व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू

आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू

आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू

“आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.”मीखा ४:५, पं.र.भा.

१. नोहाच्या काळात नैतिक परिस्थिती कशी होती आणि तो कोणत्या अर्थाने वेगळा होता?

तो देवाबरोबर चालला असा ज्याच्याविषयी बायबलमध्ये उल्लेख करण्यात आला तो प्रथम मनुष्य हनोख होता. दुसरा होता नोहा. बायबल सांगते: “नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:९) नोहाच्या काळापर्यंत सर्वसामान्य मानवजात खऱ्‍या उपासनेपासून मार्गभ्रष्ट झाली होती. अविश्‍वासू देवदूतांनी पृथ्वीवर येऊन स्त्रियांसोबत अनैसर्गिक संबंध ठेवून नेफिलिम नावाची संतती उत्पन्‍न केल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. हे नेफिलिम म्हणजे त्या काळचे “महावीर” किंवा “नामांकित पुरुष” होते.” साहजिकच, सबंध पृथ्वी जाचजुलमाने भरली! (उत्पत्ति ६:२, ४, ११) तरीपण नोहा सात्त्विकतेने चालला. तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. (२ पेत्र २:५) देवाने जीवनाचे रक्षण करण्याकरता नोहाला तारू बांधण्याची आज्ञा दिली तेव्हा नोहाने आज्ञाधारकपणे “तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:२२) खरोखर नोहा देवाबरोबर चालला.

२, ३. नोहाने आज आपल्याकरता कोणते उत्तम उदाहरण पुरवले?

पौलाने विश्‍वासू साक्षीदारांच्या यादीत नोहाचा समावेश करून असे म्हटले: “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्‍त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्‍वासाने तारू तयार केले; त्या विश्‍वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले, आणि विश्‍वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला.” (इब्री लोकांस ११:७) किती अप्रतिम उदाहरण! यहोवाची वचने अवश्‍य पूर्ण होतील याची खात्री असल्यामुळे नोहाने देवाच्या आज्ञांनुसार वागण्याकरता आपला वेळ, शक्‍ती व साधने खर्च केली. त्याचप्रकारे आजही अनेकजण या जगातील प्रापंचिक सुसंधींकडे पाठ फिरवून यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याकरता आपला वेळ, शक्‍ती व साधने खर्च करतात. त्यांचा विश्‍वास उल्लेखनीय आहे आणि त्यामुळे केवळ त्यांनाच नव्हे तर इतरांनाही तारण प्राप्त होईल.—लूक १६:९; १ तीमथ्य ४:१६.

याआधीच्या लेखात ज्याच्याविषयी चर्चा करण्यात आली त्या हनोखप्रमाणेच (जो नोहाचा पणजोबा होता) नोहा व त्याच्या कुटुंबालाही विश्‍वासाने चालणे कठीण गेले असेल. हनोखच्या काळाप्रमाणेच नोहाच्या काळातही खऱ्‍या उपासकांची संख्या फार कमी होती—केवळ आठ लोक विश्‍वासू राहून जलप्रलयातून वाचले. नोहाने हिंसाचार व अनैतिकतेने भरलेल्या जगात नीतिमत्त्वाविषयी प्रचार केला. शिवाय त्याने व त्याच्या कुटुंबाने एका जागतिक जलप्रलयाच्या तयारीत एक मोठे लाकडी तारू तयार करण्याचे काम हाती घेतले होते. पाहणाऱ्‍या लोकांना त्यांचे हे काम अगदी विचित्र वाटले असावे.

४. नोहाच्या काळातल्या लोकांच्या कोणत्या चुकीकडे येशूने लक्ष वेधले?

लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे येशूने नोहाच्या काळाविषयी उल्लेख केला तेव्हा त्याने हिंसाचाराविषयी किंवा खोट्या धर्माविषयी किंवा अनैतिकतेविषयी उल्लेख केला नाही. अर्थात या गोष्टीही अतिशय शोचनीय होत्या. पण येशूने लोकांच्या ज्या चुकीकडे लक्ष वेधले ती म्हणजे दिलेल्या इशाऱ्‍याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्याने म्हटले की “नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते.” खाणेपिणे, लग्न करणे, करून देणे—यात गैर काय होते? ते तर “सर्वसामान्य” जीवन जगत होते! पण जलप्रलय येणार होता आणि नोहा नीतिमत्त्वाचा प्रचार करत होता. त्याचे शब्द ऐकून व त्याची कृती पाहून त्यांना इशारा मिळण्यास हवा होता. पण तरीसुद्धा, “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी लक्ष दिले नाही.”—मत्तय २४:३८, ३९, NW.

५. नोहा व त्याच्या कुटुंबाला कोणत्या गुणांची गरज होती?

त्या काळाविषयी विचार केल्यास नोहाने निवडलेला मार्ग किती सुज्ञतेचा होता हे आपल्या लक्षात येते. पण जलप्रलयाच्या आधीच्या त्या काळात इतरांपेक्षा वेगळे असण्याकरता धैर्याची गरज होती. मोठे तारू बांधून त्यात प्रत्येक प्रकारचे पशू पक्षी ठेवण्याकरता नोहा व त्याच्या कुटुंबाला दृढ आत्मविश्‍वासाची गरज होती. ‘लोकांच्या नजरेत भरणारे हे काम आपल्याला करावे लागले नसते आणि चारचौघांसारखे आपणही “सर्वसामान्य” जीवन जगू शकलो असतो, तर किती बरे झाले असते’ असा त्या थोडक्या विश्‍वासू जनांपैकी कोणाच्या मनात कधी असा विचार आला असेल का? अशाप्रकारचे विचार त्यांच्या मनात क्वचितप्रसंगी आले असले तरीही त्यामुळे त्यांची सात्त्विकता कमी झाली नाही. कित्येक वर्षांनंतर नोहाच्या विश्‍वासाने त्याला जलप्रलयातून तारून नेले. त्याला जितकी वर्षे थांबावे लागले तितक्या वर्षांपर्यंत तर या व्यवस्थीकरणात आपल्यापैकी कोणालाही धीर धरावा लागणार नाही. पण महत्त्वाचे म्हणजे जे लोक “सर्वसामान्य” जीवन जगत होते व ज्यांनी त्या काळाच्या महत्त्वाकडे लक्ष दिले नाही अशा सर्वांवर यहोवाने न्यायदंड बजावला.

पुन्हा एकदा अत्याचार फोफावला

६. जलप्रलयानंतर कोणती परिस्थिती अस्तित्वात राहिली?

जलप्रलयाचे पाणी ओसरल्यावर मानवजातीने नव्याने जीवनाला सुरुवात केली. पण अजूनही मानव अपरिपूर्ण होते आणि “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात” ही वस्तूस्थिती अजूनही बदलली नव्हती. (उत्पत्ति ८:२१) शिवाय, दुरात्मे आता मानवी शरीर धारण करण्यास असमर्थ असले तरीही ते अद्यापही अतिशय सक्रिय होते. अभक्‍त मानवांच्या त्या जगाने लवकरच हे सिद्ध केले की ते “त्या दुष्टाला वश झाले आहे” आणि आजच्याप्रमाणेच खऱ्‍या उपासकांना “सैतानाच्या डावपेचांपुढे” टिकाव धरण्यासाठी प्रयास करावे लागले.—१ योहान ५:१९; इफिसकर ६:११, १२.

७. जलप्रलयानंतरच्या जगात हिंसाचार कशाप्रकारे वाढला?

