व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?

रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?

“एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार . . . दिले.”—मत्त. २५:१५.

१, २. येशूने रुपयांचा दाखला का सांगितला होता?

येशूने आपल्या अभिषिक्त अनुयायांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी रुपयांचा दाखला सांगितला होता. पण, खरंतर या दाखल्याचा येशूच्या सर्वच शिष्यांशी संबंध आहे. त्यामुळे, आपली आशा स्वर्गातील जीवनाची असो अथवा पृथ्वीवरील, आपण सर्वांनीच या दाखल्याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे.

येशूने हा दाखला केव्हा सांगितला होता? शिष्यांना एका चिन्हाबद्दल सांगतानाच येशूने हा रुपयांचा दाखला सांगितला होता. त्या चिन्हावरून दिसून येणार होतं, की तो राजा बनला आहे आणि शेवटल्या काळाची सुरवात झाली आहे. (मत्त. २४:३) त्यामुळे, रुपयांचा दाखला हा त्या चिन्हाचाच एक भाग आहे आणि आज आपल्या काळात त्याची पूर्णता होत आहे.

३. मत्तय २४ व २५ अध्यायांतून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळतात?

रुपयांच्या दाखल्यासोबतच येशूने आणखी तीन दाखले सांगितले. हे दाखलेसुद्धा शेवटल्या काळाच्या चिन्हाचाच भाग होते. या सर्व दाखल्यांतून येशूने अशा काही खास गुणांकडे लक्ष वेधलं, जे त्याच्या अनुयायांमध्ये असणं गरजेचं आहे. मत्तय २४:४५ ते २५:४६ या वचनांत आपल्याला हे सर्व दाखले वाचायला मिळतात. यांतील पहिला दाखला विश्वासू दासाबद्दल आहे. हा दास अभिषिक्त जनांचा एक लहान गट असून यहोवाच्या लोकांना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या अभिषिक्त बांधवांनी विश्वासू बुद्धिमान असणं गरजेचं आहे. * त्यानंतरचा दाखला दहा कुमारींबद्दल आहे. या दाखल्यातून येशूने सर्वच अभिषिक्त जनांना एक इशारा दिला. येशूच्या येण्याचा नेमका दिवस आणि घटका माहीत नसल्यामुळे त्यांनी नेहमी तयार आणि जागृत असलं पाहिजे हे या दाखल्यातून त्याने स्पष्ट केलं. * यानंतर, येशूने रुपयांचा दाखला सांगितला. या दाखल्याद्वारे त्याने सर्व अभिषिक्त जनांना त्यांच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या बाबतीत परिश्रमी वृत्ती दाखवणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं. शेवटी, येशूने शेरडांचा व मेंढरांचा दाखला सांगितला. हा दाखला खासकरून पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांना लागू होतो. त्यांनीदेखील एकनिष्ठ असलं पाहिजे आणि ख्रिस्ताच्या अभिषिक्त बांधवांना साहाय्य करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे, यावर येशूने या दाखल्यात जोर दिला. * या लेखात आपण रुपयांच्या दाखल्याचा काय अर्थ होतो हे पाहणार आहोत.

एक माणूस आपल्या दासांना पुष्कळ पैसे देतो

४, ५. दाखल्यातील माणूस कोणाला सूचित करतो आणि एका टॅलेंटॉनची किंमत किती होती?

मत्तय २५:१४-३० वाचा. रुपयांच्या दाखल्यात येशू परदेशी जाणाऱ्या एका माणसाबद्दल सांगतो. अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका दाखल्यात येशूने राज्य मिळवण्याच्या उद्देशानं दूर देशी जाणाऱ्या एका माणसाबद्दल सांगितलं होतं. * (लूक १९:१२) या दोन्ही दाखल्यांतील माणूस येशूला सूचित करतो आणि तो इ.स. ३३ मध्ये स्वर्गात गेला असं आपल्या प्रकाशनांमध्ये बऱ्याच वर्षांपासून सांगण्यात आलं आहे. पण ३३ साली स्वर्गात गेल्यावर येशू लगेच राजा बनला नाही. तर त्याचे वैरी त्याचे “पदासन होईपर्यंत,” म्हणजेच १९१४ पर्यंत त्याला वाट पाहावी लागली.—इब्री १०:१२, १३.

