व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“माझं राज्य या जगाचा भाग नाही”

“माझं राज्य या जगाचा भाग नाही”

“यासाठीच मी जगात आलो आहे, की मी सत्याबद्दल साक्ष द्यावी.”—योहा. १८:३७.

गीत क्रमांक: ५, २८

१, २. (क) कोणत्या कारणांमुळे आज जग विभाजित होत चाललं आहे? (ख) या लेखात आपल्याला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं मिळणार आहेत?

दक्षिण युरोपमध्ये राहणाऱ्‍या एका बहिणीने आपल्या आधीच्या जीवनशैलीबद्दल सांगताना म्हटलं: “लहानपणापासून मी सगळीकडे फक्‍त अन्यायच पाहिलाय.” तिने पुढे म्हटलं: “त्यामुळे मग मी माझ्या देशातील राजकीय संघटनांचं समर्थन केलं नाही. उलट लोक ज्यांना टोकाची विचारसरणी म्हणतात अशा विचारांचं मी समर्थन करू लागले. बरीच वर्षं तर माझे एका आतंकवाद्याशी प्रेमसंबंधही होते.” दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्‍या एका बांधवाने म्हटलं की तो आधी खूप मारामारी करायचा. त्याचं कारण सांगताना तो म्हणतो: “मला नेहमी वाटायचं की माझं गोत्र इतर गोत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. मी एका राजकीय पक्षातदेखील सामील झालो. आमच्या विरोधकांना भाल्यांनी मारून टाकण्याचं प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं. त्यांनाच नाही, तर दुसऱ्‍या राजकीय पक्षाचं समर्थन करणाऱ्‍या आमच्या गोत्रातील लोकांनाही आम्ही मारून टाकायचो.” मध्य युरोपमध्ये राहणारी आपली एक बहीण म्हणते: “मी भेदभाव करायचे आणि दुसऱ्‍या राष्ट्रातील किंवा धर्मातील लोकांचा तिरस्कार करायचे.”

सत्यात येण्याआधी या तीन लोकांची जशी मनोवृत्ती होती, तशीच मनोवृत्ती दिवसेंदिवस बऱ्‍याच लोकांची होत चालली आहे. आज बरेच राजकीय गट स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसेचा आधार घेतात. राजकारणावरून आपआपसांत लढणं लोकांसाठी एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. बऱ्‍याच ठिकाणी दुसऱ्‍या देशांमधून आलेल्या लोकांना जास्तीत जास्त गैरवागणुकीला सामोरं जावं लागतं. शेवटल्या दिवसांबद्दल बायबलमध्ये सांगितलं होतं की बरेच लोक “कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे” बनतील. (२ तीम. ३:१, ३) आज आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते. दिवसेंदिवस विभाजित होत चाललेल्या जगात खरे ख्रिस्ती ऐक्य कसं टिकवून ठेवू शकतात? आपण सर्व येशूच्या उदाहरणावरून बरंच काही शिकू शकतो. त्याच्या काळातील लोकही राजकीय मतांमुळे विभागले होते. या लेखात आपण पुढील तीन प्रश्‍नांची उत्तरं पाहू या: येशू कोणत्याही राजकीय गटात सामील का झाला नाही? देवाच्या लोकांनी राजकीय मुद्यांवर कोणाचीही बाजू घेऊ नये, हे येशूने कसं दाखवलं? आणि आपण कोणत्याही प्रकारच्या हिंसेत भाग घेऊ नये हे येशूने कसं शिकवलं?

स्वातंत्र्य मिळवू पाहणाऱ्‍यांना येशूने साथ दिली का?

३, ४. (क) येशूच्या काळात बऱ्‍याच यहुदी लोकांना काय हवं होतं? (ख) या विचारांचा येशूच्या शिष्यांवर कसा परिणाम झाला?