निम्रोदच्या काळापासून जलप्रलयानंतरच्या पृथ्वीवर पुन्हा एकदा हिंसाचार दिसू लागला. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि तंत्रज्ञानाच्या उन्‍नतीमुळे काळाच्या ओघात हा हिंसाचारही अतिशय वाढला आहे. पूर्वी तलवार, भाले, धनुष्यबाण व रथ वापरले जायचे. अलीकडे बंदुका, तोफा, मग रायफली आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरली जाऊ लागली. पहिल्या महायुद्धात लढाऊ विमाने, रणगाडे, युद्धनौका व विषारी वायू यांसारखी पूर्वीपेक्षा जास्त भयानक शस्त्रे वापरली जाऊ लागली. या युद्धात कोट्यवधी लोकांचा बळी गेला. हे अनपेक्षित होते का? नाही.

८. प्रकटीकरण ६:१-४ यातील भाकीत कसे पूर्ण झाले आहे?

सन १९१४ मध्ये येशूला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने सिंहासनाधिष्ट करण्यात आले व ‘प्रभूचा दिवस’ तेव्हा सुरू झाला. (प्रकटीकरण १:१०) प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या एका दृष्टान्तात दिसल्याप्रमाणे येशू हा एका पांढऱ्‍या घोड्यावर बसून विजय प्राप्त करण्यास निघालेला राजा आहे. इतर घोडेस्वारही त्याच्या मागोमाग येतात व त्यांपैकी प्रत्येक घोडेस्वार मानवजातीवर एक नवी पीडा आणतो. त्यांच्यापैकी एकजण एका अग्निवर्ण घोड्यावर बसलेला असून त्याच्यावर “पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते; त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.” (प्रकटीकरण ६:१-४) हा घोडा व त्याच्यावर बसलेला स्वार युद्धांना चित्रित करतो आणि त्याला दिलेली मोठी तलवार आधुनिक युद्धांतील शक्‍तिशाली शस्त्रांच्या अभूतपूर्व नाशकारक शक्‍तीला चिन्हित करते. आज या शस्त्रांत आण्विक उपकरणांचा समावेश आहे. यांपैकी प्रत्येक उपकरण हजारो लोकांचा नाश करण्यास समर्थ आहे; रॉकेट्‌सच्या साहाय्याने ही शस्त्रे हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांवर फेकली जाऊ शकतात; तसेच एकाचवेळी लाखो लोकांचा नाश करण्यास समर्थ असणाऱ्‍या अत्याधुनिक रसायनिक व जैविक शस्त्रांनाही विसरून चालणार नाही.

आपण यहोवाच्या इशाऱ्‍यांकडे लक्ष देतो

९. आजच्या जगाचे जलप्रलयाच्या आधीच्या जगाशी कोणते साम्य आहे?

नोहाच्या काळात, नेफिलिम यांच्या चेतावणीने दुष्ट मानवांनी सबंध पृथ्वी हिंसाचाराने भरल्यामुळे यहोवाने मानवजातीचा नाश केला. आजच्या काळाविषयी काय म्हणता येईल? त्या काळाच्या तुलनेत आज जगात कमी हिंसाचार आहे का? मुळीच नाही! उलट नोहाच्या काळाप्रमाणेच, आज लोक आपापल्या उद्योगांत रमले आहेत, ते “सर्वसामान्य” जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दिल्या जाणाऱ्‍या इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करत आहेत. (लूक १७:२६, २७) मग, पुन्हा एकदा यहोवा मानवजातीचा नाश करेल याविषयी शंका बाळगण्याचे काही कारण आहे का? नाही.

१०. (क) बायबलमधील भविष्यवाण्यांमध्ये कोणता इशारा वारंवार देण्यात आला आहे? (ख) आजच्या काळात केवळ कोणता मार्ग सुज्ञतेचा आहे?

