व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजच्या जगात शांतताप्रिय बनणे व्यावहारिक आहे का?

आजच्या जगात शांतताप्रिय बनणे व्यावहारिक आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

आजच्या जगात शांतताप्रिय बनणे व्यावहारिक आहे का?

येशू ख्रिस्ताने डोंगरावरील आपल्या सुप्रसिद्ध प्रवचनात म्हटले: “जे शांति करणारे ते धन्य.” त्याने असेही म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५,) शांतताप्रिय असण्यात, केवळ संघर्ष टाळणे किंवा शांत राहणे इतकेच समाविष्ट नाही. शांतताप्रिय व्यक्‍ती इतरांचे हित करण्यात पुढाकार घेते आणि शांती कायम राखण्यास सक्रियपणे कार्य करते.

वर उल्लेखलेले येशूचे शब्द आपल्या दिवसांत व्यावहारिक आहेत का? काहींना वाटते, की या आधुनिक जगात यशस्वी व्हायचे असेल तर आपण लोकांना धाकात ठेवले पाहिजे, आक्रमक असले पाहिजे आणि वेळ आलीच तर हिंसाही केली पाहिजे. पण जशास तसे वागणे किंवा सारख्याला वारके वागणे सुज्ञतेचे आहे का? की शांतताप्रिय असणे व्यावहारिक आहे? “जे शांती करणारे ते धन्य” या येशूच्या शब्दांवर आपण का विचार केला पाहिजे त्याची तीन कारणे आपण पाहू यात.

▪ शांत हृदय “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे,” असे नीतिसूत्रे १४:३० मध्ये म्हटले आहे. राग आणि द्वेष मनात बाळगल्यामुळे मेंदूत रक्‍तस्राव व हृदयविकार होऊ शकतो, असे अनेक वैज्ञानिक रिपोट्‌र्स वरून सूचित होते. अलिकडे, एका वैद्यकीय मासिकाने हृदयविकार असलेल्या लोकांबद्दल सांगताना, रागाच्या उद्रेकाची तुलना विषाशी केली. “रागाने वेडेपिसे होणारी व्यक्‍ती खरोखरच आजारी पडू शकते,” असेही या मासिकात पुढे म्हटले होते. परंतु, जे शांती राखण्याचा प्रयत्न करतात त्यांचे ‘अंतःकरण शांत’ राहते व त्यांना याचा फायदा होतो.

एक उदाहरण जिम यांचे आहे. हे ६१ वर्षांचे गृहस्थ आता एका व्हिएतनामी समाजात बायबल शिक्षक आहेत. ते म्हणतात: “व्हिएतनाममध्ये, लष्करात व तीन वेगवेगळ्या युद्ध चाललेल्या ठिकाणी सहा वर्ष घालवल्यानंतर मला, हिंसा, राग, नैराश्‍य काय आहे ते चांगले समजले. माझे गत जीवन मला मानसिक यातना देत होते; त्यामुळे मला झोप लागायची नाही. काही काळातच, ताण आणि पोटाचे विकार, नसांचा विकार यांमुळे माझी तब्येत बिघडू लागली.” यांना या सर्वापासून सुटका कशी मिळाली? ते याचे उत्तर देतात: “यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास केल्यामुळे माझा जीव वाचला. शांतीपूर्ण नव्या जगाविषयी देवाचा काय उद्देश आहे व मी “नवा मनुष्य” कसा धारण करू शकतो, याविषयी शिकल्यामुळे मी शांत अंतःकरण प्राप्त करू शकलो. यामुळे माझी तब्येत बरीच सुधारली आहे.” (इफिसकर ४:२२-२४; यशया ६५:१७; मीखा ४:१-४) शांत मनःस्थिती विकसित केल्यामुळे भावनिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्य सुधारते, असे पुष्कळ जण आपल्या अनुभवावरून सांगतात.—नीतिसूत्रे १५:१३.

▪ मैत्रीपूर्ण संबंध आपण शांत मनोवृत्ती दाखवतो तेव्हा इतरांबरोबरचे आपले संबंध सुधारतात. आपण, “संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर” केली पाहिजे असे बायबल म्हणते. (इफिसकर ४:३१) आक्रमक वृत्ती दाखवणाऱ्‍या लोकांपासून इतर लोक चारहात दूरच राहू इच्छितात; अशाने हे लोक एकलकोंडे होतात. त्यांना कोणी जवळचे मित्र नसतात ज्यांच्यावर ते निर्भर राहू शकतात. नीतिसूत्रे १५:१८ म्हणते: “तापट मनुष्य तंटा उपस्थित करितो; मंदक्रोध झगडा शमवितो.”