येशूने ज्या यहुदी लोकांना प्रचार केला त्यांपैकी बऱ्‍याच जणांना रोमच्या साम्राज्यापासून सुटका हवी होती. या यहुदी बंडखोरांचा एक कट्टर राजकीय गट होता आणि त्यांना झेलट्‌स असं म्हटलं जायचं. त्यांनी इतर यहुदी लोकांमध्ये रोमी लोकांविरुद्ध द्वेष वाढवण्यासाठी होईल तितके प्रयत्न केले. येशूच्या काळात राहणाऱ्‍या यहूदा नावाच्या माणसाचं हे बंडखोर समर्थन करायचे. यहूदा गालीलचा असून तो खोटा मसीहा होता आणि तो अनेकांची दिशाभूल करायचा. यहुदी इतिहासकार जोसिफसने म्हटलं की यहूदाने इतरांना रोमी लोकांविरुद्ध लढण्यासाठी भडकवलं. तसंच, जे लोक रोमी लोकांना कर द्यायचे त्यांना त्याने “भित्रे” म्हटलं. कालांतराने रोमी लोकांनी यहूदाला मृत्युदंड दिला. (प्रे. कार्ये ५:३७) यहुदी बंडखोरांपैकी काही लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसेचाही आधार घेतला.

बरेच यहुदी लोक येणाऱ्‍या मसीहाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना वाटलं की हा मसीहा रोमी लोकांपासून त्यांची सुटका करेल आणि इस्राएलला पुन्हा एक महान राष्ट्र बनवेल. (लूक २:३८; ३:१५) बऱ्‍याच लोकांना वाटलं की मसीहा इस्राएलमध्ये त्याचं राज्य स्थापित करेल. आणि जर असं झालं तर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे सर्व यहुदी लोक इस्राएलला परत येतील. एकदा बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहाननेही येशूला विचारलं होतं: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्‍याची वाट पाहावी?” (मत्त. ११:२, ३) योहानला वाटलं असेल की यहुदी लोकांना सोडवणारा कदाचित हा नाही. पुनरुत्थान झाल्यानंतर येशू अम्माऊसला जाणाऱ्‍या रस्त्यावर आपल्या दोन शिष्यांना भेटला. त्याच्याशी बोलताना त्यांनी त्याला सांगितलं की येशू इस्राएल राष्ट्राची सुटका करेल असं त्यांना वाटलं होतं. (लूक २४:२१ वाचा.) या घटनेच्या काही काळातच येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं: “प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची पुनःस्थापना करणार आहेस का?”—प्रे. कार्ये १:६.

५. (क) गालीलच्या लोकांना येशूला राजा का बनवायचं होतं? (ख) येशूने त्यांची मनोवृत्ती कशी सुधारली?

मसीहा आपल्या सर्व समस्या सोडवेल अशी यहुदी लोकांची अपेक्षा होती. कदाचित याच कारणामुळे गालीलमधील लोकांना येशूला आपला राजा बनवायचं होतं. येशू एक प्रभावी वक्‍ता होता, तो आजारी लोकांना बरं करू शकत होता आणि लोकांना अन्‍नदेखील पुरवू शकत होता. येशूने जवळपास ५,००० माणसांना अन्‍न पुरवलं हे पाहून लोक आश्‍चर्यचकित झाले होते. म्हणून गालीलच्या लोकांना वाटलं असेल की येशू सर्वात चांगला शासक ठरेल. त्यांच्या मनात काय आहे हे येशूने ओळखलं. बायबल सांगतं: “लोक आपल्याला बळजबरीने राजा बनवण्यासाठी धरायला येत आहेत, हे ओळखून येशू पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला.” (योहा. ६:१०-१५) दुसऱ्‍या दिवशी कदाचित लोक शांत झाले असतील. मग येशूने त्यांना समजावून सांगितलं की तो त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी आला आहे. त्याने लोकांना म्हटलं: “नाश होणाऱ्‍या अन्‍नासाठी खटपट करू नका, तर जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं, अशा अन्‍नासाठी खटपट करा.”—योहा. ६:२५-२७.