१० जलप्रलयाच्या शेकडो वर्षांआधी हनोखने भाकीत केले होते की आपल्या काळात नाश येईल. (यहूदा १४, १५) येशूनेही येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटाविषयी’ सांगितले. (मत्तय २४:२१) इतर संदेष्ट्यांनीही याविषयी इशारा दिला. (यहेज्केल ३८:१८-२३; दानीएल १२:१; योएल २:३१, ३२) आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण त्या शेवटल्या नाशाबद्दलचे अगदी सचित्र वर्णन वाचू शकतो. (प्रकटीकरण १९:११-२१) व्यक्‍तिशः आपण नोहाचे अनुकरण करून नीतिमत्त्वाचा सक्रियपणे प्रचार करत आहोत. आपण यहोवाच्या इशाऱ्‍यांकडे लक्ष देतो आणि प्रेमळपणे आपल्या शेजाऱ्‍यांनाही असेच करण्यास मदत करतो. त्याअर्थी नोहाप्रमाणेच आपणही देवाबरोबर चालत आहोत. खरोखर ज्या कोणाला जीवन हवे आहे त्याने देवाबरोबर चालणे अगत्याचे आहे. पण आपल्याला दररोज अनेक ताणतणावांना तोंड द्यावे लागते; मग आपण देवाबरोबर कसे चालत राहू शकतो? याकरता आपण देवाच्या उद्देशांच्या पूर्ततेवर दृढ विश्‍वास उत्पन्‍न केला पाहिजे.—इब्री लोकांस ११:६.

संकटसमयांत देवाबरोबर चालत राहा

११. आज आपण कोणत्या मार्गाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे अनुकरण करतो?

११ पहिल्या शतकात अभिषिक्‍त ख्रिस्ती “तो मार्ग” अनुसरतात असे त्यांच्याविषयी म्हणण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये ९:२) त्यांचे सबंध जीवन यहोवा व येशू ख्रिस्तावरील विश्‍वासावर केंद्रित होते. त्यांचा धनी येशू ज्या मार्गाने चालला त्याच मार्गाने ते देखील चालले. आजही विश्‍वासू ख्रिस्ती हेच करत आहेत.

१२. येशूने चमत्कारिकरित्या एका जमावाला खाऊ घातल्यानंतर काय घडले?

१२ दृढ विश्‍वास असणे किती महत्त्वाचे आहे हे येशूच्या सेवाकार्यादरम्यान घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते. एके प्रसंगी येशूने जवळजवळ ५,००० माणसांच्या एका जमावाला चमत्कारिकरित्या खाऊ घातले. लोकांना खूप आश्‍चर्य वाटले व ते आनंदित झाले. पण नंतर काय घडले ते पाहा. वृत्तान्तात म्हटले आहे: “त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.” (योहान ६:१०-१५) त्या रात्री तो दुसऱ्‍या ठिकाणी निघून गेला. येशूने राजा होण्यास नकार दिल्यामुळे कदाचित बऱ्‍याच लोकांची निराशा झाली असावी. कारण आपण राजा होण्याइतके बुद्धिमान व लोकांच्या शारीरिक गरजाही तृप्त करण्यास समर्थ आहोत हे येशूने सिद्ध केले होते. पण येशूने राजा म्हणून राज्य करण्याची यहोवाची नियुक्‍त वेळ अद्याप आली नव्हती. शिवाय येशूचे राज्य हे स्वर्गीय असणार होते, पृथ्वीवरील नव्हे.

१३, १४. बऱ्‍याच जणांनी कशाप्रकारचा दृष्टिकोन असल्याचे दाखवले आणि त्यांचा विश्‍वास कशाप्रकारे पारखण्यात आला?

