व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सुज्ञाचा बोध”—जीवनाचा झरा

“सुज्ञाचा बोध”—जीवनाचा झरा

“सुज्ञाचा बोध”—जीवनाचा झरा

“अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!” असे प्रेषित पौलाने उद्‌गारले. (रोमकर ११:३३) आणि विश्‍वासू कुलपिता ईयोब म्हणाला: “[यहोवा देव] मनाने सुज्ञ . . . आहे.” (ईयोब ९:४) होय, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याच्या तोडीचा कोणी नाही. अशा निर्माणकर्त्याच्या बोधाविषयी किंवा लिखित वचनाविषयी काय म्हणता येईल?

स्तोत्रकर्त्याने गायिले: “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्‍वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात; परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.” (स्तोत्र १९:७, ८) या शब्दांची सत्यता प्राचीन काळाच्या राजा शलमोनाला कळाली असेल. त्याने म्हटले: “सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवितो.” (नीतिसूत्रे १३:१४) नीतिसूत्राच्या १३ व्या अध्यायाच्या पहिल्या १३ वचनांत, शलमोनाने दाखवले की, देवाच्या वचनातील सल्ल्याने कशाप्रकारे आपल्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतो आणि आपले जीवन वाचू शकते.

शिक्षण ग्रहण करणारे असा

“सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण धर्मनिंदक वाग्दंडाला मोजीत नाही” असे नीतिसूत्रे १३:१ म्हणते. पित्याकडील शिक्षण सौम्य किंवा कडक असू शकते. प्रथम ते प्रशिक्षणाच्या रूपात दिले जाऊ शकते आणि ते नाकारल्यास शिक्षेच्या रूपात दिले जाते. आपल्या पित्याची शिस्त स्वीकारणारा मुलगा सुज्ञ असतो.

बायबल म्हणते, “ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” (इब्री लोकांस १२:६) आपला स्वर्गीय पिता आपल्याला ज्याकरवी शिस्त लावतो तो एक मार्ग म्हणजे त्याचे लिखित वचन अर्थात बायबल. आपण आदरभावनेने बायबल वाचतो आणि त्यातील सूचना लागू करतो तेव्हा त्याचे वचन आपल्याला शिस्त लावत असते. याचा आपल्याला फायदा होतो कारण यहोवा जे काही सांगतो ते आपल्या हिताकरता आहे.—यशया ४८:१७.

आपल्या आध्यात्मिक हिताची चिंता करणाऱ्‍या सह उपासकाकडून मिळणाऱ्‍या सुधारणेच्या रूपातही आपल्याला शिस्त दिली जाऊ शकते. देवाच्या वचनानुरूप असलेला कोणताही मदतदायी सल्ला कोणा व्यक्‍तीकडून नव्हे तर सत्याच्या महान स्रोताकडून येत असल्याचा आपण विचार करू शकतो. तो सल्ला यहोवाकडून आहे असे समजून स्वीकारण्यातच सुज्ञता आहे. आपण तसे करतो आणि आपल्या विचारांवर त्याचा प्रभाव होऊ देतो, शास्त्रवचनांची समज सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपले मार्ग सरळ करतो तेव्हा या शिस्तीचा आपल्याला फायदा होतो. ख्रिस्ती सभा आणि बायबल आधारित प्रकाशनांतून मिळणाऱ्‍या सल्ल्याच्या बाबतीतही हेच खरे आहे. अशा लिखित किंवा बोलून दाखवलेल्या शब्दांमधून शिकत असलेल्या गोष्टींना प्रतिसाद देणे हा आत्मशिस्तीचा उत्तम मार्ग आहे.

परंतु, निंदक मात्र शिस्त स्वीकारत नाही. एका संदर्भ ग्रंथानुसार, “चांगले काय आहे ते आपल्याला ठाऊक आहे असा विचार करत असल्यामुळे तो शिक्षण ग्रहण करत नाही.” तो वाग्दंडालाही अर्थात कडक प्रकारच्या शिस्तीलाही प्रतिसाद देत नाही. पण, पित्याची शिस्त चुकीची असल्याचे तो कधी सिद्ध करू शकतो का? यहोवा कधीच चुकलेला नाही आणि तो कधी चुकणारही नाही. शिस्त नाकारून निंदा करणारा स्वतःचीच थट्टा करून घेतो. काही मोजक्या, निवडक शब्दांत शलमोनाने शिक्षण ग्रहण करण्याच्या मोलाची किती कुशलतेने जाणीव करून दिली आहे!

