व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग

खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग

“जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्‍त केलं तरच तुम्ही खऱ्‍या अर्थाने मुक्‍त व्हाल.”—योहा. ८:३६.

गीत क्रमांक: ३२, ५२

१, २. (क) लोक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सहसा काय करतात? (ख) अशा प्रयत्नांचा काय परिणाम होतो?

आज जगभरात बऱ्‍याच ठिकाणी आपण सहसा लोकांना समान हक्काबद्दल आणि स्वातंत्र्य मिळवण्याबद्दल बोलताना ऐकतो. काही लोकांना अन्याय, भेदभाव आणि गरिबी यांपासून सुटका हवी असते. तर इतर काहींना व्यक्‍त होण्याचं, निवड करण्याचं आणि मनाप्रमाणे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. आज जवळजवळ सगळेच स्वातंत्र्य मिळवण्याच्या मागे आहेत.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक सहसा रस्त्यावर उतरून आपला निषेध दर्शवतात आणि काही वेळा तर आंदोलनंही करतात. पण हे सगळं केल्याने त्यांना हवं असलेलं स्वातंत्र्य मिळतं का? मुळीच नाही. उलट यामुळे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो आणि काही वेळा तर ते आपला जीवही गमावतात. शलमोन राजाने उपदेशक ८:९ मध्ये लिहिलेले शब्द आजच्या काळात अगदी खरे ठरत आहेत. त्याने म्हटलं: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”

३. खऱ्‍या अर्थाने आनंदी आणि समाधानी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

खऱ्‍या अर्थाने आनंदी आणि समाधानी होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे बायबल आपल्याला सांगतं. प्रेषित याकोबने म्हटलं: “जो कोणी स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने परीक्षण करतो आणि त्याचे पालन करत राहतो . . . त्याला आनंद मिळेल.” (याको. १:२५) परिपूर्ण नियम यहोवाकडून मिळतो. तसंच, काय केल्याने आपण आनंदी व समाधानी होऊ हेही त्याला माहीत आहे. यहोवाने आदाम आणि हव्वाला खरं स्वातंत्र्य दिलं होतं आणि आनंदी होण्यासाठी लागणाऱ्‍या सर्व गोष्टीही त्यांना दिल्या होत्या.

मानवाजवळ खऱ्‍या अर्थाने स्वातंत्र्य होतं तेव्हा

४. आदाम-हव्वाला कशा प्रकारचं स्वातंत्र्य होतं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

उत्पत्ती पुस्तकाच्या १ आणि २ अध्यायांमध्ये आदाम आणि हव्वाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आपल्याला कळतं. त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्याजवळ होत्या, त्यांना कशाचीही भीती नव्हती आणि कोणीही त्यांच्यावर अन्याय करू शकत नव्हतं. त्यांना अन्‍नाची, कामाची, आजारांची किंवा मृत्यूची चिंता करण्याची काहीच गरज नव्हती. (उत्प. १:२७-२९; २:८, ९, १५) आज असं स्वातंत्र्य मिळवण्याचं लोक फक्‍त स्वप्नंच पाहू शकतात. पण याचा अर्थ त्यांना कोणत्याही मर्यादा नसलेलं स्वातंत्र्य होतं का? आता आपण या प्रश्‍नाचं उत्तर पाहू या.

५. लोकांचं मत वेगवेगळं असलं तरीही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय असणं गरजेचं आहे?

बऱ्‍याच लोकांना वाटतं की परिणामांचा विचार न करता मनासारखं वागण्याचा हक्क असणं, म्हणजेच खरं स्वातंत्र्य. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया मध्ये म्हटलं आहे की स्वातंत्र्य म्हणजे “निवड करण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची क्षमता.” पण यासोबतच त्यात हेदेखील म्हटलं आहे की जर एखाद्या सरकारने लोकांवर अन्यायी, अनावश्‍यक किंवा अवाजवी मर्यादा लादल्या नाहीत तर त्याला स्वातंत्र्य म्हणता येईल. याचा अर्थ प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काही प्रमाणात मर्यादा घालणं गरजेचं आहे. पण मग प्रश्‍न येतो की एखादी मर्यादा ही रास्त, आवश्‍यक आणि वाजवी आहे हे ठरवण्याचा हक्क कोणाला आहे?

६. (क) फक्‍त यहोवालाच पूर्ण स्वातंत्र्य का आहे? (ख) मानवांना कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळू शकतं आणि का?