१३ तरीसुद्धा, जमाव येशूचा पाठलाग करू लागले व योहान सांगतो त्याप्रमाणे तो त्यांना “समुद्राच्या पलीकडे” सापडला. येशूने राजा बनण्यास नकार दिल्यावरही लोकांनी त्याचा पाठलाग का केला? बऱ्‍याच जणांचा शारीरिक दृष्टिकोन होता. त्यांनी मोशेच्या काळात अरण्यात यहोवाने केलेल्या शारीरिक तरतूदींचा खास उल्लेख केला. ते असे म्हणू इच्छित होते की येशूने पुढेही त्यांना खाण्यापिण्यास देत राहावे. त्यांचे हे चुकीचे हेतू ओळखून येशूने त्यांना आध्यात्मिक सत्ये शिकवण्यास सुरुवात केली जेणेकरून त्यांना आपल्या विचारसरणीत बदल करता यावा. (योहान ६:१७, २४, २५, ३०, ३१, ३५-४०) तेव्हा काहीजण त्याच्याविरुद्ध कुरकूर करू लागले. विशेषतः त्याने पुढील दृष्टान्त दिल्यावर ते त्याच्याविरुद्ध बोलू लागले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्‍त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही; जो माझा देह खातो व माझं रक्‍त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.”—योहान ६:५३, ५४.

१४ येशूचे दृष्टान्त सहसा लोकांना हे दाखवण्याची संधी देत, की त्यांना देवाबरोबर चालण्याची खरोखर इच्छा आहे किंवा नाही. हा दृष्टान्तही याला अपवाद नव्हता. लोकांमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वृत्तान्तात म्हटले आहे: “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” येशूने त्यांना समजावून सांगितले की त्यांनी त्याच्या शब्दांचा आध्यात्मिक अर्थ समजून घ्यावा. त्याने म्हटले: “आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.” तरीपण बरेचजण ऐकून घेण्यास तयार झाले नाहीत आणि वृत्तान्तात पुढे सांगितल्याप्रमाणे: “ह्‍यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत.”—योहान ६:६०, ६३, ६६.

१५. येशूच्या काही अनुयायांनी कोणती योग्य मनोवृत्ती बाळगली?

१५ तरीपण येशूच्या सगळ्याच शिष्यांची अशी प्रतिक्रिया नव्हती. अर्थात त्याच्या या एकनिष्ठ शिष्यांनाही त्याच्या बोलण्याचा अर्थ स्पष्टपणे समजला नव्हता. तरीपण त्यांना त्याच्यावर असलेला विश्‍वास टिकून राहिला. त्या एकनिष्ठ शिष्यांपैकी पेत्रही एक होता आणि त्याने येशूसोबत टिकून राहिलेल्या सर्व शिष्यांच्या भावना या शब्दांत व्यक्‍त केल्या: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” (योहान ६:६८) त्यांची वृत्ती खरोखर किती उत्तम व अनुकरणीय होती!

१६. आपली कशाप्रकारे परीक्षा होऊ शकते आणि आपण कोणती योग्य मनोवृत्ती उत्पन्‍न केली पाहिजे?

१६ आज आपलीही त्या सुरुवातीच्या शिष्यांप्रमाणे परीक्षा होऊ शकते. कदाचित आपण व्यक्‍तिशः अपेक्षा केली होती तितक्या लवकर यहोवाच्या प्रतिज्ञा पूर्ण न झाल्यामुळे आपण निराश झाले असू. किंवा आपल्या बायबल आधारित प्रकाशनांतील स्पष्टीकरणे कदाचित आपल्याला समजण्यास कठीण वाटत असतील. एखाद्या सहख्रिस्ती बांधवाची वागणूक पाहून कदाचित आपण निराश झालेलो असू. या किंवा अशा इतर कारणांमुळे देवाबरोबर चालण्याचे थांबवणे योग्य ठरेल का? मुळीच नाही! जे शिष्य येशूला सोडून गेले त्यांनी आपली मनोवृत्ती दैहिक असल्याचे दाखवले. आपण असे करण्याचे टाळले पाहिजे.

“माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही”

१७. देवाबरोबर चालत राहण्यास आपल्याला मदत कोठून मिळू शकते?