६. आपल्याला पृथ्वीवर राजकीय सत्ता नको हे येशूने स्पष्टपणे कसं दाखवलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी येशूला जाणवलं की तो यरुशलेममध्ये राजा म्हणून राज्य करेल असं त्याच्या काही शिष्यांना वाटत आहे. पण तसं होणार नाही हे समजवण्यासाठी येशूने त्यांना चांदीच्या नाण्यांचा दृष्टान्त सांगितला. या दृष्टान्तात ‘राजघराण्यातल्या’ एका अशा माणसाबद्दल सांगितलं आहे ज्याला बऱ्‍याच काळासाठी दूर देशी जावं लागतं. (लूक १९:११-१३,१५) रोमी अधिकारी पंतय पिलातलाही येशूने स्पष्टपणे सांगितलं की तो राजकारणात कोणाचीही बाजू घेत नाही. पिलातने येशूला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” (योहा. १८:३३) पिलातला कदाचित भीती वाटली असेल की येशू यहुदी लोकांना रोमी साम्राज्याविरुद्ध बंड करायला लावेल. पण येशूने उत्तर देत त्याला म्हटलं: “माझं राज्य या जगाचा भाग नाही.” (योहा. १८:३६) येशूने कोणत्याही प्रकारे राजकारणात भाग घेतला नाही, कारण त्याचं राज्य स्वर्गात स्थापित होणार होतं. त्याने म्हटलं की पृथ्वीवर त्याचं काम “सत्याबद्दल साक्ष” देण्याचं आहे.—योहान १८:३७ वाचा.

तुमचं लक्ष जगातील समस्यांवर केंद्रित आहे, की देवाच्या राज्यावर? (परिच्छेद ७ पाहा)

७. आपल्या मनात राजकीय पक्षांचं समर्थन करण्याचं टाळणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?

येशूला चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्याची नेमणूक काय आहे. आपणदेखील आपली नेमणूक समजून घेतली पाहिजे. यामुळे मग आपण आपल्या बोलण्यातून कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करणार नाही, इतकंच काय तर आपल्या मनात तसा विचारही आणणार नाही. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. एका विभागीय पर्यवेक्षकाने म्हटलं की त्यांच्या क्षेत्रातील लोकांची मनोवृत्ती दिवसेंदिवस बंडखोर होत चालली आहे. या लोकांना आपल्या देशावर खूप गर्व आहे. सत्ता चालवणाऱ्‍यांमध्ये त्यांच्या समाजाचे लोक असतील तरच त्यांचं जीवन सुधारेल असा विचार ते करतात. विभागीय पर्यवेक्षक म्हणतात: “आपल्या बांधवांनी मात्र राज्याची सुवार्ता सांगण्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याद्वारे त्यांची ख्रिस्ती एकता टिकवून ठेवली आहे. ही खरंच प्रशंसेची गोष्ट आहे. फक्‍त यहोवाच त्यांच्या समस्यांवर आणि अन्यायावर मात करू शकतो असा भरवसा ते बाळगतात.”

राजकीय मुद्यांमध्ये येशूने तटस्थ भूमिका कशी घेतली?

८. येशूच्या काळात लोकांना कोणत्या अन्यायाचा सामना करावा लागला?

आपल्या आजूबाजूला लोक जेव्हा अन्याय पाहतात तेव्हा सहसा ते राजकारणात सक्रियपणे सहभाग घेतात. येशूच्या काळात कर देणं हा एक मोठा मुद्दा होता आणि यामुळे बऱ्‍याच लोकांनी राजकीय गटांची बाजू घेतली. गालीलच्या यहूदाने रोमी सरकाराविरुद्ध बंड करण्याचं मुख्य कारण हेच होतं. त्या काळी लोकांनी नियमितपणे कर भरावा यासाठी रोमी सरकार त्यांची नोंदणी करत होतं. तेव्हा त्यांना बऱ्‍याच गोष्टींसाठी कर भरावा लागायचा, जसं की मालमत्ता, जमीन आणि घर. तसंच, त्या काळचे कर वसूल करणारे लोकही खूप भ्रष्ट होते आणि यामुळे लोकांचा राग आणखी वाढला होता. हे कर वसूल करणारे महत्त्वाचं पद मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्‍यांना लाच द्यायचे आणि मग मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून लोकांना लुबाडायचे. यरीहो शहरातला कर वसूल करणारा मुख्य अधिकारी जक्कय यानेही लोकांना लुबाडलं होतं. यामुळेच तो खूप श्रीमंत बनला होता.—लूक १९:२, ८.

