशास्त्रज्ञांना “बआलला अर्पण केलेल्या लहान मुलांचे अवशेष असलेली अनेक मडकी सापडली.” ते म्हणाले: “ती सगळी जागाच जणू काही नवजात मुलांचे कबरस्थान बनली होती. . . . कनानी लोक त्यांच्या दैवतांसमोर धार्मिक विधी म्हणून लैंगिक अनैतिकता आचरत आणि नंतर त्याच दैवतांना ते आपल्या ज्येष्ठ संततीचे अर्पण देऊन उपासना करत. असे दिसून येते की, कनानचा संपूर्ण देशच मोठ्या प्रमाणात सदोम आणि गमोराच्या देशांसारखा बनला होता. . . . अशा घृणित आणि क्रूरतेच्या चालीरीती असलेल्या संस्कृतीला आणखी काही काळ टिकण्याचा हक्क होता का? . . . कनानी शहरांच्या अवशेषांचे उत्खनन करणाऱ्‍या शास्त्रज्ञांना याचेच नवल वाटते की देवाने त्यांचा नाश इतक्या उशिरा का केला.”

पृथ्वीचे वतन मिळवणे

७, ८. देव या पृथ्वीचे शुद्धीकरण कसे करील?

देवाने कनान देशाचे शुद्धीकरण केले तसेच फार लवकर तो या संपूर्ण पृथ्वीला शुद्ध करून फक्‍त त्याची इच्छा पूर्ण करणाऱ्‍यांना या पृथ्वीचा हक्क देणार आहे. “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल.” (नीतिसूत्रे २:२१, २२) तसेच स्तोत्रकर्ता म्हणतो: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) “ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत [सैतानाने] राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून” त्यालाही काढून टाकले जाईल. (प्रकटीकरण २०:१-३) होय, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.

या पृथ्वीवर सर्वकाळासाठी जगण्याची इच्छा असलेल्यांच्या भव्य आशेविषयी येशू म्हणाला: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५) कदाचित तो स्तोत्र ३७:२९ चा उल्लेख करत असावा. त्यात असे भाकीत केले होते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” नम्र अंतःकरणाच्या लोकांनी याच पृथ्वीवरील बागेसमान परिस्थितीत सर्वकाळासाठी राहावे हा यहोवाचा उद्देश येशूला ठाऊक होता. यहोवा म्हणतो: “मी आपल्या महाशक्‍तीने . . . पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली मनुष्ये व पशु यांस निर्माण केले आहे, व मला नीट दिसेल त्यांस ती मी देतो.”—यिर्मया २७:५.

अद्‌भुत नवीन जग

९. देवाचे राज्य कसले जग आणील?

हर्मगिदोनानंतर, देवाचे राज्य एक अद्‌भुत “नवी पृथ्वी” आणील ज्यामध्ये “नीतिमत्त्व वास” करील. (२ पेत्र ३:१३) या जुलमी दुष्ट व्यवस्थेतून आपल्याला मुक्‍ती मिळेल म्हणजे हर्मगिदोनातून बचावणाऱ्‍यांना सुटकेचा निःश्‍वास घेता येईल! अद्‌भुत आशीर्वाद आणि सार्वकालिक जीवन मिळेल अशा स्वर्गीय राज्य सरकाराच्या नीतिमान नवीन पृथ्वीवर प्रवेश मिळाल्याबद्दल ते किती आनंदित होतील!—प्रकटीकरण ७:९-१७.

१०. देवाच्या राज्यात कोणत्या वाईट गोष्टी नसतील?

१० त्यापुढे लोकांना युद्धे, गुन्हेगारी, उपासमार किंवा रानटी जनावरांचा देखील धोका राहणार नाही. “मी क्षेमवचन देऊन त्यांजबरोबर करार करीन, देशांतून दुष्ट पशु नाहीतसे करीन. . . . मळ्यांतील झाडे फलद्रूप होतील, भूमि आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील.” “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—यहेज्केल ३४:२५-२८; मीखा ४:३, ४.