दाखल्यातील माणसाजवळ आठ हजार रुपये होते असं आपण वाचतो. ही खरंतर फार मोठी रक्कम होती. * परदेशी जाण्याआधी तो माणूस हे पैसे आपल्या दासांना सोपवतो. आणि या पैशांनी व्यापार करून आणखी पैसे मिळवण्यास त्यांना सांगतो. त्या माणसाचा पैसा ज्याप्रमाणे त्याच्यासाठी अतिशय मौल्यवान होता, त्याचप्रमाणे, येशूसाठीदेखील एक गोष्ट फार मौल्यवान होती. ती कोणती? ती गोष्ट म्हणजे त्याने पृथ्वीवर असताना केलेलं कार्य.

६, ७. दाखल्यातील पैसे कशाला सूचित करतात?

प्रचाराचं काम येशूसाठी खूप महत्त्वाचं होतं. त्याने केलेल्या प्रचार कार्यामुळे अनेक जण त्याचे शिष्य बनले. (लूक ४:४३ वाचा.) पण अजूनही बरंच कार्य बाकी आहे आणि आणखी बरेच लोक सुवार्ता ऐकून शिष्य बनतील हेही येशूला माहीत होतं. म्हणूनच त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं: “आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.” (योहा. ४:३५-३८) कोणताही चांगला शेतकरी कापणीला आलेल्या शेतातलं काम अर्धवट सोडणार नाही. प्रचारकार्याच्या बाबतीत येशूचीही अशीच मनोवृत्ती होती. म्हणूनच, स्वर्गात परत जाण्याआधी त्याने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” (मत्त. २८:१८-२०) ही आज्ञा देऊन येशूने एका अर्थानं त्यांना एक अतिशय मौल्यवान संपत्ती सोपवली होती. ही संपत्ती म्हणजे प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी.—२ करिंथ. ४:७.

दासांना पैसे सोपवणाऱ्या माणसाप्रमाणेच, येशूने आपल्या अभिषिक्त अनुयायांवर शिष्य बनवण्याचं कार्य सोपवलं. (मत्त. २५:१४) तेव्हा, दासांना देण्यात आलेले पैसे प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या जबाबदारीला सूचित करतात.

८. प्रत्येक दासाला वेगळी रक्कम मिळाली तरीसुद्धा मालकाची काय अपेक्षा होती?

दाखल्यातील मालक पहिल्या दासाला पाच हजार, दुसऱ्याला दोन हजार आणि तिसऱ्याला एक हजार रुपये देतो असं येशूने सांगितलं. (मत्त. २५:१५) अशा रीतीनं तो मालक प्रत्येक दासाला वेगळी रक्कम देतो. पण, प्रत्येकानं व्यापार करून ते पैसे वाढवण्याचा होईल तितका प्रयत्न करावा अशी त्याची अपेक्षा असते. त्याच प्रकारे, आपल्या अभिषिक्त अनुयायांनी प्रचाराचं कार्य पार पाडण्याचा होईल तितका प्रयत्न करावा अशी येशूची अपेक्षा होती. (मत्त. २२:३७; कलस्सै. ३:२३) ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूच्या अनुयायांनी सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवण्यास सुरवात केली. बायबलमध्ये जेव्हा आपण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक वाचतो, तेव्हा त्या सुरवातीच्या शिष्यांनी प्रचाराच्या कार्यात किती मेहनत घेतली होती, हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येतं. *प्रे. कृत्ये ६:७; १२:२४; १९:२०.

दास शेवटल्या काळात व्यापार करतात

९. (क) दोन विश्वासू दासांनी मालकाच्या पैशांचा कसा वापर केला, आणि यावरून आपण काय शिकू शकतो? (ख) पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्यांनी काय केलं पाहिजे?