फक्‍त यहोवा देवाजवळच मर्यादा नसलेलं म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्य आहे ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. असं का? कारण यहोवानेच सर्व गोष्टींची रचना केली आणि तोच या विश्‍वाचा सर्वसमर्थ शासक आहे. (१ तीम. १:१७; प्रकटी. ४:११) दावीद राजाने यहोवाच्या अधिकाराचं वर्णन खूप सुंदर शब्दांत केलं. (१ इतिहास २९:११, १२ वाचा.) यहोवाला सोडून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक सृष्टीला काही मर्यादा आहेत. यालाच आपण मर्यादित स्वातंत्र्य असं म्हणू शकतो. एखादी मर्यादा रास्त, आवश्‍यक आणि वाजवी आहे हे ठरवण्याचा हक्क फक्‍त यहोवा देवालाच आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनी लक्षात घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. सुरुवातीपासूनच यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींना काही मर्यादा घालून दिल्या होत्या.

७. आनंदी होण्यासाठी आपल्याला कोणत्या काही गोष्टी कराव्या लागतात?

आदाम आणि हव्वाला बऱ्‍याच बाबतीत स्वातंत्र्य असलं तरी त्याला काही मर्यादा होत्या. यांपैकी काही तर अगदी स्वाभाविक होत्या. उदाहरणार्थ, जिवंत राहण्यासाठी त्यांना श्‍वास घेण्याची, अन्‍न सेवन करण्याची आणि झोप घेण्याची गरज होती. याचा अर्थ त्यांना स्वातंत्र्य नव्हतं का? असं नाही. उलट या गोष्टी करण्यात त्यांना आनंद आणि समाधान मिळावं याची यहोवाने व्यवस्था केली. (स्तो. १०४:१४, १५; उप. ३:१२, १३) आपण सर्व जण स्वच्छ हवा, आपल्या आवडीचं जेवण आणि रात्रीची शांत झोप याचा आनंद घेतो. या गोष्टी करताना आपल्याला कधीही बंधनात असल्यासारखं वाटत नाही. आदाम-हव्वालाही आपल्यासारखंच वाटलं असेल.

८. यहोवाने आदाम-हव्वाला कोणती विशिष्ट आज्ञा दिली होती आणि का?

यहोवाने आदाम-हव्वाला एक विशिष्ट आज्ञा दिली होती. त्याने त्यांना मुलांना जन्म देऊन पृथ्वी भरून टाकण्याची आणि तिची काळजी घेण्याची आज्ञा दिली. (उत्प. १:२८) या आज्ञेमुळे यहोवाने त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं का? नाही. यामुळे पूर्ण पृथ्वीचं नंदनवनात रूपांतर करण्याची चांगली संधी त्यांना मिळाली. एक असं घर जिथे ते आणि त्यांची परिपूर्ण मुलं सदासर्वकाळ राहू शकली असती. हा यहोवाचा उद्देश होता. (यश. ४५:१८) आज अविवाहित राहिल्याने किंवा मुलं न होऊ दिल्याने लोक, देवाने आदाम-हव्वाला दिलेली आज्ञा मोडत नाहीत. पण तरीही लोक लग्न करतात आणि मुलांना जन्म देतात. अर्थात यामुळे त्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. (१ करिंथ. ७:३६-३८) तरीही ते असं का करतात? कारण त्यांना आनंद आणि समाधान मिळवायचा असतो. (स्तो. १२७:३) आदाम-हव्वाने यहोवाची आज्ञा पाळली असती तर ते आणि त्यांचं कुटुंब सदासर्वकाळाच्या जीवनाचा आनंद घेऊ शकले असते.

खरं स्वातंत्र्य मानवांनी कसं गमावलं?

९. उत्पत्ती २:१७ मध्ये यहोवाने दिलेली आज्ञा ही अनावश्‍यक, अन्यायी किंवा अवाजवी नव्हती असं का म्हणता येईल?

यहोवाने आदाम-हव्वाला आणखी एक आज्ञा दिली होती आणि ती मोडल्याचे काय परिणाम होतील हेदेखील त्यांना सांगितलं होतं. यहोवाने म्हटलं: “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्प. २:१७) ही आज्ञा अनावश्‍यक किंवा अवाजवी होती का? देव त्यांच्यावर अन्याय करत होता का? यामुळे आदाम-हव्वाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं का? मुळीच नाही. उलट या आज्ञेबद्दल बरेच बायबल विद्वान म्हणतात की ही खूप सुज्ञ आणि योग्य आज्ञा होती. त्यांपैकी एका विद्वानाने म्हटलं की मानवजातीसाठी ‘बरं’ काय आणि वाईट काय हे फक्‍त देवालाच माहीत आहे. ‘बरं’ किंवा चांगलं मिळवण्यासाठी मानवांनी देवावर भरवसा ठेवला पाहिजे आणि त्याच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. त्यांनी आज्ञा मोडली तर मग बरं किंवा चांगलं काय हे त्यांना ठरवावं लागेल आणि याचे परिणाम कधीच चांगले नसणार. चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवणं स्वतः मानवांना शक्य नाही.