११. आपली सर्व शारीरिक दुखणी नाहीशी होतील असा भरवसा आपण का बाळगतो?

११ आजारपण, दुःख आणि मृत्यू देखील नाहीसा केला जाईल. “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.” (यशया ३३:२४) “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. . . . ‘पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.’” (प्रकटीकरण २१:४, ५) देवाने येशूला दिलेल्या सामर्थ्याद्वारे आपण या सर्व गोष्टी करू शकतो हे त्याने पृथ्वीवर असताना शाबीत करून दाखवले होते. येशूने ठिकठिकाणी जाऊन पवित्र आत्म्याच्या मदतीने अपंगांना व आजाऱ्‍यांना बरे केले.—मत्तय १५:३०, ३१.

१२. मृतांसाठी कोणती आशा आहे?

१२ येशूने फक्‍त आजाऱ्‍यांनाच बरे केले नाही तर मृतांना देखील जिवंत केले! प्रांजळ मनाच्या लोकांना हे चमत्कार पाहून कसे वाटले असेल? एका १२ वर्षीय मुलीला उठवल्यानंतर तिच्या शेजारी उभे असलेले तिचे आईवडील “अत्यंत आश्‍चर्यचकित झाले.” (मार्क ५:४२) येशू त्याच्या राज्य शासनादरम्यान काय करील याचे हे आणखी एक उदाहरण होते. त्याच्या राज्यात, “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) आतापर्यंत मरण पावलेले लोक गटागटाने पुन्हा जिवंत होतील व आपल्या प्रिय जनांना भेटतील त्या काळाची कल्पना करा! तेव्हा सर्वांना शब्दांत वर्णन करता येणार नाही इतका आनंद झालेला असेल! या पुनरुत्थित लोकांसाठी, राज्याच्या देखरेखीखाली मोठे शैक्षणिक कार्य केले जाईल. अशासाठी, की “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.

यहोवाच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण

१३. मानवजातीवर राज्य करण्याचा हक्क केवळ देवाला आहे हे कशाप्रकारे स्थापित केले जाईल?

१३ राज्य शासनाच्या हजार वर्षांच्या शेवटापर्यंत मानवजात पुन्हा एकदा मानसिक आणि शारीरिकरीत्या परिपूर्ण झालेली असेल. आणि संपूर्ण पृथ्वीचे रूपांतर, एदेन बागेसारखे अर्थात परादीसमध्ये झालेले असेल. पुन्हा एकदा शांतीमय, आनंदी, सुरक्षित आणि प्रेमळ मानवसमाज असेल. आतापर्यंतच्या मानवी इतिहासात नव्हती अशी अद्‌भुत परिस्थिती राज्य शासनात असेल. हजारो वर्षे मानवाचे जुलमी राज्य आणि एक हजार वर्षांचे देवाचे स्वर्गीय राज्य यांतील जमीन आस्मानाचा फरक आपल्याला दिसून येईल. देवाचे राज्य हरएक बाबतीत मानवी राज्यापेक्षा कितीतरी पटीने सर्वोत्तम आहे हे आपल्याला दिसून येईल. तेव्हा राज्य करण्याचा हक्क केवळ देवाचा आहे हे सर्वकाळाकरता स्थापित केले जाईल, अर्थात त्याच्या सार्वभौमत्वाचे पूर्णपणे दोषनिवारण केले जाईल.

१४. हजार वर्षांच्या शेवटी बंड करणाऱ्‍या लोकांचे काय होईल?