मालकाच्या पैशांचा चांगला वापर करणारे पहिले दोन दास शेवटल्या काळातील विश्वासू अभिषिक्त भावांना व बहिणींना सूचित करतात. विशेषतः १९१९ पासून त्यांनी जीव ओतून प्रचाराचं कार्य केलं आहे. दाखल्यात मालकाचे पैसे वाढवणाऱ्या दोन दासांना वेगवेगळ्या रकमा देण्यात आल्या होत्या. पण, विश्वासू अभिषिक्त जनांचे दोन वेगवेगळे गट आहेत असा याचा अर्थ होत नाही. मुद्दा हा आहे, की त्या दासांनी मेहनत घेऊन मालकाचे पैसे दुप्पट केले. पण मग, फक्त अभिषिक्तांनीच प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात मेहनत घ्यावी, असं या दाखल्यात सुचवण्यात आलं आहे का? नाही. शेरडांच्या व मेंढरांच्या दाखल्यातून ही गोष्ट स्पष्ट होते, की पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्यांनी अभिषिक्त बांधवांना प्रचारकार्यात हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अभिषिक्त बांधवांना मदत करणं हा खरंतर एक बहुमान आहे, असं दुसऱ्या मेंढरांतील सदस्यांना वाटतं. मुळात, यहोवाचे लोक आज प्रचाराचं व शिष्य बनवण्याचं कार्य पार पाडण्यासाठी “एक कळप” या नात्याने मेहनत घेत आहेत.—योहा. १०:१६.

१०. आपण शेवटल्या काळात राहत आहोत हे कोणत्या गोष्टीवरून स्पष्टपणे दिसून येतं?

१० आपल्या सर्वच अनुयायांनी प्रचारकार्यात मेहनत घेऊन जास्तीत जास्त लोकांना शिष्य बनवावं अशी येशूची अपेक्षा आहे. आणि पहिल्या शतकातील त्याच्या शिष्यांनी अगदी हेच केलं. पण, रुपयांच्या दाखल्याची पूर्णता तर या शेवटल्या काळात होत आहे. मग, आजही येशूचे अनुयायी हे कार्य करत आहेत का? हो नक्कीच करत आहेत. खरंतर, इतर कोणत्याही काळाच्या तुलनेत आज सर्वात जास्त प्रमाणात सुवार्ता सांगितली जात आहे. येशूचे सर्वच अनुयायी घेत असलेल्या मेहनतीमुळे दरवर्षी लाखो लोक बाप्तिस्मा घेत आहेत! आणि पुढे हे नवीन शिष्यसुद्धा प्रचाराच्या कार्यात सहभागी होतात. शेवटल्या काळाचे चिन्ह सांगताना येशूने प्रचाराचं कार्यदेखील त्या चिन्हाचा एक महत्त्वाचा भाग असेल असं सांगितलं होतं. आज मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं प्रचाराचं काम आणि त्यामुळे होणाऱ्या चांगल्या परिणामांवरून आपण शेवटल्या काळात राहत आहोत हे स्पष्टपणे दिसून येतं. आपले अनुयायी करत असलेले परिश्रम पाहून येशूला खूप आनंद होत असेल, यात काहीच शंका नाही!

ख्रिस्ताने आपल्या सेवकांना प्रचार करण्याची आज्ञा देऊन त्यांच्या हाती एक मौल्यवान संपत्ती सोपवली (परिच्छेद १० पाहा)

मालक हिशोब घ्यायला केव्हा येईल?

११. येशू मोठ्या संकटादरम्यान येईल असं आपण कशावरून म्हणू शकतो?

११ येशूने म्हटलं: “बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला.” (मत्त. २५:१९) हे शब्द केव्हा पूर्ण होतील? येशू मोठ्या संकटाच्या शेवटास येईल तेव्हा हे शब्द पूर्ण होतील. आपण असं का म्हणू शकतो? मत्तय २४ आणि २५ या अध्यायांत केलेल्या भविष्यवाणीत येशूने अनेकवेळा आपल्या येण्याविषयी उल्लेख केला. उदाहरणार्थ, तो म्हणाला की लोक “मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन . . . येताना पाहतील.” मोठ्या संकटादरम्यान येशू लोकांचा न्याय करण्यासाठी येईल तेव्हा हे घडेल. त्याच प्रकारे, येशूने शेवटल्या काळात राहणाऱ्या त्याच्या अनुयायांना जागृत राहण्याविषयी अशी ताकीद दिली: “कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” तसंच, “तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्त. २४:३०, ४२, ४४) त्याअर्थी, दाखल्यातील मालक हिशोब घेण्यासाठी येतो असं येशूने म्हटलं, तेव्हा तो त्या काळाबद्दल बोलत होता जेव्हा तो लोकांचा न्याय करण्याकरता आणि सैतानाच्या जगाचा नाश करण्याकरता येईल. *

१२, १३. (क) मालक दोन विश्वासू सेवकांना काय म्हणतो, आणि का? (ख) अभिषिक्त जनांवर शेवटला शिक्का केव्हा मारला जातो? (“ मृत्यूच्या वेळी योग्य ठरवण्यात आलेले,” असं शीर्षक असलेली चौकटदेखील पाहा.) (ग) ज्यांनी अभिषिक्तांना सहकार्य केलं त्यांना कोणतं प्रतिफळ मिळेल?

१२ मालक प्रवासावरून परत आला तेव्हा त्याला समजलं की ज्याला पाच हजार रुपये दिले होते, त्या दासानं आणखी पाच हजार कमवले होते; आणि ज्याला दोन हजार रुपये दिले होते त्याने आणखी दोन हजार कमवले होते. या दोन्ही दासांना मालकानं असं म्हणून शाबासकी दिली: “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन.” (मत्त. २५:२१, २३) मालक, म्हणजेच येशू भविष्यात येईल तेव्हा तो काय करेल?

१३ मोठ्या संकटाच्या अगदी थोड्या काळाआधी यहोवा देव अद्याप पृथ्वीवर असलेल्या विश्वासू अभिषिक्त जनांना त्यांच्या परिश्रमांबद्दल शाबासकी देईल. म्हणजेच, त्यांच्यावर शेवटला शिक्का मारला जाईल. (प्रकटी. ७:१-३) यानंतर, हर्मगिदोन सुरू होण्याआधी त्यांचं स्वर्गात पुनरुत्थान करण्याद्वारे येशू त्यांना प्रतिफळ देईल. पण, ज्यांनी प्रचाराच्या कार्यात अभिषिक्त जनांना सहकार्य केलं त्या पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांबद्दल काय? येशू त्यांना मेंढरांमध्ये मोजेल आणि देवाच्या राज्यात त्यांना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाचं प्रतिफळ मिळेल.—मत्त. २५:३४.

दुष्ट व आळशी दास

१४, १५. अभिषिक्तांपैकी बरेच जण दुष्ट व आळशी बनतील असं येशूला म्हणायचं होतं का? स्पष्ट करा.

१४ रुपयांच्या दाखल्यात, एक हजार रुपये देण्यात आलेल्या दासाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या दासाने व्यापार करून मालकाचे पैसे वाढवले नाहीत किंवा ते सावकाराकडे ठेवून त्यावर व्याजही मिळवलं नाही. उलट, त्याने ते पैसे जमिनीत लपवून ठेवले. मालकानं या दासाला दुष्ट व आळशी म्हटलं. त्याने दुष्ट दासाकडून एक हजार रुपये घेऊन ते पहिल्या दासाला दिले. मग त्याने दुष्ट दासाला “बाहेरील अंधारात” टाकले जिथं तो जोरजोराने रडू लागला.—मत्त. २५:२४-३०; लूक १९:२२, २३.

