व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईश्‍वरी हस्तक्षेप आपण कशाची अपेक्षा करू शकतो?

ईश्‍वरी हस्तक्षेप आपण कशाची अपेक्षा करू शकतो?

ईश्‍वरी हस्तक्षेप आपण कशाची अपेक्षा करू शकतो?

सा.यु.पू. आठव्या शतकात, ३९ वर्षांचा यहुदी राजा हिज्कीया याला कळाले की आपल्याला एक असाध्य रोग जडला आहे. या बातमीने हताश झालेल्या हिज्कीयाने आपल्याला बरे करण्यासाठी देवाला कळकळून प्रार्थना केली. देवाने आपल्या संदेष्ट्यामार्फत त्याला उत्तर दिले: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रु पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवितो.”—यशया ३८:१-५.

त्या विशिष्ट प्रसंगी देवाने हस्तक्षेप का केला? अनेक शतकांआधी, देवाने नीतिमान राजा दावीद याला असे वचन दिले होते: “तुझे घराणे व तुझे राज्य ही तुजपुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.” देवाने हे देखील प्रकट केले की, मशीहा दावीदाच्या वंशातून जन्मेल. (२ शमुवेल ७:१६; स्तोत्र ८९:२०, २६-२९; यशया ११:१) हिज्कीया आजारी पडला तेव्हा त्याला अद्याप पुत्र झाला नव्हता. यास्तव, दावीदाच्या शाही वंशावळीत खंड पडण्याचा धोका होता. हिज्कीयाच्या बाबतीत, ईश्‍वरी हस्तक्षेपामुळे मशीहापर्यंत पोहंचणारी वंशावळ वाचवण्याचा खास उद्देश साध्य करण्यात आला.

आपली वचने पूर्ण करण्यासाठी, ख्रिस्त-पूर्व काळात यहोवा अनेकदा आपल्या लोकांकरता हस्तक्षेप करण्यास प्रवृत्त झाला. ईजिप्तमधील गुलामीतून इस्राएलच्या मुक्‍ततेविषयी मोशेने म्हटले: “परमेश्‍वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून, मिसर देशाचा राजा फारो ह्‍याच्या हातातून सोडवून बाहेर आणिले ह्‍याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची इच्छा आहे.”—अनुवाद ७:८.

पहिल्या शतकात, ईश्‍वरी हस्तक्षेपामुळे देवाचे उद्देश पूर्ण होण्यास मदत झाली. उदाहरणार्थ, दमिष्कला जाणाऱ्‍या रस्त्यावर, शौल नावाच्या एका यहुद्याला, त्याने ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ थांबवावा म्हणून एक चमत्कारिक दृष्टान्त झाला. नंतर प्रेषित पौल बनलेल्या या यहुद्याच्या मतांतराने राष्ट्रांमध्ये सुवार्तेचा प्रसार होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.—प्रेषितांची कृत्ये ९:१-१६; रोमकर ११:१३.

हस्तक्षेप सर्रास होत असे का?

ईश्‍वरी हस्तक्षेप प्रत्येक वेळी होत असे की केवळ अपवाद म्हणून? शास्त्रवचने स्पष्टपणे दाखवतात की, तो सर्रास होत नव्हता. देवाने तीन इब्री तरुणांना धगधगत्या आगीच्या भट्टीतून वाचवले आणि संदेष्टा दानीएलाला सिंहाच्या गुहेतून सहीसलामत बाहेर आणले तरी इतर संदेष्ट्यांना त्याने मृत्यूपासून वाचवण्यासाठी काही केले नाही. (२ इतिहास २४:२०, २१; दानीएल ३:२१-२७; ६:१६-२२; इब्री लोकांस ११:३७) हेरोद अग्रीप्पा पहिला याने पेत्राला ज्या तुरुंगात ठेवले होते तेथून त्याची चमत्कारिकरित्या सुटका झाली. परंतु याच राजाने प्रेषित याकोबाला ठार मारले होते आणि देवाने हा गुन्हा थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला नाही. (प्रेषितांची कृत्ये १२:१-११) देवाने प्रेषितांना रोग्यांना बरे करण्याचे एवढेच नव्हे तर मृतांना जिवंत करण्याचे सामर्थ्य दिले तरीसुद्धा प्रेषित पौलाच्या “शरीरात [जो] काटा”—कदाचित शारीरिक आजारपण—तो काढण्याची अनुमती देवाने दिली नाही.—२ करिंथकर १२:७-९; प्रेषितांची कृत्ये ९:३२-४१; १ करिंथकर १२:२८.

