एक चांगलं भविष्य—सगळ्यांचीच इच्छा
आपलं भविष्य चांगलं असावं असं सगळ्यांनाच वाटतं, नाही का? आपल्या सगळ्यांची हीच इच्छा असते, की आपल्या कुटुंबाने सुखासमाधानात राहावं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी असू नये.
पण अशा प्रकारचं भविष्य खरंच मिळवता येईल का, अशी शंका अनेकांना वाटते. कारण अचानक आलेली संकटं त्यांनी पाहिली आहेत. उदाहरणार्थ, कोव्हिड-१९ महामारीमुळे काय घडलं, हे त्यांनी पाहिलं आहे. अचानक लोकांचं जीवन विस्कळीत झालं, नोकरी-धंद्यावर त्याचा परिणाम झाला आणि अनेकांनी आपला जीव गमावला. त्यामुळे येणारे दिवस कसे असतील अशी चिंता अनेकांना भेडसावते.
त्यामुळे ते असं काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे त्यांचे येणारे दिवस चांगले असतील. त्यासाठी काही लोक दैवी शक्तींकडे वळतात आणि नशिबात काय लिहिलंय, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. तर काही जण शिक्षणावर आणि धनसंपत्तीवर आपला विश्वास ठेवतात. या गोष्टी आपल्याला हवं ते मिळवून देतील असं त्यांना वाटतं. तर असेही काही जण आहेत ज्यांना असं वाटतं, की आपण सत्कर्मं केली तर आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील.
यापैकी कुठलाही पर्याय तुम्हाला चांगलं भविष्य मिळवून देईल का? याचं उत्तर मिळवण्यासाठी पुढे दिलेल्या प्रश्नांवर विचार करा:
तुमचं भविष्य कशावर अवलंबून आहे?
शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?
सत्कर्मं करत राहिल्यामुळे पुढे चांगलं आयुष्य जगता येईल का?
एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टेहळणी बुरूज मासिकाच्या या अंकात मिळतील.