आदाम-हव्वाच्या निर्णयामुळे भयंकर परिणाम ओढवले! (परिच्छेद ९-१२ पाहा)

१०. इच्छास्वातंत्र्य आणि बरंवाईट ठरवण्याचा हक्क यात फरक आहे असं का म्हणता येईल?

१० यहोवाने आदामला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही असं काही लोकांना वाटू शकतं. पण असे लोक हे विसरतात की इच्छास्वातंत्र्य किंवा निवड करण्याचा हक्क आणि चांगलं काय व वाईट काय हे ठरवण्याचा हक्क, यामध्ये मोठा फरक आहे. देवाची आज्ञा पाळायची की नाही हे ठरवण्याचा हक्क आदाम-हव्वाला होता. पण चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याचा हक्क फक्‍त यहोवालाच आहे. आदाम-हव्वासाठी “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड” यहोवाच्या हक्काचं प्रतीक होतं. (उत्प. २:९) आपण निवड करतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतील हे आपल्याला नेहमीच माहीत नसतं. तसंच, एखाद्या निर्णयाचा परिणाम चांगलाच होईल असंही आपण खात्रीने म्हणू शकत नाही. यामुळे बऱ्‍याच वेळा आपण पाहतो की लोक चांगल्या हेतूने निवड करतात किंवा निर्णय तर घेतात, पण त्याचा परिणाम मात्र वाईट होतो आणि त्यामुळे संकट ओढवतं. (नीति. १४:१२) यावरून आपल्याला समजतं की मानवांना मर्यादा आहेत. आदाम-हव्वाला फळ न खाण्याची आज्ञा देऊन यहोवाने त्यांना हे शिकवलं की खरं स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. मग आदाम आणि हव्वाने काय निवडलं?

११, १२. आदाम-हव्वाच्या निर्णयामुळे संकट का ओढवलं? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

११ आदाम-हव्वाने यहोवाची आज्ञा मोडण्याचा निर्णय घेतला. सैतानाने हव्वाला असं वचन दिलं: “तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” हव्वाने त्याचं ऐकायचं ठरवलं. (उत्प. ३:५) सैतानाने सांगितल्याप्रमाणे आदाम-हव्वाला जास्त स्वातंत्र्य मिळालं का? मुळीच नाही. उलट देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळलं. (उत्प. ३:१६-१९) असं का झालं? कारण स्वतःसाठी बरंवाईट ठरवण्याचं स्वातंत्र्य यहोवाने मानवांना कधीच दिलं नव्हतं.—नीतिसूत्रे २०:२४; यिर्मया १०:२३ वाचा.

१२ हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विमान चालवणाऱ्‍या एका पायलटचा विचार करा. ठरवलेल्या ठिकाणी सुरक्षित रीत्या पोहोचण्यासाठी तो विमानात असलेल्या दिशा दाखवणाऱ्‍या यंत्रांचा उपयोग करतो. तसंच, तो दिशा दाखवणाऱ्‍या लोकांच्या संपर्कातही असतो. ते त्याला वेळोवेळी हवामानाबद्दल, इतर विमानांबद्दल मार्गदर्शन देत असतात. पण जर पायलटने याकडे दुर्लक्ष केलं आणि हवं त्या दिशेला गेला तर काय होईल? यामुळे दुर्घटना होईल. या पायलटसारखंच आदाम-हव्वाला आपल्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायचे होते. त्यांनी देवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलं. याचा परिणाम काय झाला? मानवजातीवर संकट ओढवलं. त्यांच्या निर्णयामुळे त्यांना आणि त्यांच्या मुलांना पाप व मृत्यूला सामोरं जावं लागलं. (रोम. ५:१२) स्वतः बरंवाईट ठरवण्याचा प्रयत्न करून आदाम-हव्वाला जास्त स्वातंत्र्य मिळालं नाही. याउलट यहोवाने दिलेलं खरं स्वातंत्र्य त्यांनी गमावलं.

खरं स्वातंत्र्य कसं मिळवाल

१३, १४. आपण खरं स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो?