रोमन सम्राट नीरोने ख्रिस्ताच्या शिष्यांवर अचानक छळ आणला तेव्हा देवाने तो रोखण्यास हस्तक्षेप केला नाही. ख्रिश्‍चनांना यातना देण्यात आल्या, त्यांना जिवंत जाळण्यात आले आणि जंगली प्राण्यांपुढे टाकण्यात आले. परंतु, या विरोधाचे प्रारंभिक ख्रिश्‍चनांना आश्‍चर्य वाटले नाही आणि देवाच्या अस्तित्वावरील त्यांचा विश्‍वास यामुळे मुळीच खचला नाही. येशूने आपल्या शिष्यांना आधीच इशारा दिला होता की, त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येईल आणि विश्‍वासाकरता त्यांनी त्रास सहन करण्यास व मरण्यासही तयार असावे.—मत्तय १०:१७-२२.

गतकाळाप्रमाणे आजही देव आपल्या सेवकांना धोकेदायक प्रसंगांमधून निश्‍चित वाचवू शकतो आणि त्याचे संरक्षण प्राप्त झाल्याचे ज्यांना वाटते त्यांची टीका इतरांनी करता कामा नये. परंतु, अशा बाबींमध्ये देवाने हस्तक्षेप केला किंवा केला नाही हे ठामपणे सांगणे कठीण आहे. टुलुसमध्ये एका स्फोटात यहोवाचे कित्येक विश्‍वासू सेवक जखमी झाले आणि नात्सी व कम्युनिस्ट बंधनागृहांमध्ये किंवा इतर दुर्घटनांमध्ये हजारो विश्‍वासू ख्रिस्ती मरण पावले तरी देवाने काही हस्तक्षेप केला नाही. देवाची कृपापसंती असलेल्या सर्वांच्या बाबतीत तो पद्धतशीररित्या हस्तक्षेप का करत नाही?—दानीएल ३:१७, १८.

“समय व प्रसंग”

एखादी आपत्ती येते तेव्हा कोणावरही तिचा परिणाम होऊ शकतो आणि देवाला विश्‍वासू असण्यामुळे फरक पडतोच असे नाही. टुलुसमध्ये झालेल्या स्फोटातून आलन आणि लिल्यान वाचले परंतु त्या दुर्घटनेत ३० जण मरण पावले आणि शकडो लोक जखमी झाले—त्यांची काहीही चूक नसताना. एका मोठ्या प्रमाणात, लाखो लोक गुन्हेगारी, बेपर्वाईने गाडी चालवणे किंवा युद्धे यांना बळी पडतात; त्यांच्या या संकटाला देव जबाबदार असू शकत नाही. बायबल आपल्याला आठवण करून देते की, “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.”—उपदेशक ९:११.

इतकेच नव्हे तर मानव आजारपण, वृद्धापकाळ आणि मृत्यूलाही वश आहेत. देवाने आपला जीव वाचवला किंवा आपल्याला आजारपणातून चमत्कारिकरित्या बरे केले असे ज्यांना वाटले आहे त्यांनाही कालांतराने मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. आजारपण आणि मृत्यू नाहीसा केला जाईल व मनुष्याच्या डोळ्यांतून ‘सर्व अश्रू पुसून टाकले जातील’ तो काळ अद्याप भविष्यात आहे.—प्रकटीकरण २१:१-४.