१५ दाखल्यात तीन दासांपैकी एक जण दुष्ट व आळशी होता. पण, अभिषिक्तांपैकी एक तृतीयांश त्या दुष्ट दासासारखे बनतील असं येशूला सुचवायचं नव्हतं. ही गोष्ट आपल्याला या दाखल्याची तुलना येशूच्या दुसऱ्या दोन दाखल्यांशी केल्यावर समजते. विश्वासू व बुद्धिमान दासाच्या दाखल्यातही येशूने एका दुष्ट दासाचा उल्लेख केला होता. हा दास इतर दासांचा छळ करतो. पण, ज्या अभिषिक्त जनांपासून हा विश्वासू व बुद्धिमान दास बनलेला आहे, ते या दुष्ट दासासारखे बनतील असं येशूला म्हणायचं नव्हतं. उलट, त्यांनी या दुष्ट दासासारखं बनू नये अशी ताकीद येशू त्यांना देत होता. तसंच, दहा कुमारींच्या दाखल्यातसुद्धा येशूने पाच मूर्ख कुमारींचा उल्लेख केला होता. पण, अभिषिक्तांपैकी अर्धे मूर्ख कुमारींसारखे वागतील असं त्याला सांगायचं नव्हतं. उलट, त्यांनी तयार व जागृत राहून त्याची वाट न पाहिल्यास काय घडू शकतं याबद्दल तो इशारा देत होता. * त्याच प्रकारे या रुपयांच्या दाखल्यातही, शेवटल्या काळात अभिषिक्त जनांपैकी बरेच जण दुष्ट व आळशी असतील असं येशूला सांगायचं नव्हतं. याउलट, अभिषिक्त जनांनी परिश्रमी वृत्तीनं प्रचाराचं कार्य करत राहावं आणि दुष्ट दासासारखं होऊ नये अशी ताकीद येशूने त्यांना दिली.—मत्त. २५:१६.

१६. (क) रुपयांच्या दाखल्यातून आपण कोणत्या दोन गोष्टी शिकलो? (ख) रुपयांचा दाखला समजून घेण्यासाठी या लेखानं आपल्याला कशा प्रकारे मदत केली आहे? (“ रुपयांच्या दाखल्याचा अर्थ” या शीर्षकाची चौकट पाहा.)

१६ रुपयांच्या दाखल्यातून आपण कोणत्या दोन गोष्टी शिकलो? पहिली म्हणजे, येशूने आपल्या अभिषिक्त शिष्यांना एक अतिशय मौल्यवान संपत्ती, म्हणजेच प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, प्रचाराच्या कार्यात आपण मेहनत घ्यावी अशी येशू आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. या कार्यात आपण शेवटपर्यंत विश्वासूपणे टिकून राहिलो, आणि येशूला आज्ञाधारक व एकनिष्ठ राहिलो तर तो आपल्याला प्रतिफळ देईल याची पूर्ण खात्री आपण बाळगू शकतो.—मत्त. २५:२१, २३, ३४.

^ परि. 3 टेहळणी बुरूज, १५ जुलै २०१३ अंकातील पृष्ठे २१-२२, परिच्छेद ८-१० यांत विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे हे स्पष्ट करण्यात आलं होतं.

^ परि. 3 दहा कुमारी कोणाला सूचित करतात हे याआधीच्या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे.

^ परि. 3 शेरडांचा व मेंढरांचा दाखला टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर १९९५ अंकातील पृष्ठे २३-२८ वर, तसंच पुढील लेखात स्पष्ट करण्यात आला आहे.

^ परि. 5 मराठी बायबलमध्ये या दाखल्यात ५,००० रुपये, २,००० रुपये आणि १,००० रुपये असं म्हटलेलं आहे. पण मूळ ग्रीक भाषेत या दाखल्यात टॅलेंटॉन या प्राचीन चलनाचा उल्लेख केला आहे. दासांना ५, २ आणि १ टॅलेंटॉन देण्यात आला असं तिथं सांगितलं आहे. येशूच्या काळात फक्त एक टॅलेंटॉनइतकी रक्कम मिळवण्यासाठी एका सर्वसाधारण मजुराला जवळजवळ २० वर्षं काम करावं लागायचं.

^ परि. 8 प्रेषितांच्या मृत्यूनंतर काही काळातच धर्मत्यागाला सुरवात झाली आणि हळूहळू सर्व मंडळ्यांमध्ये खोट्या शिकवणी पसरल्या. यानंतर अनेक शतकांपर्यंत प्रचाराचं काम जवळजवळ बंदच पडलं होतं. पण “कापणीच्या” काळात म्हणजेच शेवटल्या काळात प्रचाराचं काम पुन्हा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. (मत्त. १३:२४-३०, ३६-४३) टेहळणी बुरूज, १५ जुलै २०१३ अंकातील पृष्ठे ९-१२ पाहा.

^ परि. 15 या अंकात, “तुम्ही जागृत राहाल का?” या लेखातील परिच्छेद १३ पाहा.