९, १०. (क) येशूच्या शत्रूंनी त्याला राजकीय मुद्यांमध्ये अडकवण्याचा कसा प्रयत्न केला? (ख) येशूने दिलेल्या उत्तरावरून आपण काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

येशूच्या शत्रूंनी त्याला कर देण्याच्या मुद्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी येशूला रोमी सम्राटाला दिल्या जाणाऱ्‍या कराबद्दल विचारलं. हा कर एक दिनार इतका होता आणि प्रत्येक यहुदी व्यक्‍तीला तो भरण्याची सक्‍ती होती. (मत्तय २२:१६-१८ वाचा.) या गोष्टीचा यहुदी लोक खूप द्वेष करायचे कारण यामुळे ते रोमी साम्राज्याच्या अधिकाराखाली आहेत ही जाणीव त्यांना नेहमी व्हायची. “हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना” वाटलं की जर येशूने कर भरण्याला विरोध केला तर ते त्याच्यावर सरकारचा विरोधी म्हणून आरोप लावू शकतील. आणि जर येशूने म्हटलं की आपण हा कर भरला पाहिजे, तर मग लोक त्याच्यामागे येण्याचं सोडून देतील. मग येशूने त्यांना काय उत्तर दिलं?

१० या मुद्यावर येशू तटस्थ राहिला. त्याने म्हटलं: “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.” (मत्त. २२:२१) कर वसूल करणारे बरेच जण भ्रष्ट आहेत हे येशूला माहीत होतं, पण त्याने यावर आपलं लक्ष केंद्रित केलं नाही. उलट मानवजातीच्या समस्यांवर एकमेव उपाय असणाऱ्‍या देवाच्या राज्यावर त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं. या बाबतीत येशूने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं. आपणही राजकीय मुद्यांवर कोणाचीही बाजू घेऊ नये. मग काही पक्ष प्रामाणिक तर काही चुकीचे काम करणारे आहेत असं वाटत असलं तरी. खरे ख्रिस्ती देवाच्या राज्यावर आणि देवाच्या नजरेत जे योग्य त्यावर आपलं लक्ष केंद्रित करतात. यामुळेच आपण होणाऱ्‍या अन्यायाबद्दल ठाम मत बनवत नाही किंवा त्यांच्या विरोधात बोलत नाही.—मत्त. ६:३३.

११. खरा न्याय मिळवण्यासाठी आपण इतरांची मदत कशी करू शकतो?

११ बऱ्‍याच यहोवाच्या साक्षीदारांना राजकीय मुद्यांबद्दल असलेली आपली पूर्वीची ठाम मतं बदलता आली आहेत. उदाहरणार्थ, सत्य शिकण्याआधी ब्रिटनमध्ये राहणारी एक बहीण विद्यापीठात समाजशास्त्राचा अभ्यास करत होती आणि यामुळे राजकीय मुद्यांवर तिची मतं खूप ठाम होती. ती म्हणते: “मला काळ्या वर्णाच्या लोकांच्या वतीने लढायचं होतं, कारण आम्हाला बऱ्‍याच अन्यायाचा सामना करावा लागला आहे. वादविवादात माझी मतं मांडण्यात मी कुशल होते, पण तरी शेवटी मला निराशाच हाती लागायची. मला याची जाणीव नव्हती की वर्णावरून होणारा भेदभाव हा मुळात लोकांच्या मनातून काढणं जास्त गरजेचं आहे. पण मी जेव्हा बायबल अभ्यास सुरू केला तेव्हा मला जाणवलं की आधी मलाच माझ्या मनातील विचार बदलण्याची गरज आहे.” हे विचार बदलण्यासाठी तिला एका गोऱ्‍या वर्णाच्या बहिणीने मदत केली. ती बहीण म्हणते: “आता मी संकेत भाषेच्या मंडळीत एक पायनियर म्हणून सेवा करत आहे आणि सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत कसं पोचता येईल हे शिकत आहे.”

“आपली तलवार जागच्या जागी ठेव”

१२. येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या प्रकारच्या “खमिरापासून” सावध राहायला सांगितलं?

१२ येशूच्या काळात धार्मिक पुढारीदेखील राजकीय गटांचं समर्थन करायचे. उदाहरणार्थ, येशूच्या काळाबद्दल सांगणाऱ्‍या एका पुस्तकात म्हटलं आहे की राजकीय गटांसारखं यहुदी लोकही वेगवेगळ्या धार्मिक गटात विभागले गेले होते. यामुळेच येशूने आपल्या शिष्यांना ताकीद दिली: “जागृत राहा; परूशी लोकांच्या व हेरोदच्या खमिरापासून सांभाळा.” (मार्क ८:१५) येशूने ‘हेरोद’ असा जो उल्लेख केला तो कदाचित हेरोदच्या समर्थकांना सूचित करत असावा. दुसरा गट परूशी लोकांचा होता. त्यांची इच्छा होती की यहुदी लोकांनी रोमी साम्राज्यापासून मुक्‍त व्हावं. मत्तयच्या अहवालावरून आपल्याला कळतं की येशूने शिष्यांना सदुकी लोकांपासूनही सावध राहायला सांगितलं. सदुकी लोकांना वाटायचं की रोमी सरकारचंच राज्य असावं कारण यामुळे सदुकी लोकांना अधिकाराच्या पदांवर राहायला मदत होणार होती. येशूने आपल्या शिष्यांना “खमिरापासून,” म्हणजेच या तीन गटांच्या शिकवणींपासून सावध राहण्यासाठी सांगितलं. (मत्त. १६:६, १२) विशेष म्हणजे लोक येशूला राजा बनवणार होते त्याच्या काही काळानंतरच त्याने ही ताकीद दिली.

१३, १४. (क) राजकीय आणि धार्मिक मुद्यांमुळे हिंसा व अन्याय कसा वाढतो? (ख) आपल्यावर कितीही अन्याय होत असला तरी हिंसा करणं चुकीचं का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१३ धार्मिक संघटना जेव्हा राजकीय मुद्यांचं समर्थन करतात तेव्हा सहसा हिंसेला पाठिंबा मिळतो. येशूने आपल्या शिष्यांना या बाबतीत पूर्णपणे तटस्थ राहायला सांगितलं. हेदेखील एक कारण होतं ज्यामुळे महायाजक आणि परूशी यांना येशूला ठार मारायचं होतं. त्यांना भीती होती की लोक येशूचं ऐकून आपल्याला समर्थन द्यायचं सोडून देतील. यामुळे मग त्यांच्याकडे असलेला धार्मिक आणि राजकीय अधिकार ते गमावून बसले असते. त्यांनी म्हटलं: “जर आपण त्याचं असंच चालू दिलं, तर सर्व लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवू लागतील आणि रोमी लोक येऊन आपलं मंदिर आणि आपलं राष्ट्रही आपल्यापासून हिरावून घेतील.” (योहा. ११:४८) यामुळे मग महायाजक कयफाने येशूला ठार मारण्याचा कट रचला.—योहा. ११:४९-५३; १८:१४.

१४ कयफाने रात्र होऊ दिली आणि मग येशूला अटक करण्यासाठी सैनिकांना पाठवलं. पण त्यांनी रचलेल्या कटाबद्दल येशूला आधीपासूनच माहीत होतं. यामुळे आपल्या प्रेषितांसोबत शेवटचं भोजन झाल्यानंतर त्याने त्यांना सोबत तलवार घ्यायला सांगितली. शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी त्याने त्यांना दोन तलवारी सोबत ठेवायला सांगितल्या. (लूक २२:३६-३८) नंतर त्या रात्री येशूला अटक करण्यासाठी एक जमाव आला. येशूवर होणारा अन्याय पाहून पेत्र इतका चिडला की त्याने तलवार काढून एकावर हल्ला केला. (योहा. १८:१०) पण येशूने पेत्रला म्हटलं: “आपली तलवार जागच्या जागी ठेव, कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.” (मत्त. २६:५२, ५३) आपल्या शिष्यांनी या जगाचा भाग बनू नये ही गोष्ट येशूने किती प्रभावीपणे त्यांना शिकवली! ही घटना घडण्याआधी त्या रात्री येशूने याबद्दलच प्रार्थना केली होती. (योहान १७:१६ वाचा.) फक्‍त यहोवा देवालाच अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार आहे.

१५, १६. (क) बायबलमुळे आपल्याला मतभेद टाळण्यासाठी कशी मदत मिळाली आहे? (ख) यहोवा आजच्या जगाकडे पाहतो तेव्हा त्याला लोकांमध्ये कोणते दोन गट दिसून येतात?

१५ लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या दक्षिण युरोपमधील बहिणीलाही हाच धडा शिकायला मिळाला. ती म्हणते: “मी स्वतः अनुभवलंय की हिंसा केल्यामुळे न्याय मिळत नाही. मी पाहिलंय की जे लोक हिंसा करतात त्यांना सहसा जीव गमवावा लागतो, तर इतर लोकांच्या मनात कटू भावना येतात. फक्‍त यहोवा देवच खरा न्याय करू शकतो हे शिकून मला खूप आनंद झाला. मागच्या २५ वर्षांपासून मी हाच संदेश इतरांना सांगत आली आहे.” दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्‍या बांधवाने आता भाल्याऐवजी “आत्म्याची तलवार”, म्हणजेच देवाचं वचन हातात घेतलं आहे. (इफिस. ६:१७) आता तो सर्व प्रकारच्या लोकांना, मग ते कोणत्याही गोत्राचे असो, शांतीचा संदेश सांगतो. तसंच, मध्य युरोपमधल्या बहिणीने यहोवाची साक्षीदार बनल्यानंतर एका अशा बांधवाशी लग्न केलं, ज्याच्या समाजाबद्दल आधी तिला खूप तिरस्कार होता. या तिघांना ख्रिस्तासारखं बनायचं होतं म्हणून त्यांनी आपल्या मनोवृत्तीत बदल केला.

१६ आपल्या मनोवृत्तीतही हे बदल करणं खूप गरजेचं आहे. बायबल म्हणतं की मानवजात समुद्रासारखी आहे, ती कधीच स्थिर राहात नाही तर नेहमी अशांत राहते. (यश. १७:१२; ५७:२०, २१; प्रकटी. १३:१) राजकीय मुद्यांमुळे लोक चिथवले जातात, त्यामुळे लोकांमध्ये फुटी पडतात आणि याचं रूपांतर हिंसेत होतं. पण आपण मात्र नेहमी एकतेने आणि शांतीने राहतो. हे जग विभागलेलं आहे, पण आपल्यात ऐक्य आहे हे पाहून यहोवाला खूप आनंद होत असेल.—सफन्या ३:१७ वाचा.

१७. (क) एकता टिकवून ठेवण्याचे तीन मार्ग कोणते आहेत? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ या लेखात आपण तीन मार्ग पाहिले ज्यांद्वारे आपण एकता टिकवून ठेवू शकतो: (१) देवाचं राज्यच सर्व अन्याय काढून टाकेल यावर पूर्ण भरवसा बाळगणं, (२) राजकीय मुद्यांमध्ये तटस्थ राहणं आणि (३) हिंसा टाळणं. यासोबतच आणखी एका गोष्टीमुळे आपल्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो, ती म्हणजे भेदभावाची भावना. पुढच्या लेखात आपण पाहू या की पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांसारखं आपणही भेदभाव करण्याचं कसं टाळू शकतो.