१७ प्रेषित पौलाने ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित’ आहे असे सांगितले. (२ तीमथ्य ३:१६) बायबलमधून यहोवा आपल्याला स्पष्टपणे सांगतो: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यशया ३०:२१) देवाच्या वचनाचे पालन केल्यामुळे आपल्याला ‘सभोवार नजर ठेवून जपून चालण्यास’ मदत मिळते. (इफिसकर ५:१५) बायबलचा अभ्यास करण्याद्वारे व आपण जे शिकतो त्यावर मनन करण्याद्वारे आपण ‘सत्याने चालत’ राहू शकतो. (३ योहान ३) खरोखर येशूने म्हटल्याप्रमाणे, “आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही.” आपल्या मार्गाकरता सर्वात विश्‍वासार्ह मार्गदर्शन हे आध्यात्मिक मार्गदर्शन होय आणि हे मार्गदर्शन आपल्याला यहोवाचे वचन, त्याचा आत्मा व त्याची संघटना यांच्याद्वारे मिळते.

१८. (क) काहीजण अविचारीपणाने काय करतात? (ख) आपण कशाप्रकारचा विश्‍वास उत्पन्‍न करतो?

१८ आज जे दैहिक मनोवृत्तीमुळे किंवा अपेक्षाभंग झाल्यामुळे निराश होतात ते जगात परत जाऊन त्याचा पुरेपूर उपभोग घेण्याचा मार्ग निवडतात. हा काळ किती निकडीचा आहे याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना ‘जागृत राहण्याची’ गरज भासत नाही आणि ते राज्याच्या कार्याला प्राधान्य देण्याऐवजी स्वार्थी ध्येयांचा पाठपुरावा करू लागतात. (मत्तय २४:४२) यापेक्षा मोठा अविचारीपणा असू शकत नाही. प्रेषित पौलाच्या शब्दांकडे लक्ष द्या: “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहो.” (इब्री लोकांस १०:३९) हनोख व नोहा यांच्याप्रमाणे आपणही संकटमय काळात राहात आहोत, पण त्यांच्यासारखीच आपल्यालाही देवाबरोबर चालण्याची सुसंधी आहे. असे केल्यास आपल्याला ही खात्रीलायक आशा आहे की आपण यहोवाच्या प्रतीज्ञा पूर्ण झालेल्या, दुष्टाईचा अंत झालेला व नीतिमान नवे जग स्थापन झालेले पाहू शकू. ही आशा किती अद्‌भूत आहे!

१९. खऱ्‍या उपासकांनी निवडलेल्या मार्गाचे मीखा कसे वर्णन करतो?

१९ देवप्रेरणेने संदेष्टा मीखा याने जगातील राष्ट्रांविषयी असे म्हटले, की ते “आपापल्या देवाच्या नावाने” चालतील. पण स्वतःबद्दल व इतर विश्‍वासू उपासकांबद्दल त्याने म्हटले: “परंतु आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.” (मीखा ४:५, पं.र.भा.) मीखासारखाच तुमचाही दृढ निर्धार असल्यास, परिस्थिती कितीही कठीण झाली तरीसुद्धा यहोवाला जडून राहा. (याकोब ४:८) आपला देव यहोवा याच्यासोबत आज व सर्वकाळ चालत राहावे हीच आपल्यापैकी प्रत्येक जणाची मनःपूर्वक इच्छा असो! (w०५ ९/१)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• नोहाच्या व आपल्या काळात कोणकोणत्या बाबतीत साम्य आहे?

• नोहा व त्याच्या कुटुंबाने कोणता मार्ग निवडला आणि आपण त्यांच्या विश्‍वासाचे कसे अनुकरण करू शकतो?

• येशूच्या अनुयायांपैकी काहींनी कोणती चुकीची मनोवृत्ती असल्याचे दाखवले?

• खऱ्‍या खिश्‍चनांचा कोणता दृढ निर्धार आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३० पानांवरील चित्र]

नोहाच्या काळाप्रमाणेच लोक आपल्या दैनंदिन कार्यात रममाण आहेत

[३१ पानांवरील चित्र]

राज्याचे प्रचारक या नात्याने “माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही”