व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चूक कबूल करणे शांतिपूर्ण संबंधांचे रहस्य

चूक कबूल करणे शांतिपूर्ण संबंधांचे रहस्य

चूक कबूल करणे शांतिपूर्ण संबंधांचे रहस्य

“चूक कबूल केल्याने बराच फरक पडतो. हिंसेविना भांडणे मिटतात, राष्ट्रा-राष्ट्रांतील भेदभाव दूर होतात, सरकारांना आपल्या नागरिकांना होणारा त्रास कबूल करायला संधी मिळते आणि व्यक्‍तिगत नातेसंबंध पूर्ववत व्हायला मदत होते.” असे सुप्रसिद्ध लेखिका आणि वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉर्जटाऊन विद्यापीठामधील भाषातज्ज्ञा, डेबोरा टॅनन म्हणतात.

बिघडलेला नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रामाणिपणे चूक कबूल करणे ही पद्धत सहसा परिणामकारक ठरते याला बायबलही दुजोरा देते. उदाहरणार्थ, येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राच्या दृष्टान्तात, पुत्र घरी परतला आणि त्याने प्रामाणिकपणे आपली चूक कबूल केली तेव्हा त्याच्या पित्याने आनंदाने त्याला घरात घेतले. (लूक १५:१७-२४) होय, अभिमान बाजूला सारून चूक कबूल करण्यात व क्षमा मागण्यात एका व्यक्‍तीने कमीपणा मानू नये. अर्थात, खरोखर नम्र असलेल्या व्यक्‍तींना चूक कबूल करणे मुळीच कठीण वाटत नाही.

चूक कबूल केल्याने होणारा फरक

चूक कबूल केल्याने किती मोठा फरक पडू शकतो हे प्राचीन इस्राएलातील अबीगईल नावाच्या एका बुद्धिमान स्त्रीच्या उदाहरणावरून दिसून येते; पण तिने स्वतःच्या नव्हे तर आपल्या पतीच्या चुकीसाठी माफी मागितली होती. अरण्यात वस्ती करत असताना, कालांतराने इस्राएलचा राजा बनलेल्या दावीदाने व त्याच्या पुरूषांनी अबीगईलचा पती, नाबाल याच्या कळपाचे संरक्षण केले होते. तरीपण, दावीदाच्या तरुण पुरूषांनी त्याच्याजवळ अन्‍न व पाणी मागितले तेव्हा नाबालने त्यांना भलेबुरे सुनावून माघारी लावले. संतप्त झालेल्या दावीदाने ४०० पुरूष गोळा केले आणि तो नाबाल व त्याच्या घराण्याविरुद्ध लढायला निघाला. ही हकीगत ऐकल्यावर अबीगईल दावीदाला भेटायला निघाली. त्याला पाहिल्यावर तिने जमिनीवर उपडे पडून त्याला दंडवत केला. मग ती म्हणाली: “अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या; आपल्या दासीचे बोलणे ऐका.” अबीगईलने मग परिस्थिती समजावून सांगितली आणि दावीदाला अन्‍न व द्राक्षारसाची भेट दिली. त्यावर तो म्हणाला: “आपल्या घरी सुखाने जा; पाहा, मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंति मान्य केली आहे.”—१ शमुवेल २५:२-३५.

अबीगईलच्या नम्र मनोवृत्तीमुळे आणि तिच्या पतीच्या उद्धट वागणुकीबद्दल तिने क्षमा मागितल्यामुळे तिचे घराणे वाचले. दावीदाला तिने उपद्रव करण्यापासून आवरले म्हणून त्याने तिचे आभारही मानले. दावीद आणि त्याच्या पुरूषांना अबीगईलने गैरवागणूक दिली नव्हती तरीपण तिने आपल्या कुटुंबासाठी तो अपराध स्वतःवर घेतला आणि दावीदाशी सलोखा केला.