जीभेवर ताबा ठेवा!

आपले भाष्य देवाच्या वचनानुसार असावे याचे महत्त्व दाखवण्यासाठी इस्राएलचा राजा तोंडाची तुलना फळ देणाऱ्‍या झाडाशी करतो. तो म्हणतो: “तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वतः चांगले फळ भोगितो, पण कपटी इसमांच्या जिवाला [किंवा “जिवाच्या वासनेला”] बलात्काररूप फळ मिळते.” (नीतिसूत्रे १३:२) एखाद्याचे शब्द म्हणजे तोंडाचे फळ. आणि एक मनुष्य शब्दांच्या रूपात जे पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. एक विद्वान म्हणतो, “त्याचे शब्द सद्‌हेतुचे असले आणि शेजाऱ्‍यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असले तर “तो चांगले फळ खाईल आणि आनंदी व शांतीमय जीवन जगेल.” कपटी व्यक्‍तीची परिस्थिती याच्या उलट असते. इतरांवर जुलूम करणे, त्यांना हानी पोहंचवणे हे त्याला हवे असते. जुलूम करण्याची तो योजना करतो आणि बदल्यात त्यालाही जुलूम मिळतो. मृत्यूचा पाश त्याच्या दाराशी असतो.

शलमोन पुढे म्हणतो: “जो आपले तोंड संभाळितो तो आपला जीव राखितो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते.” (नीतिसूत्रे १३:३) अविचारी, मूर्ख भाषणाने नाव खराब होऊ शकते, मन दुखावू शकते, लोकांसोबतचे नातेसंबंध बिघडू शकतात आणि शारीरिक इजा देखील होऊ शकते. एवढेच नव्हे तर, जिभेवर ताबा नसल्याने देव नाराज होऊ शकतो कारण देव प्रत्येकाला त्याच्या शब्दांकरता जबाबदार ठरवतो. (मत्तय १२:३६, ३७) आपण आपल्या तोंडावर पूर्णपणे ताबा ठेवल्यास निश्‍चितच आपला सत्यानाश होणार नाही. आपल्या तोंडावर ताबा ठेवण्यास आपण कसे शिकू शकतो?

एक सोपा मार्ग म्हणजे अधिक न बोलणे. “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही,” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे १०:१९) दुसरा एक मार्ग म्हणजे, बोलण्याआधी विचार करणे. प्रेरित लेखक लिहितो: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” (नीतिसूत्रे १२:१८) विचार न करता काही बोलल्याने बोलणाऱ्‍याचे आणि ऐकणाऱ्‍यांचेही मन दुखावले जाऊ शकते. यास्तव, बायबल पुढील व्यावहारिक सल्ला देते: “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.”—नीतिसूत्रे १५:२८.

उद्योगी असा

शलमोन म्हणतो, “आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.” (नीतिसूत्रे १३:४) एक संदर्भ ग्रंथ म्हणतो, “[या नीतिसूत्राचा] मुद्दा असा आहे की, केवळ इच्छा असणे व्यर्थ आहे, मेहनतीपणा असला पाहिजे. आळशी लोकांच्या वासना . . . त्यांचा नाश करतात आणि त्याने काही साध्य होत नाही.” परंतु, उद्योगी व्यक्‍तीचा जीव किंवा इच्छा तृप्त होते—पुष्ट होते.

जे लोक जबाबदारी टाळण्यासाठी यहोवाला समर्पण करत नसतात त्यांच्याविषयी काय म्हणता येईल? देवाच्या नवीन जगात राहण्याची इच्छा ते दाखवत असतील परंतु त्याकरता काही करायला ते तयार असतात का? जे “मोठ्या संकटातून येतात” त्यांनी येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला आहे, यहोवाला समर्पण केले आहे आणि आपले समर्पण पाण्याच्या बाप्तिस्म्याने चिन्हांकित केले आहे अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते.—प्रकटीकरण ७:१४, १५.