१३ काही लोकांना वाटतं की कोणत्याही मर्यादा नसलेलं स्वातंत्र्य असणंच सर्वात चांगलं आहे. पण हे फायद्याचं आहे का? स्वातंत्र्य असणं चांगलं आहे, पण जर काहीच मर्यादा नसल्या तर या जगाची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करा. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया म्हणतं की प्रत्येक संघटित समाजाचे नियम हे गुंतागुंतीचे असतात. यामुळे लोकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण तर होतंच, पण यासोबतच त्यांच्या स्वातंत्र्याला काही मर्यादाही घालता येतात. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. म्हणूनच प्रत्येक देशात बरेच नियम-कायदे असतात आणि ते समजवण्यासाठी व लागू करण्यासाठी अनेक वकील व न्यायाधीशही असतात.

१४ खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे येशूने सांगितलं. त्याने म्हटलं: “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्‍या अर्थाने माझे शिष्य ठराल, आणि तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल.” (योहा. ८:३१, ३२) याचाच अर्थ खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करण्याची गरज आहे. पहिली, आपल्याला येशूने शिकवलेली सत्यं स्वीकारण्याची गरज आहे. आणि दुसरी, आपल्याला त्याचे शिष्य बनण्याची गरज आहे. या दोन गोष्टी केल्यामुळे आपल्याला खऱ्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. पण हे स्वातंत्र्य कोणत्या गोष्टीपासून असेल? येशूने म्हटलं: “जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.” त्याने पुढे म्हटलं: “जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्‍त केलं तरच तुम्ही खऱ्‍या अर्थाने मुक्‍त व्हाल.”—योहा. ८:३४, ३६.

१५. येशूने दिलेल्या वचनामुळे आपल्याला “खऱ्‍या अर्थाने” स्वातंत्र्य कसं मिळेल?

१५ येशूने आपल्या शिष्यांना जे स्वातंत्र्य देण्याचं वचन दिलं, ते आज बऱ्‍याच लोकांना हवं असलेल्या स्वातंत्र्यापेक्षा खूप उत्तम आहे. “जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्‍त केलं तरच तुम्ही खऱ्‍या अर्थाने मुक्‍त व्हाल” असं जेव्हा येशूने म्हटलं तेव्हा तो पापाच्या दास्यातून मिळणाऱ्‍या सुटकेविषयी बोलत होता. मानवजातीने आजपर्यंत अनुभवलेल्या गुलामीच्या तुलनेत पापाची गुलामी ही सगळ्यात जास्त वाईट आहे. आज आपण कोणत्या अर्थाने पापाचे गुलाम आहोत? पापामुळे आपण वाईट कामं करायला प्रेरित होतो. जे चांगलं आहे ते करण्यापासून किंवा यहोवाला आपलं सर्वोत्तम देण्यापासूनही पाप आपल्याला रोखतं. यामुळे जीवनात आपल्याला निराशा, दुःख, त्रास सहन करावा लागतो आणि शेवटी आपला मृत्यू होतो. (रोम. ६:२३) पापाच्या गुलामीत असणं किती दुःखदायक असतं हे प्रेषित पौलने अनुभवलं. (रोमकर ७:२१-२५ वाचा.) पाप पूर्णपणे काढून टाकल्यानंतरच आपल्याला आदाम-हव्वा यांच्याकडे एके काळी असलेलं खरं स्वातंत्र्य अनुभवता येईल.

१६. आपण “खऱ्‍या अर्थाने” स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो?

१६ “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला” या येशूच्या शब्दांवरून कळतं की त्याने आपल्याला मुक्‍त करावं अशी जर आपली इच्छा असेल, तर आपल्याला काही पावलं उचलण्याची गरज आहे. कोणती पावलं? समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपण स्वतःचा त्याग केला आहे आणि येशूने त्याच्या शिष्यांसाठी दिलेल्या मर्यादांचं पालन करण्याचं ठरवलं आहे. (मत्त. १६:२४) भविष्यात जेव्हा आपल्याला खंडणी बलिदानाचे संपूर्ण फायदे मिळतील, तेव्हा येशूने वचन दिल्याप्रमाणे आपल्याला खऱ्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल.

१७. (क) आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी आणि समाधानी कसं होऊ शकतो? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ खऱ्‍या अर्थाने आनंदी आणि समाधानी होण्यासाठी येशूचे शिष्य या नात्याने आपण त्याच्या शिकवणींनुसार आपल्या जीवनात बदल करत राहिलं पाहिजे. आपण हे करत राहिलो तर भविष्यात पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून आपण पूर्णपणे मुक्‍त होऊ. (रोमकर ८:१, २, २०, २१ वाचा.) आपल्याला आज जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे कसा करू शकतो हे आपण पुढील लेखात पाहू या. हे शिकल्यामुळे आपण खरं स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाचा सदासर्वकाळ आदर करत राहू.