व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फलज्योतिष तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकते का?

फलज्योतिष तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकते का?

बायबलचा दृष्टिकोन

फलज्योतिष तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकते का?

तुम्ही तुमचे जीवन कसे सुधारू शकता? प्रेम, पैसा कसा मिळवू शकता? अनेक लोक ज्योतिषशास्त्राद्वारे या प्रश्‍नांची उत्तरे मिळवू पाहतात. दररोज कोट्यवधी लोक आपली परिस्थिती सुधारण्याची काही शक्यता आहे की नाही हे पाहण्यासाठी वृत्तपत्रात भविष्य पाहतात. जागतिक पुढारी देखील ग्रहताऱ्‍यांनुसार निर्णय घेतात, हे सर्वश्रुत आहे.

फलज्योतिष खरोखरच भरवशालायक आहे का? फलज्योतिषी कशाच्या आधारावर भविष्य सांगतात? आपण कसे जगावे, हे ख्रिश्‍चनांनी ग्रहताऱ्‍यांनुसार ठरवावे का?

फलज्योतिष म्हणजे काय?

द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडियानुसार, “आकाशातील ग्रहे विविध आकार घेतात ज्यावरून एखाद्या व्यक्‍तीचा स्वभाव किंवा भविष्य प्रकट होते, या विश्‍वासावर” फलज्योतिष आधारित आहे. एखाद्या व्यक्‍तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि राशीचक्राची चिन्हे त्या व्यक्‍तीच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव पाडू शकतात, असा ज्योतिषींचा दावा आहे. * विशिष्ट घटकेला आकाशातील या ग्रहांच्या स्थितीला होरोस्कोप अथवा जन्मकुंडली म्हटले जाते.

फलज्योतिषाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी बॅबिलोनी लोकांनी, सूर्य, चंद्र आणि सर्वात दृश्‍य असलेल्या पाच ग्रहांच्या स्थितीनुसार भविष्याचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली. या लोकांनी असा दावा केला, की अवकाशातील या ग्रहांचा मानवी वर्तनावर विविष्ट प्रभाव पडतो. नंतर, त्यांनी राशीचक्राला आपल्या भाकीतांत सामील केले.

अपयशाचा दीर्घ इतिहास

बॅबिलोन आणि फलज्योतिष यांच्यातील संबंधाबद्दल बायबल सांगते. अनेक वेळा ते बॅबिलोनी ज्योतिषींचा उल्लेख करते. (दानीएल ४:७; ५:७, ११) दानीएल संदेष्ट्याच्या दिवसात, खाल्डियात इतके ज्योतिषी चालायचे, की “खाल्डी” हा शब्द ज्योतिषींसाठी देखील वापरला जायचा.

दानीएलाने फक्‍त, बॅबिलोनवर फलज्योतिषाचा किती प्रभाव आहे एवढेच पाहिले नाही तर बॅबिलोनचे ज्योतिष, शहराच्या नाशाचे भाकीत करण्यात अपयशी कसे ठरले हेही त्याने पाहिले. (दानीएल २:२७) संदेष्टा यशया याने दोन शतकांआधी काय भाकीत केले होते ते पाहा. यशयाने अगदी तिरस्काराने असे लिहिले: “तुजवर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळविणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत. . . . त्यांना स्वतःचा बचाव करिता येईना.”—यशया ४७:१३, १४.

बॅबिलोन शहराचा नाश होणार आहे याचे भाकीत बॅबिलोनच्या ज्योतिषींना, नाशाच्या काही तास आधी सुद्धा करता आले नाही. राजा बेलशस्सरच्या महालात जेव्हा स्वतः देवाकडून प्रतिकूल न्यायदंडाची बजावणी करणारे लिखाण उमटले तेव्हा कोणत्याही ज्योतिषाला या लिखाणाचा अर्थ सांगता आला नाही.—दानीएल ५:७, ८.

आज ज्योतिषींचे हेच हाल आहेत. महत्त्वपूर्ण घटनांचे ते भाकीत करू शकले नाहीत. ३,००० पेक्षा अधिक विशिष्ट ज्योतिष भाकीतांचे परीक्षण केल्यानंतर, वैज्ञानिक संशोधक आर. कल्वर आणि फिलिप इआना या निष्कर्षास पोंहचले, की फक्‍त १० टक्के भाकीते अचूक होती. तसे तर, कोणताही जाणता परीक्षक अधिक अचूकरीत्या घटनांचे भाकीत करू शकतो.

