व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि”

“जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि”

“जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि”

“कॅथलिक विश्‍वासात चार अंतिम गोष्टी आहेत: मृत्यू, न्यायनिवाडा, नरक, स्वर्ग.”—कॅथलिक धर्म, संपादक जॉर्ज ब्रान्टल.

मानवजातीसाठी असलेल्या या चार अंतिम गोष्टींमध्ये, पृथ्वीचा उल्लेखच नाही, याची नोंद घ्या. यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही, कारण इतर अनेक धर्मांप्रमाणे कॅथलिक चर्चही असा विश्‍वास करते, की एक न्‌ एक दिवशी, या पृथ्वीचा नाश होणार आहे. याविषयी, डिकस्योनर डे टिओलोझे काटोलिकमध्ये, “जगाचा अंत” या मथळ्याखालील माहितीत असे स्पष्टपणे म्हटलेले आहे: “कॅथलिक चर्च असा विश्‍वास करते आणि शिकवते, की देवाने निर्माण केलेले व अस्तित्वात असलेले हे सध्याचे जग कायम राहणार नाही.” अलिकडील एका कॅथलिक शिकवणींच्या कार्यक्रमाच्या वेळी देखील असे सांगण्यात आले, की “आपल्या जगाचा . . . नाश अटळ आहे.” पण जर आपल्या पृथ्वीग्रहाचा नाश होणार आहे, तर मग पृथ्वीचे नंदनवनात रुपांतर होणार असल्याच्या बायबलमधील अभिवचनांचे काय?

भवितव्यात पृथ्वीचे नंदनवन होणार आहे, असा बायबलमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. जसे की, संदेष्टा यशयाने पृथ्वी आणि तिच्या रहिवाशांचे वर्णन अशा शब्दांत केले: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.” (यशया ६५:२१, २२) ज्या यहुद्यांना देवाने या प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यांना ही खात्री होती, की त्यांच्या प्रतिज्ञात देशाचे, अर्थात संपूर्ण पृथ्वीचे एक ना एक दिवशी नंदनवनात रुपांतर होईल, ज्यामुळे सर्व मानवजातीला चिरकालिक लाभ होईल.

स्तोत्र ३७ या आशेला पुष्टी देते. ते म्हणते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:११) या वचनात, इस्राएल राष्ट्राचे प्रतिज्ञात देशात तात्पुरत्या काळासाठी पुनर्वसन करण्यात येईल, असे सांगितलेले नाही. त्याच स्तोत्रात स्पष्टपणे असे सांगण्यात आले आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) * “लीन” जनांना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळेल, असे या स्तोत्रात म्हटल्याची नोंद घ्या. एका फ्रेंच अनुवादात, या वचनावरील भाष्यात असे म्हटले आहे, की “लीन” या शब्दाचा, “अनेक अनुवादांमध्ये जो अर्थ आढळतो त्यापेक्षा कितीतरी पटीने विस्तृत अर्थ आहे. लीन म्हणजे दुर्दैवी, याव्हेच्या नावासाठी पीडा किंवा छळ भोगणारे, देवाच्या अधीन असलेले नम्र लोक, असा त्याचा अर्थ होतो.”

पृथ्वीवर की स्वर्गात?

डोंगरावरील प्रवचनात येशूने एक प्रतिज्ञा केली ज्यावरून आपल्याला वर उल्लेखण्यात आलेल्या वचनांची आठवण होते: “जे लीन ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.” (मत्तय ५:५, पं.र.भा.) या वचनानुसारही पृथ्वी ही विश्‍वासू लोकांसाठी एक प्रतिफळ असणार आहे. परंतु, येशूने आपल्या प्रेषितांना स्पष्टपणे सांगितले, की तो त्यांच्यासाठी आपल्या “पित्याच्या घरात” अर्थात स्वर्गात जागा तयार करत आहे जेणेकरून ते त्याच्याबरोबर तिथे राहतील. (योहान १४:१, २; लूक १२:३२; १ पेत्र १:३, ४) यास्तव, पृथ्वीवर मिळणाऱ्‍या आशीर्वादांच्या संबंधाने देण्यात आलेल्या अभिवचनांचा आपण कोणता अर्थ घ्यावा? ही अभिवचने आजही लागू होतात का आणि ती कोणाला लागू होतात?