मंडळीमध्ये देखरेखीचे पद प्राप्त करण्यामध्ये काय गोवले आहे याचाही विचार करा. हे चांगले काम करण्याची इच्छा धरणे प्रशंसनीय आहे आणि शास्त्रवचने याला प्रोत्साहनही देतात. (१ तीमथ्य ३:१) परंतु, केवळ ही इच्छा धरणे पुरेसे नाही. एखाद्या पदासाठी लायक ठरण्याकरता आवश्‍यक गुण आणि क्षमता विकसित कराव्या लागतात. याकरता मेहनत करावी लागते.

धार्मिकता—एक सुरक्षा

धार्मिक मनुष्य ईश्‍वरी गुण विकसित करतो आणि सत्य बोलतो. त्याला जाणीव असते की लबाड बोलणे हे यहोवाच्या नियमाविरुद्ध आहे. (नीतिसूत्रे ६:१६-१९; कलस्सैकर ३:९) या बाबतीत, शलमोन म्हणतो: “धार्मिकाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा यांस कारण होतो.” (नीतिसूत्रे १३:५) धार्मिक मनुष्य केवळ असत्याला टाळत नाही तर त्याला चक्क त्याचा तिटकारा वाटतो. त्याला ठाऊक असते की, लबाडी कितीही साधी दिसत असली तरी चांगल्या नातेसंबंधाकरता ती नाशकारक ठरते. शिवाय, जो मनुष्य लबाड बोलतो त्याच्यावर लोकांचा भरवसा राहत नाही. दुष्ट मनुष्य खोटे बोलून किंवा इतर मार्गाने निर्लज्जपणे वागतो आणि स्वतःची नालस्ती करून घेतो.

देवाच्या नजरेत जे योग्य ते केल्याने फायदा होतो हे दाखवण्यासाठी सुज्ञ राजा म्हणतो: “धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्‍याचे रक्षण करिते; दुष्टता पातक्यांस उताणा पाडिते.” (नीतिसूत्रे १३:६) एखाद्या गडाप्रमाणे धार्मिकता मनुष्याचे रक्षण करते परंतु दुष्टता त्याचा नाश करवते.

आव आणू नका

मानवी स्वभाव समजून इस्राएलचा राजा म्हणतो: “कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काही एक नसते; कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवितात तरी त्यांच्यापाशी बहुत धन असते.” (नीतिसूत्रे १३:७) एक मनुष्य जसा दिसतो तसा तो कदाचित नसेल. काही गरीब लोक, थाटामाटात राहत असल्याचे दाखवण्यासाठी, यशस्वी असल्याचे भासवण्यासाठी किंवा केवळ स्वतःची प्रतिमा राखण्यासाठी धनी असल्याचा आव आणतील. आणखी एखादा धनवान मनुष्य केवळ आपले धन लपवण्याकरता गरीब असण्याचा आव आणेल.

आव आणणे ठीक नाही आणि आपली नेमकी स्थिती लपवणेही ठीक नाही. आपल्याजवळ भरपूर पैसा नसल्यास, केवळ धनी असल्याचे लोकांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तूंवर पैसा खर्च केल्याने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार नाहीत. शिवाय, धनी असूनही गरिबीचा आव आणणारा मनुष्य कंजूषपणा करेल आणि यामुळे त्याला आत्म-सन्मान राहणार नाही व उदारतेमुळे मिळणारा आनंद त्याला मिळणार नाही. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) प्रामाणिकपणे जगणे म्हणजे उत्तम जीवन जगणे.

आपल्या इच्छा निर्मळ राखा

शलमोन म्हणतो, “मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याचे द्रव्य होय, परंतु दरिद्र्‌याला धमकी ऐकावी लागत नाही.” (नीतिसूत्रे १३:८) या सुज्ञ म्हणीतून काय धडा शिकायला मिळतो?

