व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मरणाविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?

मरणाविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?

मरणाविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?

आपण कितीही धडधाकट असलो व कितीही श्रीमंत असलो तरी, आपल्या सर्वांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असते. कधी रस्ता ओलांडताना किंवा कधी बिछान्यात असतानासुद्धा ती आपल्यावर वार करू शकते. न्यूयॉर्क सिटी व वॉशिंग्टन डी.सी. येथे सप्टेंबर ११, २००१ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यांवरून आपल्याला याची प्रचिती येते, की “शेवटला शत्रु” मृत्यू हा, अमीर-गरीब, लहान-थोर, कोणालाही सोडत नाही; कधीकधी तर काही मिनिटांतच तो हजारोंचा बळी घेतो.—१ करिंथकर १५:२६.

मृत्यू इतका भयजनक असला तरी पुष्कळ लोकांना त्याबाबत जिज्ञासा वाटते. मृत्यूच्या बातम्या खासकरून थरकाप उडवणाऱ्‍या असल्या तरी शेकडो मृत्यूमुखी पडले याची माहिती देणाऱ्‍या बातमीपत्रांना, टीव्हीवरील बातम्यांना अधिक मागणी आहे. मग त्या बातम्यांत युद्धामुळे, नैसर्गिक संकटांमुळे, हिंसाचारामुळे अथवा रोगराईमुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असो, त्या ऐकून लोकांना कंटाळा येत नाही. मृत्यूबद्दल असलेले हे विचित्र वेड, एखाद्या बड्या आसामीचा किंवा व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा, खूप भावुक होऊन व अतिशय विचित्र पद्धतीने व्यक्‍त केले जाते.

मृत्यूविषयी असलेली लोकांची विविध प्रतिक्रिया नाकारता येण्यासारखी नाही. लोकांना मृत्यूविषयी—इतरांच्या मृत्यूविषयी कुतूहल वाटत राहते. परंतु स्वतःच्या मृत्यूविषयी ते विचार करतात तेव्हा मात्र त्यांच्या पोटात गोळा येतो. स्वतःच्या मृत्यूविषयी बहुतेक जण बोलू इच्छित नाहीत.

मृत्यूमुळे गोंधळून गेलेले

स्वतःच्या मृत्यूचा विचार आपल्यापैकी कोणालाही आवडत नाही व कधी आवडणारही नाही. असे का? कारण देवाने आपल्यामध्ये अनंतकाळ जगण्याची तीव्र इच्छा रुजवली आहे. उपदेशक ३:११ या वचनात असे म्हटले आहे, “त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे.” म्हणून, मृत्यूच्या अटळतेमुळे मानवांच्या मनात सतत एक प्रकारचा संघर्ष चाललेला असतो. या संघर्षाला यशस्वीरीत्या तोंड देण्यासाठी व चिरकाल जगण्याची नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी, मानवांनी आत्म्याच्या अमरत्वापासून ते पुनर्जन्मापर्यंतच्या सर्व प्रकारच्या विश्‍वासांची रचना केली आहे.

मृत्यू अस्वस्थ करणारी घटना आहे आणि मृत्यूचे भय हे सर्वत्र आहे. त्यामुळे मानव समाजाला मृत्यूचे सतत भय वाटते त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. एक गोष्ट म्हणजे मृत्यूमुळे, धनसंपत्ती आणि वर्चस्व मिळवण्यात घालवलेले आयुष्य किती व्यर्थ आहे ही वास्तविकता समोर येते.

मृत्यूमुळे दुरावा?

गत काळांत, दुर्धर रोगाने ग्रस्त व्यक्‍तीला किंवा गंभीररीत्या इजा झालेल्या व्यक्‍तीला बहुतेकदा तिच्या घराच्या ओळखीच्या किंवा आवडत्या परीसरात शेवटले दिवस घालवायला दिले जात असे. बायबल काळांत केले जाई तसे आजही काही समाजात केले जाते. (उत्पत्ति ४९:१, २, ३३) अशा वेळी कुटुंबे एकत्र येतात, व मुलांनाही संभाषणात सामील केले जाते. यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍तीला सांत्वन मिळते की शोक करण्यात ती एकटीच नाही तर बाकीचेही लोक तिच्यासोबत आहेत.

परंतु ही गोष्ट अशा समाजांपेक्षा अतिशय वेगळी आहे जेथे, मृत्यू या विषयावर बोलणे निषिद्ध असते, त्यावर विचार करणे विकृतपणाचे मानले जाते व मुलांना “सहन होणार” नाही असे समजून त्यांच्याबरोबर त्याची चर्चा केली जात नाही. आजकाल मृत्युचा अनुभव अगदी वेगळाच आहे—आणि मरते वेळी सहसा ती व्यक्‍ती एकटीच असते. पुष्कळ लोकांची अशी इच्छा असते, की त्यांना मृत्यू आला तर तो घरीच यावा, शांतपणे व कुटुंबाने चांगली काळजी घेत असतानाच यावा; परंतु अनेकांना इस्पितळात, कुटुंबापासून दूर, यातना सहन करत, व उच्च-तंत्राची साधनसामग्री शरीरावर लावलेल्या अवस्थेत मृत्यू येतो, हे एक कटू सत्य आहे. दुसरीकडे, लाखो लोक, जातीसंहार, दुष्काळ, एड्‌स, मुलकी युद्ध किंवा अतिद्रारिद्र्‌याचे बळी म्हणून बेवारस मरतात.

विचारप्रवर्तक विषय

मृत्यूविषयी कसलाही विचार करू नये असे बायबल सांगत नाही. उलट, उपदेशक ७:२ म्हणते: “भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे.” मृत्यूची वास्तविकता आपल्या समोर येते तेव्हा आपण आपल्या दररोजच्या चिंता किंवा कामकाज सोडून देतो आणि जीवनाच्या अल्पतेवर लक्ष केंद्रित करतो. यामुळे, आपल्याला उर्वरित आयुष्य निरर्थकपणे घालवण्यापेक्षा होता होईल तितके अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत होते.

मृत्यूविषयी तुमचा काय दृष्टिकोन आहे? जीवनाच्या अंताविषयी तुमच्या काय भावना आहेत, काय विश्‍वास आहे, काय आशा आहे, कोणत्या भीती आहेत, याचे परीक्षण तुम्ही केले आहे का?

जीवन आणि मृत्यू यांचे नेमके स्वरूप काय आहे याचे स्पष्टीकरण देणे व ते समजून घेणे हे मानवाच्या बुद्धिपलीकडचे आहे. या विषयावर विश्‍वासार्ह अधिकाराने केवळ आपला निर्माणकर्ताच बोलू शकतो. कारण केवळ त्याच्याजवळच “जीवनाचा झरा” आहे आणि तोच आपल्याला “मृत्यूपासून सोडविणारा” आहे. (स्तोत्र ३६:९; ६८:२०) आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, देवाच्या वचनाच्या प्रकाशात आपण, मृत्यूविषयी असलेल्या काही लोकप्रिय विश्‍वासांचे परीक्षण केल्यावर आपल्याला सांत्वन व दिलासा मिळू शकतो. यावरून आपल्याला स्पष्ट होईल की मृत्यू हा सर्व गोष्टींचा शेवट नाही.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

मृत्यूची शक्यता आपल्याला अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत करते