विविध बायबल विद्वानांचे असे म्हणणे आहे, की येशूच्या डोंगरावरील प्रवचनात आणि स्तोत्र ३७ मध्ये ज्या ‘पृथ्वीचा’ उल्लेख करण्यात आला आहे ती लाक्षणिक पृथ्वी आहे. बिबल डे ग्लेर या आपल्या पुस्तकात केलेल्या भाष्यात एफ. विगुरू म्हणतात, की त्यांना या वचनात “स्वर्ग आणि चर्चचे प्रतिक” दिसले. एम. लाग्रान्झ या फ्रेंच बायबल संशोधकाच्या मते, या अभिवचनाचा अर्थ असा होत नाही, की “लीन जनांना, ते सध्या राहात असलेल्या व्यवस्थीकरणाचे किंवा भविष्यात येणाऱ्‍या परिपूर्ण व्यवस्थीकरणाचे वतन मिळेल. तर, त्यांना स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळेल; मग हे स्वर्गाचे राज्य कोठेही असले तरी.” आणखी एका संशोधकाच्या मते, “स्वर्गाविषयी बोलण्याकरता पृथ्वी आणि तिच्यासंबंधीच्या गोष्टींचा लाक्षणिक रूपात उपयोग करण्यात आला आहे.” काही संशोधकांचे म्हणणे आहे, की “प्रतिज्ञात देश अर्थात कनान देश लाक्षणिक आहे व तो वरील मायदेशास अर्थात देवाच्या राज्यास चित्रित करतो जे लीन जनांना वतन म्हणून खात्रीशीरपणे दिले जाईल. स्तोत्र ३७ आणि इतरत्रही याचा हाच अर्थ होतो.” पण मग आपणही लगेचच असा निष्कर्ष काढावा का, की पृथ्वीबद्दल देवाने जी अभिवचने दिली, ती खऱ्‍या पृथ्वीबद्दल नव्हती?

पृथ्वीविषयी चिरकालिक उद्देश

सुरुवातीला पृथ्वीचा संबंध थेट मानवजातीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशाशी होता. “स्वर्ग तर परमेश्‍वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे,” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले. (स्तोत्र ११५:१६) त्यामुळे, मानवजातीसाठी असलेला देवाचा मूळ उद्देश, स्वर्गाशी नव्हे तर पृथ्वीशी जोडण्यात आला. यहोवाने पहिल्या मानवी दांपत्याला संपूर्ण पृथ्वीला एदेन बागेसारखे बनवण्याची कामगिरी दिली. (उत्पत्ति १:२८) हा उद्देश तात्पुरत्या काळासाठी नव्हता. पृथ्वी कायम राहील अशी पुष्टी यहोवा आपल्या वचनात देतो: “एक पिढी जाते व दुसरी येते; पृथ्वीच कायती सदा कायम राहते.”—उपदेशक १:४; १ इतिहास १६:३०; यशया ४५:१८.

देव परात्पर असल्यामुळे त्याची अभिवचने कधीच अपूर्ण राहणार नाहीत; तो ती पूर्ण होण्याची शाश्‍वती देतो. देवाने केलेल्या प्रतिज्ञा किती अटळ आहेत, हे समजावताना बायबल नैसर्गिक जलचक्राचे उदाहरण देते. ते म्हणते: “पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून . . . परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन [देवाचे वचन] होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यशया ५५:१०, ११) देवाने मानवांना काही प्रतिज्ञा केल्या आहेत. या प्रतिज्ञा पूर्ण होण्याआधी विशिष्ट कालावधी लोटेल परंतु त्या विफल ठरणार नाहीत. ज्या कामासाठी देवाने त्या प्रतिज्ञा केल्या होत्या ती कामे पूर्ण करूनच त्या त्याच्याकडे “परत” जातील.

