व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धर्म—मानवजातीच्या समस्यांचे मूळ कारण?

धर्म—मानवजातीच्या समस्यांचे मूळ कारण?

धर्म—मानवजातीच्या समस्यांचे मूळ कारण?

“धर्म जेव्हा झगड्याला उत्तेजन देत नसतो तेव्हा तो मानवी विवेकाला बधिर करणाऱ्‍या अंमली पदार्थासारखा कार्य करत असतो आणि मानवी मेंदूमध्ये वास्तविकतेपासून पळ काढणाऱ्‍या कल्पना भरत असतो. . . . [तो] मानवांमध्ये, संकोचित मनोवृत्ती, अंधविश्‍वास, द्वेष आणि भय उत्पन्‍न करतो.” असे पूर्वी मेथोडिस्ट मिशनरी असलेल्या गृहस्थाने लिहिले; त्याने पुढे असेही म्हटले: “हे आरोप खरे आहेत. धर्म दोन प्रकारचा असतो, एक चांगला आणि एक वाईट.”—आपल्या स्वतःचा धर्म सुरू करा (इंग्रजी).

‘अशी टीका योग्य नाही,’ असे काहीजण म्हणतील. पण, इतिहासात घडलेल्या गोष्टींना कोण नाकारू शकतो? बहुतांशी, धर्माचा—ज्याची व्याख्या “देवाची किंवा अलौकिकाची सेवा आणि उपासना” अशी केली जाते—धक्केदायक इतिहास राहिला आहे. धर्म बोधकारक आणि प्रेरणादायक असला पाहिजे. पण बहुतेक वेळा, तो झगडे, असहिष्णुता आणि द्वेष उत्पन्‍न करतो. असे का?

चुकीचा मार्ग दाखवणारा ‘तेजस्वी देवदूत’

बायबलनुसार याचे उत्तर फार साधेसोपे आहे. “तेजस्वी देवदूताचे” सोंग घेणाऱ्‍या दियाबल सैतानाने कोट्यवधी लोकांना फसवून देवाच्या शिकवणुकींऐवजी स्वतःच्या शिकवणुकी अनुसरण्यास त्यांना भाग पाडले आहे. (२ करिंथकर ११:१४) सैतानाचा प्रभाव किती व्यापक आहे हे प्रेषित योहानाने दाखवून म्हटले की, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (तिरपे वळण आमचे.) (१ योहान ५:१९) सैतान ‘सर्व जगाला ठकवत’ होता हे योहानाला ठाऊक होते.—प्रकटीकरण १२:९.

याचा काय परिणाम झाला आहे? सैतानाने अशा धार्मिक व्यवस्था निर्माण केल्या आहेत ज्या वरवर पाहिल्यास पवित्र वाटतात. त्या ‘धार्मिकतेचा बुरखा पांघरून’ आहेत पण त्यांची खरी स्थिती त्यांच्या वाईट फळांनी उघडकीस येते. (२ तीमथ्य ३:५, मराठी कॉमन लँग्वेज; मत्तय ७:१५-२०) अशाप्रकारे, मानवांच्या समस्या सोडवण्याऐवजी धर्म स्वतःच एक समस्या होऊन बसला आहे.

हे शक्यच नाही किंवा यात काही तथ्य नाही असा लगेच विचार करू नका. लक्षात ठेवा, फसवणुकीचे स्वरूपच असे असते की फसणाऱ्‍याला आपण फसतोय याची जराही कल्पना नसते. प्रेषित पौलाने याचे एक उदाहरण दिले; त्याने लिहिले: “परराष्ट्रीय जे यज्ञ करितात ते देवाला नव्हे तर भुतांना करितात.” (१ करिंथकर १०:२०) ते लोक भुतांची उपासना करत होते हे ऐकून त्यांना कदाचित धक्का बसला असेल. त्यांना वाटत होते की, आपण एखाद्या चांगल्या देवाची किंवा देवतांची भक्‍ती करत आहोत. पण वास्तविकतेत, ‘आकाशातल्या दुरात्म्यांनी’ त्यांची फसगत केली होती; हे दुरात्मे, मानवांना चुकीच्या मार्गावर नेणाऱ्‍या सैतानाला मदत करतात.—इफिसकर ६:१२.