माफी कधी मागावी हे जाणणाऱ्‍या आणखी एका व्यक्‍तीचे उदाहरण म्हणजे प्रेषित पौलाचे आहे. एकदा, त्याला सन्हेद्रिन या यहूदी न्यायसभेसमोर सफाई द्यावी लागली. पौलाच्या प्रांजळ शब्दांनी क्रोधिष्ट होऊन प्रमुख याजक हनन्या याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्‍यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. त्यावर पौल त्याला म्हणाला: “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” मग लोकांनी, पौल प्रमुख याजकाची निंदा करत आहे असा आरोप त्याच्यावर केला तेव्हा पौलाने तिथल्या तिथेच आपली चूक कबूल केली व म्हणाला: “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्‍याविरुद्ध वाईट बोलू नको’ असे शास्त्रात लिहिले आहे.”—प्रेषितांची कृत्ये २३:१-५.

पौलाने जे म्हटले होते—की, न्याय करणाऱ्‍याने मारहाण करू नये—ते खरे तर योग्य होते. तरीही, अजाणतेत प्रमुख याजकाशी असे बोलणे अनादराचे समजले जाईल म्हणून त्याने माफी मागितली. * पौलाने आपली चूक कबूल केल्यामुळे सन्हेद्रिनमध्ये त्याचे बोलणे ऐकून घेतले. न्यायसभेतील सदस्यांमध्ये एकमत नसल्याचे पौलाला ठाऊक असल्यामुळे पुनरुत्थावरील त्याच्या विश्‍वासाकरता त्याची परीक्षा घेतली जात होती हे त्याने त्यांना सांगितले. परिणामतः, मोठा वादविवाद निर्माण झाला आणि परुशी पौलाची बाजू घेऊ लागले.—प्रेषितांची कृत्ये २३:६-१०.

या दोन बायबलमधील उदाहरणांमधून आपल्याला काय धडा मिळतो? दोन्ही प्रसंगांमध्ये, प्रामाणिकपणे आपली चूक कबूल केल्यामुळे पुढील संवाद साध्य होण्यास वाव मिळाला. त्यामुळे, चूक कबूल केल्याने आपल्याला समेट घडवून आणायला मदत मिळू शकते. होय, आपल्या चुका मान्य करून, झालेल्या नुकसानाबद्दल माफी मागितली तर उभारणीकारक चर्चेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

‘पण मी काहीच चूक केली नाही’

आपल्या बोलण्याने किंवा कृतीने एखाद्याचे मन दुखावले गेले असे आपल्याला कळाल्यावर ती व्यक्‍ती समजूतदार नाही किंवा फारच संवेदनशील आहे असे आपल्याला वाटेल. किंबहुना, येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सल्ला दिला: “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”—मत्तय ५:२३, २४.

उदाहरणार्थ, एका बांधवाला वाटत असेल की, तुम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे. अशा परिस्थितीत, तुमची चूक असली किंवा नसली तरी येशूच्या म्हणण्यानुसार तुम्ही जाऊन ‘आपल्या भावाबरोबर समेट केला पाहिजे.’ ग्रीक मजकुरानुसार, येथे येशूने वापरलेल्या शब्दाचा अर्थ ‘आपसांत मतभेद झाल्यावर आपसात चूक कबूल करणे.’ (वाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्‌र्स) दोन व्यक्‍तींमध्ये मतभेद असल्यास, दोन्ही बाजू दोषी असू शकतात कारण दोघेही अपरिपूर्ण आहेत व दोघांकडूनही चुका होऊ शकतात. यामुळे, एकमेकांना आपली चूक कबूल करून समेट करण्याची गरज आहे.

कोण दोषी आणि कोण निर्दोष आहे हा प्रश्‍न तितका महत्त्वाचा नाही, तर समेट करायला कोण पुढाकार घेईल हा मुख्य प्रश्‍न आहे. करिंथमधले काही ख्रिस्ती, पैशांसंबंधी मतभेदांसारख्या आपसांतील भांडणांवरून देवाच्या सह-सेवकांना जगीक न्यायालयांमध्ये खेचत होते हे प्रेषित पौलाने पाहिले तेव्हा त्याने त्यांना ताडन दिले: “त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?” (१ करिंथकर ६:७) सह-ख्रिश्‍चनांनी व्यक्‍तिगत मतभेदांवरून एकमेकांना जगीक न्यायाधीशांकडे नेऊ नये म्हणून पौलाने हे म्हटले असले तरी, यामागचे तत्त्व अगदी स्पष्ट आहे: कोण दोषी आणि कोण निर्दोष हे सिद्ध करण्यापेक्षा सहविश्‍वासूंमधली शांती अधिक महत्त्वाची आहे. हे तत्त्व लक्षात ठेवल्याने, आपल्याला अशा चुकीसाठी माफी मागणे सोपे जाईल जिच्यामुळे आपण एखाद्याचे मन दुखावले असे त्याला किंवा तिला वाटत असेल.

प्रामाणिकता आवश्‍यक

परंतु, काही लोक माफी मागण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या शब्दांचा प्रमाणाबाहेर वापर करतात. उदाहरणार्थ, जपानमध्ये सुमीमासेन हा माफी मागण्यासाठी असलेला सर्वसामान्य शब्द हजारो वेळा ऐकायला मिळतो. आभार व्यक्‍त करण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जाऊ शकतो; त्यावरून दाखवलेल्या कृपेची परतफेड करता येत नसल्यामुळे वाटणारी अस्वस्थ करणारी भावना व्यक्‍त केली जाते. हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वापरला जाऊ शकत असल्यामुळे काहींना कदाचित तो आवश्‍यकतेपेक्षा जास्त वेळा वापरला जातो आणि वापरणारे लोक मनापासून तो वापरतात की नाही असे वाटू शकते. इतर संस्कृतींमध्येही माफी मागण्याच्या विविध शब्दांचा प्रमाणाबाहेर वापर केला जात असेल.

भाषा कोणतीही असो, पण चूक कबूल करतेवेळी ती प्रामाणिकपणे करणे महत्त्वाचे आहे. शब्दांवरून आणि आवाजाच्या स्वरातून खरोखर दुःख झाल्याचे दिसून आले पाहिजे. डोंगरावरील प्रवचनात येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवले: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्‍याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ५:३७) तुम्ही माफी मागत असाल तर ती मनापासून मागा! एक उदाहरण लक्षात घ्या: विमानतळातील एका चेक-इन काउंटरपाशी रांगेत उभ्या असलेल्या एका मनुष्याच्या सामानाचा धक्का त्याच्या मागच्या बाईला लागला तेव्हा त्याने माफी मागितली. काही मिनिटांनी, लोक हळूहळू पुढे सरकू लागले तेव्हा पुन्हा त्या बाईला सुटकेसचा धक्का लागला. पुन्हा एकदा, त्या मनुष्याने अदबीने माफी मागितली. तिसऱ्‍या वेळी, पुन्हा तेच घडले तेव्हा त्या बाईबरोबरच्या माणसाने त्याला म्हटले, तुम्ही खरोखर माफी मागत असाल तर ती बॅग पुन्हा लागायला नको. होय, आपण खरोखर माफी मागतो तेव्हा त्यासोबत ती चूक पुन्हा घडणार नाही असा निश्‍चयही केला पाहिजे.

आपण प्रामाणिकतेने माफी मागत असलो तर त्यामध्ये चूक केल्याची कबुली, क्षमा मागणे आणि होता होईल तितक्या नुकसानाची भरपाई करणे हे समाविष्ट असेल. त्या बदल्यात, दुखावलेल्या व्यक्‍तीने पश्‍चात्तापी अपराध्याला क्षमा करण्यास तयार असले पाहिजे. (मत्तय १८:२१, २२; मार्क ११:२५; इफिसकर ४:३२; कलस्सैकर ३:१३) दोन्ही व्यक्‍ती अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यामधल्या समस्या तत्काळ मिटणार नाहीत. तरीपण, चूक कबूल केल्याने मतभेद मिटवायला बरेच सोपे जाते.

जेव्हा माफी मागणे अनुचित असते

खेद व दिलगिरी व्यक्‍त करणारे शब्द दुखावलेल्या भावनांवर फुंकर घालतात आणि ते शांतीला पोषक असतात हे खरे आहे; पण काही वेळा हे शब्द वापरणे योग्य नसते हे सुज्ञ व्यक्‍ती ओळखते. उदाहरणार्थ, देवाला निष्ठावान असण्याशी याचा संबंध असेल तेव्हा. येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा, “त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:८) पण आपले दुःख दूर करण्यासाठी त्याने आपल्या विश्‍वासांबद्दल पस्तावा व्यक्‍त केला नाही. आणि प्रमुख याजकाने, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र असलास तर आम्हास सांग,” असे त्याला म्हटले तेव्हा त्याने माफी मागितली नाही. घाबरून आपण चूक केली असे म्हणण्याऐवजी येशूने धैर्याने उत्तर दिले: “आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हास सांगतो, ह्‍यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.” (मत्तय २६:६३, ६४) प्रमुख याजकाची मर्जी राखण्यासाठी आपला पिता, यहोवा देव यासोबतची एकनिष्ठा त्यागावी हा विचार देखील येशूच्या मनात आला नाही.

ख्रिस्ती लोक अधिकाऱ्‍यांना आदर आणि सन्मान देतात. तरीही, देवाला आज्ञाधारक राहण्याबद्दल व आपल्या बांधवांवरील प्रेमाबद्दल त्यांना माफी मागण्याची गरज नाही.—मत्तय २८:१९, २०; रोमकर १३:५-७.

शांतीला अडखळणे नसतील

आपला पूर्वज, आदाम याच्याकडून अपरिपूर्णता आणि पाप आपल्याला वारशात प्राप्त झाल्यामुळे आज आपण चुका करतो. (रोमकर ५:१२; १ योहान १:१०) आदामाने आपल्या निर्माणकर्त्याविरुद्ध बंड केल्यामुळे त्याची अशी पापी अवस्था झाली. परंतु, सुरवातीला आदाम आणि हव्वा दोघे परिपूर्ण आणि पापरहित होते आणि देवाने अशाच स्थितीत मानवांना पुन्हा आणण्याचे वचन दिले आहे. तो पाप आणि त्याचे सर्व परिणाम काढून टाकेल.—१ करिंथकर १५:५६, ५७.

याचा काय अर्थ होईल याचा विचार करा! जिभेच्या वापराविषयी दिलेल्या सल्ल्यात येशूचा सावत्र भाऊ, याकोब, म्हणाला: “कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यांत ठेवण्यास समर्थ आहे.” (याकोब ३:२) एक परिपूर्ण व्यक्‍ती आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकतो ज्यामुळे तिचा गैरवापर केल्याबद्दल त्याला माफी मागावी लागत नाही. तो “सर्व शरीरहि कह्‍यात ठेवण्यास समर्थ आहे.” परिपूर्ण बनणे किती अद्‌भुत असेल! तेव्हा आपापसांतील शांतीपूर्ण संबंधांत कधीही वितुष्टे येणार नाहीत. पण तोपर्यंत, आपल्या हातून घडलेल्या चुकीबद्दल प्रामाणिकतेने आणि योग्य पद्धतीने माफी मागितल्याने मतभेद मिटवायला बरीच मदत होऊ शकते.

[तळटीप]

^ परि. 8 पौलाला नीट दिसत नसल्यामुळे त्याला प्रमुख याजकाला ओळखता न आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

[५ पानांवरील चित्र]

पौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

[७ पानांवरील चित्र]

सर्वजण परिपूर्ण होतील तेव्हा शांतीला अडखळणे नसतील