श्रीमंतीचे पुष्कळ फायदे आहेत परंतु धनाने आशीर्वाद मिळतीलच याची शाश्‍वती नाही. आपण ज्या संकटमय काळात राहत आहोत त्यात धनवानांना व त्यांच्या कुटुंबांना नेहमी खंडणीसाठी अपहरण केले जाण्याचा धोका असतो. काही वेळा, एक धनी मनुष्य खंडणी देऊन आपला जीव किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याचा जीव वाचवू शकतो. पण सहसा अपहरण केलेल्या व्यक्‍तीचा खून केला जातो. धनवानाच्या डोक्यावर सतत ही टांगती तलवार असते.

गरीब असलेल्या मनुष्याला अशी कोणतीच चिंता नसते. त्याच्याजवळ धनवानांकडे असलेल्या सुखसोयी किंवा भौतिक वस्तू नसतील पण निदान अपहरणकर्त्यांचे तो लक्ष्य बनत नाही. बेताच्या इच्छा ठेवण्याचा व धनाच्या मागे आपला वेळ आणि आपली शक्‍ती खर्च न करण्याचा हा एक फायदा आहे.—२ तीमथ्य २:४.

‘ज्योतिप्रमाणे’ प्रज्वलित व्हा

यहोवाच्या पद्धतीने कार्य करणे आपल्या फायद्याचे आहे हे शलमोन पुढे दाखवतो. तो म्हणतो, “धार्मिकांची ज्योति प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो.”—नीतिसूत्रे १३:९.

आपल्या जीवनाचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी आपण ज्यावर अवलंबून राहतो त्याला ही ज्योती सूचित करते. ‘देवाचे वचन धार्मिकाच्या पावलांकरिता दिव्यासारखे व त्याच्या मार्गावर प्रकाश आहे.’ (स्तोत्र ११९:१०५) त्यात निर्माणकर्त्याचे असीम ज्ञान आणि बुद्धी आहे. देवाच्या इच्छेविषयी आणि उद्देशाविषयी आपण जितके अधिक शिकू तितकाच आपल्याला मार्गदर्शित करणारा आध्यात्मिक प्रकाश प्रखर होईल. हे केवढ्या आनंदाचे कारण आहे! जगीक बुद्धी किंवा “जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे” तिने आपण विकर्षित का व्हावे?—१ तीमथ्य ६:२०; १ करिंथकर १:२०; कलस्सैकर २:८.

दुष्ट मनुष्याचा दिवा कितीही प्रखरतेने पेटत असला आणि तो कितीही सुसंपन्‍न दिसत असला तरी त्याचा दीप विझवला जाईल. त्याची स्थिती अंधकारमय होईल आणि तो निश्‍चित अडखळेल. शिवाय, त्याला “भावी आशा नसते.”—नीतिसूत्रे २४:२०, सुबोध भाषांतर.

परंतु, एखाद्या विशिष्ट प्रसंगी काय करावे याविषयी आपल्याला पक्के ठाऊक नसेल तर आपण काय करावे? आणि एखादे पाऊल उचलण्याचा अधिकार आपल्याला आहे का याचीच आपल्याला शंका असेल तर काय? नीतिसूत्रे १३:१० इशारा देते: “गर्वामुळे भांडणे मात्र होतात.” ज्ञान नसताना किंवा अधिकार नसताना कार्य करणे गर्विष्ठपणा आहे आणि यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. जे ज्ञानी आणि समजंस आहेत अशांकडून मसलत घेणे बरे नसेल का? सुज्ञ राजा म्हणतो, “चांगली मसलत घेणाऱ्‍यांजवळ ज्ञान असते.”

खोट्या अपेक्षांबद्दल सावधान

पैसा फायदेकारक आहे. तंगीत किंवा दारिद्र्‌यात राहण्यापेक्षा पुरेसा पैसा असणे केव्हाही बरा. (उपदेशक ७:११, १२) परंतु, वाईट मार्गाने कमावलेल्या पैशाचे कल्पित फायदे फसवे असू शकतात. शलमोन इशारा देतो: “घाईने मिळविलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ मूठ साठवितो त्याचे धन वृद्धि पावते.”—नीतिसूत्रे १३:११.