१४ हजार वर्षांच्या शेवटी, यहोवा देव परिपूर्ण मानवांना, ते कोणाची सेवा करू इच्छितात, हे ठरवण्याची आणखी एक संधी देईल. बायबलमध्ये म्हटले आहे, की “सैतानाला कैदेतून बंधमुक्‍त करण्यात येईल.” तेव्हा सैतान लोकांना फसवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करील. आणि काहीजण तर देवाची बाजू सोडून सैतानाच्या बाजूने होतीलही! परंतु ‘पीडा दुसऱ्‍यांदा उठू नये’ म्हणून यहोवा देव सैतान, त्याचे दुरात्मे आणि यहोवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध बंड करणाऱ्‍या सर्वांचा कायमचा नाश करील. त्या वेळेला, या नाश केलेल्या लोकांबद्दल कोणीही असा आक्षेप घेऊ शकणार नाही की, देवाने मानवाला निवड करण्यासाठी संधी दिली नाही किंवा अपरिपूर्णतेमुळे या लोकांनी चूक केली होती. कारण त्यावेळी हे लोक आदाम आणि हव्वेसारखे परिपूर्ण असतील. आणि आदाम आणि हव्वेप्रमाणेच देवाच्या धार्मिक शासनाविरुद्ध बंड करण्याची त्यांनी आपणहून निवड केलेली असेल.—प्रकटीकरण २०:७-१०; नहूम १:९, पं.र.भा.

१५. एकनिष्ठ लोकांचा यहोवाबरोबर कोणता नातेसंबंध असेल?

१५ पण, बहुतेक लोक यहोवाचे सार्वभौमत्व उंचावण्याचीच निवड करतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. बंड करणाऱ्‍यांचे नामोनिशाण मिटवल्यानंतर धार्मिक लोक यहोवाच्या सन्मुख उभे राहतील. तेव्हा एकनिष्ठेची शेवटची परीक्षा त्यांनी पार केलेली असेल. या एकनिष्ठ लोकांना मग यहोवा आपली मुले म्हणून स्वीकारेल. बंड करण्यापूर्वी आदाम आणि हव्वेचा यहोवाबरोबर जो नातेसंबंध होता तोच नातेसंबंध या लोकांबरोबर असेल. तेव्हा रोमकर ८:२१ ची पूर्णता होईल: “सृष्टीहि [मानवजात] स्वतः नश्‍वरतेच्या दास्यांतून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.” संदेष्टा यशयाने भाकीत केले: “[देव] मृत्यू कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो.”—यशया २५:८.

सार्वकालिक जीवनाची आशा

१६. सार्वकालिक जीवनाची वाट पाहणे का उचित आहे?

१६ विश्‍वासू लोक स्वतःला धन्य मानतात कारण त्यांना माहीत आहे, की यहोवा देव सदासर्वदा त्यांच्यावर आध्यात्मिक आणि भौतिक आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे. म्हणूनच अगदी उचितपणे स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१६) यहोवावर विश्‍वास दाखवताना, परादीसमध्ये जीवनाची आशा देखील बाळगावी, असे यहोवा पृथ्वीवर राहण्याची आशा असलेल्या लोकांना उत्तेजन देतो. यहोवाच्या सार्वभौमत्वाचा वादविषय हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे यात काहीही संशय नाही, तरी कोणत्याही बक्षीसाची अपेक्षा न करता त्याची सेवा करण्यास तो लोकांना सांगत नाही. देवाला निष्ठावान राहणे आणि अनंतकाळच्या जीवनाची आशा या दोन गोष्टींमध्ये एक अतूट संबंध आहे आणि एका ख्रिश्‍चनाच्या विश्‍वासाचे हे आवश्‍यक भाग आहेत. “देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.

१७. आशेद्वारे टिकून राहणे उचित आहे हे येशूने कसे दाखवून दिले?

१७ येशू म्हणाला होता: “सार्वकालिक जीवन हेच आहे, की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) येथे येशू दाखवून देतो, की देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलची माहिती घेतल्यावर आपण प्रतिफळ प्राप्त करू शकतो. जसे की, आपल्या राज्यगौरवात आल्यावर आपली आठवण करावी अशी विनंती एका चोराने येशूला केली तेव्हा, येशूने त्याला उत्तर दिले: ‘तू माझ्याबरोबर सुखलोकांत असशील.’ (लूक २३:४३) त्याने त्या चोराला असे सांगितले नाही, की तुला प्रतिफळ मिळाले नाही तरी तू विश्‍वास ठेव. आपल्या सेवकांनी परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा बाळगावी अशी यहोवाची इच्छा आहे हे येशूला माहीत होते. कारण हीच आशा त्यांना या जगात राहून नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड देताना तग धरून राहण्यास मदत करू शकत होती. तेव्हा, ख्रिस्ती या नात्याने टिकून राहण्याकरता प्रतिफळाची वाट पाहत राहणे महत्त्वाचे आहे.