ते घडण्यासाठी एखादप्रसंगी हस्तक्षेप करून फायदा नाही; त्याकरता व्यापक आणि संपूर्ण बदल होण्याची आवश्‍यकता आहे. बायबलमध्ये एका घटनेविषयी सांगितले आहे जिला “परमेश्‍वराचा मोठा दिवस” म्हटले आहे. (सफन्या १:१४) व्यापक प्रमाणावरील या हस्तक्षेपात देव सर्व दुष्टाई संपवून टाकील. मानवजातीला परिपूर्ण परिस्थितींमध्ये सर्वकाळ जगण्याची सुसंधी दिली जाईल ज्यामध्ये “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यशया ६५:१७) मृतांनाही पुन्हा जिवंत केले जाईल व अशाप्रकारे मानवी दुर्घटनांपैकी सर्वात मोठी दुर्घटना उलटवली जाईल. (योहान ५:२८, २९) त्या वेळी, प्रेम आणि चांगुलपणात असीम असलेल्या देवाने मानवजातीच्या समस्या पूर्णतः सोडवलेल्या असतील.

आज देवाचा हस्तक्षेप कशाप्रकारे

याचा अर्थ असा नाही की, सृष्टी यातना भोगत असते आणि देव भावनाशून्यासारखा केवळ पाहत असतो. आज, देव प्रत्येक वंश किंवा सामाजिक पार्श्‍वभूमीच्या सर्व मानवांना त्याला जाणून घेण्याची व त्याच्यासोबत घनिष्ठता निर्माण करण्याची संधी देत आहे. (१ तीमथ्य २:३, ४) येशूने याचे वर्णन पुढील शब्दांत केले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) देवाचे सेवक जगभरात जो राज्याचा संदेश घोषित करत आहेत त्याकरवी तो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना त्याच्याजवळ आणत आहे.

शिवाय, जे त्याचे मार्गदर्शन स्वीकारू इच्छितात अशांच्या जीवनावर तो थेट प्रभाव करतो. आपल्या पवित्र आत्म्याने देव ‘त्यांचे अंतःकरण उघडतो’ आणि त्यांना आपल्या इच्छेची समज देतो व त्याच्या अपेक्षेनुसार वागण्याचा विचार त्यांच्या मनात घालतो. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, सुबोध भाषांतर) होय, त्याच्याविषयी, त्याच्या वचनाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी जाणून घेण्याची संधी देऊन आपल्यातील प्रत्येकावर त्याचे प्रेम आहे याचा पुरावा तो देतो.—योहान १७:३.

शेवटी, देव आपल्या सेवकांना चमत्कारिकरित्या सुटका देऊन नव्हे तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपला पवित्र आत्मा आणि “सामर्थ्याची पराकोटी” देऊन त्यांना आज मदत करतो. (२ करिंथकर ४:७) प्रेषित पौलाने लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.

अशातऱ्‍हेने, आपल्याला जीवन दिल्याबद्दल आणि दुःखापासून मुक्‍त असलेल्या जगात सर्वकाळ जगण्याची आशा दिल्याबद्दल देवाचे दररोज आभार मानण्याचे कारण आपल्याजवळ आहे. “परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?,” असे स्तोत्रकर्त्याने विचारले. “मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्‍वराच्या नावाचा धावा करीन.” (स्तोत्र ११६:१२, १३) ही पत्रिका नियमितपणे वाचल्याने तुम्हाला सद्यकाळात ज्याने आनंद मिळेल आणि भविष्याकरता भक्कम आशा मिळेल असे देवाने काय केले आहे, करत आहे आणि करणार आहे याविषयी तुम्ही जाणाल.—१ तीमथ्य ४:८.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” —यशया ६५:१७

[५ पानांवरील चित्रे]

बायबल काळात जखऱ्‍याला दगडमार करण्यात आला तेव्हा . . .

आणि हेरोदने निष्पाप जणांची हत्या केली तेव्हा देखील यहोवाने हस्तक्षेप केला नाही

[७ पानांवरील चित्र]

दुःख नसेल, मृतांनाही जिवंत केले जाईल ती वेळ जवळ आली आहे