जुगार खेळण्याच्या मोहाचे उदाहरण घ्या. जुगारी मनुष्य अधिक पैसा कमावण्याच्या आशेने आपल्या कष्टाचा पैसा खर्च करेल. पण कित्येक वेळा त्याच्या कुटुंबाला याचे नुकसान भोगावे लागते! आणि जुगारी मनुष्य जिंकल्यास काय होते? हा पैसा कष्टाविना मिळाल्यामुळे त्याला त्या पैशांची कदर नसते. शिवाय, अचानक मिळालेला हा पैसा सांभाळण्याची कुशलताही त्याच्याजवळ नसते. जितक्या सहजगत्या त्याने ते पैसे कमावलेले असतात तितक्याच सहजगत्या ते खर्च होण्याचीही शक्यता असते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, हळूहळू कमावलेले धन—चांगल्या कृत्यांनी थोडे थोडे करून साठवलेले धन एकसारखे साठत राहते आणि त्याचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो.

शलमोन म्हणतो, “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ति जीवनाचा वृक्ष आहे.” (नीतिसूत्रे १३:१२) अपुऱ्‍या आशेने निराशा होणे साहजिक आहे आणि याने अंतःकरण कष्टी होते. हे दररोजच्या जीवनात घडते. परंतु, देवाच्या वचनावर ठामपणे आधारलेल्या आशेच्या बाबतीत हे घडत नाही. त्या आशा निश्‍चित पूर्ण होतील अशी आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो. ज्याला आपण उशीर समजतो त्याने देखील निराशा होण्याची शक्यता कमी असते.

उदाहरणार्थ, देवाचे नवीन जग लवकरच येणार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. (२ पेत्र ३:१३) देवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत. ही वाट पाहत असताना आपण “प्रभूच्या कामात” व्यस्त राहिलो, सह-उपासकांना उत्तेजन दिले आणि यहोवासोबत अधिक जवळचा नातेसंबंध विकसित केला तर काय होईल? आपले “अंतःकरण कष्टी” होण्याऐवजी आपण आनंदी असू. (१ करिंथकर १५:५८; इब्री लोकांस १०:२४, २५; याकोब ४:८) दीर्घकाळापासून असलेली एखादी इच्छा पूर्ण होते तेव्हा ती जीवनाचा वृक्ष ठरते—चैतन्य आणि तजेला देणारी ठरते.

देवाचा बोध—जीवनाचा झरा

देवाची आज्ञा मानण्याच्या गरजेविषयी नीतिसूत्रे १३:१३ [NW] म्हणते: “वचन न पाळणाऱ्‍याची गहाण ठेवलेली वस्तू जप्त केली जाते, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्‍यांस चांगले प्रतिफल मिळते.” कर्जदार मनुष्याने कर्ज न फेडून आपले वचन ठेवले नाही तर त्याने गहाण ठेवलेली वस्तू तो गमावेल. त्याचप्रमाणे, आपण देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर आपले नुकसान होईल. कसले नुकसान?

“सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवितो.” (नीतिसूत्रे १३:१४) सर्वज्ञानी देव, यहोवा याच्या बोधाविना जगल्याने उत्तम आणि दीर्घायुष्याचे मार्गदर्शन आपल्याला मिळणार नाही. ते केवढे मोठे नुकसान ठरेल! त्यामुळे, आपल्याकरता सुज्ञतेचा मार्ग म्हणजे, देवाच्या वचनाचा अभ्यास करणे आणि त्याचा आपल्या विचारांवर, बोलण्यावर आणि कृतीवर परिणाम होऊ देणे.—२ करिंथकर १०:५; कलस्सैकर १:१०.

[२३ पानांवरील चित्रे]

शास्त्रवचनीय सल्ल्याला प्रतिसाद देणे ही आत्म-शिस्तीची उत्तम पद्धत आहे

[२४ पानांवरील चित्रे]

“धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो”

[२४ पानांवरील चित्रे]

“प्रभूच्या कामात” व्यस्त राहिल्याने आपल्याला आनंद मिळतो