ॲन्डी संयुक्‍त संस्थातील न्यू यॉर्क सिटीत एक ख्रिस्ती वडील आहेत. ते ४२ वर्षांचे आहेत. ते, एका आक्रमक परिसरात लहानाचे मोठे झाले. ते म्हणतात: “वयाच्या आठव्या वर्षापासून मला रिंगणात उतरवून बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. मी समोरच्या व्यक्‍तीला माणूस म्हणून कधी पाहायचो नाही. उलट माझ्या मनात एकच विचार असायचा: ‘मार किंवा मार खा.’ लवकरच मी एका टोळीत सामील झालो. आम्ही रस्त्यावरील पुष्कळ झगड्यात व मारामारीत असायचो. कित्येकदा माझ्या डोक्यावर बंदूक धरण्यात आली होती, मला चाकूचा धाक दाखवला जायचा. पुष्कळदा माझे आणि माझ्या मित्रांचे खटके उडायचे, मला त्यांची भीती वाटायची.”

पण मग कोणत्या गोष्टीने ॲन्डीला शांती जोपासायला प्रवृत्त केले? ते म्हणतात: “एकदा मी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहातील एका सभेला गेलो. तिथल्या लोकांमधलं प्रेमळ वातावरण मला लगेच जाणवलं. तेव्हापासून या शांतीप्रिय लोकांबरोबर मी सहवास राखू लागल्यामुळे शांत हृदय विकसित करण्यास मदत मिळाली आणि माझी जुनी विचारशैली हळूहळू बदलू लागली. आता माझे अनेक मित्र आहेत व आमची मैत्री दीर्घकाळापासून आहे.”

▪ भवितव्याची आशा शांतताप्रिय असण्याचे सर्वात प्रमुख कारण हे आहे: आपल्याला आपल्या सृष्टीकर्त्याबद्दल सन्मान आणि त्याने प्रकट केलेल्या त्याच्या इच्छेबद्दल आदर आहे, हे दिसून येते. स्वतः देवाचे वचन बायबल आपल्याला आर्जवते: “शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.” (स्तोत्र ३४:१४) यहोवा देव अस्तित्वात आहे हे कबूल करून मग त्याच्या जीवनप्रदायक शिकवणी शिकून व त्यांचे पालन करून त्याच्याबरोबर मैत्री प्रस्थापित करणे शक्य आहे. ही मजबूत मैत्री प्रस्थापित झाल्यावर आपल्याला “देवाने दिलेली शांति” प्राप्त होते. जीवनात कितीही अडीअडचणी आल्या तरी ही शांती प्रबल ठरते.—फिलिप्पैकर ४:६, ७.

शिवाय, शांतताप्रिय असल्याने आपण कोणत्या प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छितो, हे यहोवाला दाखवतो. आपण देवाने वचन दिलेल्या शांतीपूर्ण नव्या जगात जगण्याच्या लायक आहोत हे आपण देवाला शाबीत करून दाखवू शकतो. जेव्हा तो दुष्ट लोकांना काढून टाकेल आणि जे सौम्यवृत्तीचे आहेत ते “पृथ्वीचे वतन पावतील” असे जे येशूने म्हटले ते स्वतः अनुभवू. किती मोठा आशीर्वाद असेल हा!—स्तोत्र ३७:१०, ११; नीतिसूत्रे २:२०-२२.

होय, “जे शांति करणारे ते धन्य” या येशूच्या शब्दांचा दैनंदिन जीवनात पदोपदी प्रत्यय येतो. आपण शांत हृदय, अर्थपूर्ण मैत्री आणि भवितव्यासाठी भक्कम आशा मिळवू शकतो. आपण ‘सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहण्याचा’ कसोशीने प्रयत्न केला तर आपल्याला हे आशीर्वाद मिळतील.—रोमकर १२:१८. (५/०६)

[२८ पानांवरील चित्रे]

“माझी तब्येत बरीच सुधरली आहे.”—जिम

[२९ पानांवरील चित्रे]

“माझे अनेक मित्र आहेत व आमची मैत्री दीर्घकाळापासून आहे.”—ॲन्डी