प्रेषित योहानाने या दुरात्मिक प्रभावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता; पण ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या ज्या लोकांनी तो मुद्दामहून नाकारला, त्यांना फसवण्यात आणि चुकीच्या मार्गावर नेण्यात सैतान कसा सफल झाला याचे आपण एक उदाहरण पाहू या.—१ करिंथकर १०:१२.

येशूची शिकवण देवाकडून होती

येशू ख्रिस्त म्हणाला, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” (योहान ७:१६) होय, त्याने जे शिकवले ते सर्वशक्‍तिमान देवाकडून होते. यास्तव, येशूच्या शिकवणींचा त्याचे ऐकणाऱ्‍या लोकांवर शक्‍तिशाली व बोधकारक प्रभाव पडे. या शिकवणुकी, ‘मानवी विवेकाला बधिर करणाऱ्‍या नव्हत्या किंवा वास्तविकतेपासून पळ काढणाऱ्‍या कल्पना लोकांच्या मनात भरणाऱ्‍या नव्हत्या.’ याच्या अगदी उलट, दियाबलाच्या फसवणुकीमुळे ‘अंधकारमय बुद्धी’ झालेल्या जगाच्या धार्मिक चुकांपासून आणि मानवी तत्त्वज्ञानापासून येशूच्या शिकवणींनी लोकांना मुक्‍त केले.—इफिसकर ४:१८; मत्तय १५:१४; योहान ८:३१, ३२.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख, शुद्धतेचा केवळ स्वीकार करून नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याचे आकर्षक गुण प्रदर्शित करणाऱ्‍या विश्‍वासाने झाली. (गलतीकर ५:२२, २३; याकोब १:२२; २:२६) या गुणांमधील सर्वात उल्लेखनीय—आणि खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे ओळख चिन्ह असलेला गुण म्हणजे प्रेमाचा उदात्त गुण.—योहान १३:३४, ३५.

परंतु हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या: ख्रिस्ती मंडळीची जशी सुरवात करण्यात आली होती तशीच ती राहील अशी येशूने किंवा त्याच्या प्रेषितांनीही अपेक्षा केली नाही. त्यांना ठाऊक होते की, धर्मत्याग निर्माण होईल आणि खरा धर्म काही काळापर्यंत झाकला जाईल.

काही काळापर्यंत खरा धर्म झाकला जातो

गहू आणि निदणांच्या एका दाखल्यात येशूने भाकीत केले की, खरा धर्म अक्षरशः काही काळापर्यंत स्पष्ट दिसणार नाही. मत्तय १३:२४-३०, ३६-४३ मधील अहवाल स्वतःच वाचून पाहा. येशूने एका शेतात गहू अर्थात त्याच्या विश्‍वासू शिष्यांना चित्रित करणारे “चांगले बी” पेरले; मूळ ख्रिस्ती मंडळीची सुरवात यांनीच झाली. पण त्याने ताकीद दिली की, एक “वैरी” अर्थात दियाबल सैतान गव्हाच्या या शेतात “निदण” पेरेल; म्हणजे, असे लोक जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी असण्याचा दावा करतात पण त्याच्या शिकवणींना नाकारतात.

येशूच्या प्रेषितांचा मृत्यू होऊन काही काळ लोटताच असे काही लोक आले जे ‘निदणांसारखे’ होते, ज्यांनी “परमेश्‍वराचे वचन” धिक्कारून विपरित मानवी शिकवणुकींचे समर्थन केले. (यिर्मया ८:८, ९; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) परिणामस्वरूप, भ्रष्ट व खोटा ख्रिस्ती धर्म जगात अवतरला. बायबल म्हणते त्याप्रमाणे, या धर्मावर ‘अनीतिमान पुरुषाचे’—‘सर्व प्रकारच्या अनीतिजनक कपटाने’ भरलेल्या नीतिभ्रष्ट पाळक वर्गाचे—वर्चस्व होते. (२ थेस्सलनीकाकर २:६-१०) येशूने भाकीत केले की, “युगाच्या समाप्तीस” ही परिस्थिती बदलणार होती. गव्हासमान ख्रिश्‍चनांना एकत्र केले जाईल आणि ‘निदणांना’ सरतेशेवटी नष्ट केले जाईल.