बायबल शिकवणींच्या विरोधात

पण, फलज्योतिष भविष्य अचूकपणे वर्तवू शकत नाही म्हणून इब्री संदेष्ट्यांनी ते नाकारले नाही. तर, देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात इस्राएलांना, शुभाशुभ पाहू नये, असे स्पष्ट शब्दांत बजावण्यात आले होते. “चेटुक करणारा, . . . शकुनमुहूर्त पाहणारा, . . . असा तुमच्यापैकी कोणी नसावा,” असे नियमशास्त्रात म्हटले होते. “जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.”—अनुवाद १८:१०, १२.

या शास्त्रवचनात विशिष्टपणे फलज्योतिषशास्त्र असे म्हटलेले नसले तरी, त्यास करण्यात आलेल्या मनाईत ज्योतिषी आचरण्याचा समावेश होतो. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका हा विश्‍वकोश म्हणतो, की फलज्योतिषशास्त्र “एकप्रकारचे चेटुक आहे ज्यात, स्थिर तारा, सूर्य, चंद्र आणि ग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा अर्थ सांगण्याद्वारे पृथ्वीवरील व मानवांतील घटनांविषयी भाकीत करणे समाविष्ट आहे.” सर्व प्रकारचे चेटुक—मग ते ताऱ्‍यांवर आधारित असो अथवा इतर वस्तुंवर असो—ते देवाच्या नियमांचे उल्लंघन करते. का? यासाठी रास्त कारण आहे.

आपल्या यशाचे किंवा अपयशांचे श्रेय ताऱ्‍यांना देण्याऐवजी बायबल स्पष्टपणे असे म्हणते, की “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) देव आपल्या प्रत्येकाला आपल्या कार्यांबद्दल जबाबदार धरतो. कारण आपल्या सर्वांजवळ इच्छा-स्वातंत्र्य आहे. (अनुवाद ३०:१९, २०; रोमकर १४:१२) हे खरे आहे, की आपल्या कह्‍यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपल्याला अपघात होऊ शकतो किंवा आपण आजारी पडू शकतो. पण अशा दुर्घटना आपल्या जन्मकुंडलीमुळे नव्हे तर “समय व प्रसंग” यामुळे घडतात, असे शास्त्रवचने सांगतात.—उपदेशक ९:११, पं.र.भा.

मानवी नातेसंबंधांच्या बाबतीत, बायबल आपल्याला करुणा, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता, प्रीती हे गुण धारण करण्यास आर्जवते. (कलस्सैकर ३:१२-१४) चिरकाल मैत्रीसाठी आणि मजबूत विवाहासाठी हेच गुण प्रामुख्याने आवश्‍यक आहेत. जीवनसाथी निवडण्यासाठी “जन्मकुंडलीचे जुळणे” भरवशालायक मार्गदर्शक नाही. बर्नाड सिल्वरमन या मानसशास्त्रज्ञांनी, सुमारे ३,५०० जोडप्यांच्या जन्मकुंडलींचा अभ्यास केला तेव्हा त्यातील १७ टक्के जोडप्यांचा कालांतराने घटस्फोट झाला. आपली ‘जन्मकुंडली जिच्याबरोबर जुळली’ होती अशा व्यक्‍तीबरोबर विवाह करणाऱ्‍यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी असल्याचे या मानसशास्त्रज्ञांना आढळले नाही.

तेव्हा, फलज्योतिषशास्त्र बेभरवशालायक आणि दिशाभूल करणारे आहे, हे स्पष्ट आहे. फलज्योतिषशास्त्रामुळे आपण आपल्या चुकांचे खापर ताऱ्‍यांच्या माथी फोडतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फलज्योतिषशास्त्राचे देवाच्या वचनात स्पष्ट शब्दांत खंडन करण्यात आले आहे. (g०५ ८/८)

[तळटीप]

^ फलज्योतिषात उपयोग केल्या जाणाऱ्‍या १२ विविध नक्षत्रांना राशीचक्र म्हटले जाते.