राज्याचे भवितव्य

१८, १९. सहस्रावधी शासनकाळाच्या शेवटी राजा आणि त्याचे राज्य यांचे काय होईल?

१८ पृथ्वी व मानवांना परिपूर्ण अवस्थेत आणण्यासाठी तसेच मानवांचा देवाशी पुन्हा एकदा समेट घडवून आणण्यासाठी यहोवाने उपयोगात आणलेले त्याचे राज्य हे मूळ सरकार नव्हते तर दुय्यम सरकार होते. मग, एक हजार वर्षांच्या राज्यानंतर राजा येशू ख्रिस्त आणि १,४४,००० राजे व याजक कोणती भूमिका बजावतील? १ करिंथकर १५:२४, २५ मध्ये असे म्हटले आहे: “नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यहि नष्ट केल्यावर तो [येशू] देवपित्याला राज्य सोपून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे.”

१९ या वचनात म्हटले आहे की येशू देवपित्याला राज्य सोपून देईल. पण शास्त्रवचनात असेही म्हटले आहे, की राज्य हे चिरकाल टिकेल. मग ते कोणत्या अर्थाने? ते या अर्थाने की राज्याद्वारे ज्या गोष्टी साध्य केल्या जातील त्या चिरकालासाठी असतील. आणि येशू ख्रिस्ताचा चिरकाल आदर केला जाईल. कारण, देवाच्या सार्वभौमत्वाच्या दोषनिवारणाच्या कार्यात येशूचा सिंहाचा वाटा होता. परंतु, पाप आणि मृत्यू कायमचे काढल्यामुळे व मानवजातीची कायमची सुटका केल्यामुळे येशूची मुक्‍तीदाता म्हणून लागणारी गरज समाप्त होईल. राज्याचे सहस्रावधीचे शासनही तेव्हा पूर्ण होईल; त्यामुळे यहोवा आणि आज्ञाधारक मानवांमध्ये कोणत्याही दुय्यम सरकाराची आवश्‍यकता राहणार नाही. अशाप्रकारे मग, “देव सर्वांना सर्वकाही” होईल.—१ करिंथकर १५:२८.

२०. ख्रिस्त आणि १,४४,००० जनांचे भवितव्य काय आहे हे आपण कशाप्रकारे माहीत करून घेऊ शकतो?

२० सहस्रावधीचे शासन संपल्यावर ख्रिस्त आणि त्याच्या सहशासकांच्या कोणत्या भूमिका असतील? बायबल त्याविषयी काही सांगत नाही. परंतु यहोवा त्यांना नक्कीच इतर विशेषाधिकार देईल याची आपण खात्री बाळगू शकतो. यास्तव, आज आपण सर्व यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावू जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यात येईल. तेव्हा आपण राजा, त्याचे सहराजे व याजक आणि समस्त सृष्टी यांबद्दल यहोवाचा काय उद्देश आहे हे माहीत करून घेण्यासाठी जिवंत असू!

उजळणीसाठी प्रश्‍न

• शासनाच्या बाबतीत कोणता फरक आपण लवकरच पाहणार आहोत?

• देव दुष्ट आणि धार्मिक यांचा न्याय कसा करणार आहे?

• नवीन जगात कशाप्रकारची परिस्थिती असेल?

• यहोवाच्या सार्वभौमत्वाचे पूर्ण दोषनिवारण कशाप्रकारे होईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रे]

“नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल”

[१८ पानांवरील चित्र]

एकनिष्ठ लोकांचा यहोवाबरोबर पुन्हा एकदा नातेसंबंध जोडला जाईल