हा खोटा ख्रिस्ती धर्म “शतकांपासून चालत आलेल्या सर्व क्रूरतेला” आणि नंतरच्या शतकांमध्ये ख्रिस्ती धर्म जगतावर पसरलेल्या आध्यात्मिक अंधकाराला जबाबदार आहे. तसेच धर्माच्या नावाने त्यानंतर घडलेली इतर नीतिभ्रष्ट व हिंसक कृत्ये आधीच ताडून प्रेषित पेत्राने उचितपणे असे भाकीत केले की, त्यांच्यामुळे [तथाकथित ख्रिश्‍चनांमुळे] सत्य मार्गाची निंदा होईल.”—२ पेत्र २:१, २.

“राग आणि द्वेषावर आधारलेला धर्मसिद्धान्त”

केवळ ख्रिस्ती धर्म जगतानेच धर्माचे नाव खराब केलेले नाही. ‘लष्करी धर्मनिष्ठेची’ मूलतत्त्ववादी उदाहरणेच पाहा. पूर्वी नन असलेल्या कॅरेन आर्मस्ट्राँग यांच्या मते, “प्रत्येक प्रमुख धार्मिक परंपरेने” ती उदाहरणे उत्पन्‍न केली आहेत. आर्मस्ट्राँग यांच्या मते, कोणताही धर्म “दयाळुपणा आचरणात” आणणारा असला पाहिजे; हीच त्याची सर्वात महत्त्वाची परीक्षा ठरेल. या संदर्भात मूलतत्त्ववादी धर्मांचा काय इतिहास राहिला आहे? त्या लिहितात, “मूलतत्त्ववादी धर्म, मग तो यहुदी, ख्रिस्ती, किंवा मुस्लिम असो, जर राग आणि द्वेषाचा धर्मसिद्धान्त बनला तर तो या महत्त्वाच्या परीक्षेतून पार पडणार नाही.” (देवाकरता युद्ध—यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांतील मूलतत्त्ववाद, इंग्रजी) पण या परीक्षेत केवळ “मूलतत्त्ववादी” धर्मच फसले आहेत का आणि केवळ तेच “राग आणि द्वेषाचा धर्मसिद्धान्त” बनले आहेत का? इतिहासाचे याला वेगळेच उत्तर आहे.

सैतानाने खोट्या धर्माचे एक जागतिक साम्राज्य उभारले आहे आणि राग, द्वेष आणि अंतहीन रक्‍तपात हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बायबल या साम्राज्याला “मोठी बाबेल, . . . व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” म्हणते आणि तिला पशूसमान राजकीय व्यवस्थेच्या पाठीवर बसलेल्या वेश्‍येच्या रूपात चित्रित केले आहे.—प्रकटीकरण १७:४-६; १८:२४.

सगळेच फसलेले नाहीत

परंतु, सगळेच फसलेले नाहीत याला इतिहास पुरावा देतो. मेल्विन ब्रॅग म्हणतात की, सर्वात काळोखमय काळातही “बहुतेक जण वाईट कृत्ये करत असताना पुष्कळ जण चांगले होते.” खरे ख्रिस्ती, “[देवाची] उपासना आत्म्याने व खरेपणाने” करत राहिले. (योहान ४:२१-२४) “लष्करी शक्‍तीचे समर्थन” करून वेश्‍येगिरी केलेल्या जागतिक धार्मिक व्यवस्थेपासून ते वेगळे राहिले. चर्च आणि राष्ट्र यांच्यातील कोणत्याही व्यवहारात सामील होण्यास त्यांनी नकार दिला; इतिहास प्रकट करतो की, चर्च आणि राष्ट्र यांच्यामधील हा नातेसंबंध “नासरेथच्या येशूने केलेला नव्हे तर सैतानाने केलेल्या कराराप्रमाणे” होता.—टू थाऊसंड इयर्स—द सेकंड मिलेनियम: फ्रॉम मिडिव्हियल ख्रिसनडम टू ग्लोबल ख्रिस्च्यानिटी.

अलीकडील वर्षांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांचा चांगला प्रभाव जगप्रसिद्ध झाला आहे. खोट्या धर्माच्या कोणत्याही कलंकापासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी त्यांनी केवळ देवाच्या प्रेरित वचनातील अर्थात बायबलमधील विश्‍वास आणि कृती पाळल्या आहेत. (२ तीमथ्य ३:१६, १७) शिवाय, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे, “तुम्ही जगाचे” होऊ नये ही येशूची आज्ञा त्यांनी पाळली आहे. (योहान १५:१७-१९; १७:१४-१६) उदाहरणार्थ, नात्सी जर्मनीत, त्यांनी ख्रिस्ती तत्त्वांशी हातमिळवणी करण्यास थेट नकार दिला आणि म्हणून नात्सींच्या विचारसरणीनुसार त्यांचा स्वीकार करण्यात आला नाही. त्याकरता हिटलर त्यांचा द्वेष करत होता. एका शाळेच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “यहोवाचे साक्षीदार, . . . कोणतेही हत्यार वापरू नये या बायबलमधील शिकवणीचे पालन करत होते. म्हणून त्यांनी लष्करात सेवा करण्यास किंवा नात्सींच्या कोणत्याही कार्यात भाग घेण्यास नकार दिला. परिणामस्वरूप, एसएस गाड्‌र्सनी यहोवाच्या साक्षीदारांच्या संपूर्ण कुटुंबांना तुरुंगात टाकले.” (जर्मनी—१९१८-४५) होय, नात्सींच्या छळाला जर्मनीतील शेकडो यहोवाचे साक्षीदार बळी पडले.

विविध धर्मांच्या काही वीर व्यक्‍तींनीही आपल्या विश्‍वासाकरता छळ सहन केला आहे. मात्र, यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत पाहिल्यास त्यांच्या संयुक्‍त धार्मिक संघाने छळ सहन केला. “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे” हे मूलभूत शास्त्रवचनीय तत्त्व बहुतेकांनी पाळले.—प्रेषितांची कृत्ये ५:२९; मार्क १२:१७.

समस्येचे मूळ

यास्तव, धर्म हा मानवांच्या सर्व समस्यांच्या मुळाशी आहे असे म्हणणे पूर्णतः खरे ठरणार नाही. खरे पाहता, खोटा धर्म मानवांच्या समस्यांच्या मुळाशी आहे. परंतु, लवकरच देव सगळे खोटे धर्म काढून टाकणार आहे. (प्रकटीकरण १७:१६, १७; १८:२१) न्याय आणि नीतिमत्त्व प्रिय असलेल्या कोणालाही त्याची अशी आज्ञा आहे: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या [म्हणजे, मोठी बाबेल जी खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य आहे] पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली’ आहे; आणि तिची अनीति देवाने लक्षात घेतली आहे.” (प्रकटीकरण १८:४, ५) होय, जो धर्म ‘झगड्याला उत्तेजन देतो, मानवी विवेकाला बधिर करतो, आणि मानवी मेंदूमध्ये वास्तविकतेपासून पळ काढणाऱ्‍या कल्पना भरतो व मानवांमध्ये, संकोचित मनोवृत्ती, अंधविश्‍वास, द्वेष आणि भय उत्पन्‍न करतो,’ त्याने खुद्द देव दुखावतो!

परंतु, जे सत्याचे प्रेमी आहेत अशांना देव शुद्ध धर्मात एकत्र करत आहे. हा धर्म प्रेमळ, न्यायी आणि करुणामय निर्माणकर्त्याच्या तत्त्वांचे व शिकवणुकींचे पालन करतो. (मीखा ४:१, २; सफन्या ३:८, ९; मत्तय १३:३०) तुम्ही त्याचा भाग बनू शकता. शुद्ध धर्म कसा ओळखायचा यावर तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, या पत्रिकेच्या प्रकाशकांना तुम्ही विना संकोच लिहू शकता किंवा कोणाही यहोवाच्या साक्षीदाराला मदत मागू शकता.

[७ पानांवरील चित्र]

सर्व पार्श्‍वभूमीच्या लोकांना शुद्ध धर्मात आनंद प्राप्त झाला आहे