मानवजातीसाठी पृथ्वी निर्माण करण्याची यहोवाची “इच्छा” होती. ती इच्छा पूर्ण केल्यावर त्याला खूप आनंद झाला. सृष्टीच्या सहाव्या दिवसाच्या समाप्तीला त्याने म्हटले, की आपण केलेले सर्व “फार चांगले आहे.” (उत्पत्ति १:३१) पृथ्वीचे चिरकालिक नंदनवनात रुपांतर करणे हा देवाच्या उद्देशांतील एक उद्देश आहे जो अद्याप पूर्ण झालेला नाही. तरीपण, देवाची अभिवचने, ‘विफल होऊन परत त्याजकडे येणार नाहीत.’ मानव जेथे चिरकाल शांती व सुरक्षिततेत राहतील त्या पृथ्वीवर परिपूर्ण जीवनाविषयी देवाने केलेल्या सर्व प्रतिज्ञा नक्कीच पूर्ण होतील.—स्तोत्र १३५:६; यशया ४६:१०.

देवाचा उद्देश न चुकता पूर्ण होईल

आपले पहिले पालक, आदाम आणि हव्वा यांच्या पापामुळे, पृथ्वीचे नंदनवनात रुपांतर करण्यासंबंधी असलेला देवाचा मूळ उद्देश तात्पुरत्या काळासाठी भंग झाला. देवाची अवज्ञा केल्यानंतर त्यांना बागेतून बाहेर काढून टाकण्यात आले. अशाप्रकारे, नंदनवनमय पृथ्वीवर परिपूर्ण मानवांची वस्ती निर्माण करण्याच्या देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत सहभाग मिळण्याची संधी त्यांनी गमावली. तरीपण आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने काही व्यवस्था केली. काय व्यवस्था केली?—उत्पत्ति ३:१७-१९, २३.

एका उत्तम जागेवर घर बांधायला सुरुवात करणाऱ्‍या एका मनुष्याच्या परिस्थितीसारखी एदेन बागेतील परिस्थिती होती. हा मनुष्य पाया घालत असतो तेव्हा कोणीतरी येतो आणि त्याने घातलेला पाया तोडून टाकतो. पण हाती घेतलेले काम अर्ध्यावरच टाकून देण्याऐवजी हा मनुष्य त्याच्या घराचे बांधकाम पूर्ण होण्याकरता आवश्‍यक ती पावले उचलतो. या जादा कामासाठी त्याला जादा खर्च करावा लागत असला तरी, त्याने सुरुवातीला हाती घेतलेले काम अनुचित होते असे म्हणता येणार नाही.

तसेच, आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने आवश्‍यक ती व्यवस्था केली. आपल्या पहिल्या पालकांनी पाप केल्यानंतर लगेच त्याने त्यांच्या संततीसाठी एका आशेची घोषणा केली. हे ‘संतान,’ झालेली हानी भरून काढेल, असे त्याने भाकीत केले. या भविष्यवाणीची पूर्णता, या संततीचा प्राथमिक भाग देवाचा पुत्र येशू असल्याचे शाबीत झाले तेव्हा झाली. येशू पृथ्वीवर आला आणि मानवजातीला पुन्हा विकत घेण्यासाठी त्याने आपले जीवन अर्पण केले. (गलतीकर ३:१६; मत्तय २०:२८) त्याचे पुनरुत्थान होऊन तो स्वर्गात गेल्यानंतर तो त्या राज्याचा राजा बनणार होता. प्रामुख्याने, येशूला पृथ्वीचे वतन मिळते आणि मग त्याच्याबरोबर त्याच्या विश्‍वासू जनांनाही मिळते ज्यांना त्याच्या राज्यात सहराजे बनण्यासाठी स्वर्गात पुनरुत्थित केले जाते. (स्तोत्र २:६-९) हे सरकार कालांतराने, देवाचा मूळ उद्देश पूर्ण करण्याकरता पृथ्वीवरचा कारभार हाती घेईल आणि या पृथ्वीचे नंदनवनात रुपांतर करेल. त्यानंतर असंख्य लीन जनांना “पृथ्वीचे वतन” मिळेल अर्थात येशू ख्रिस्त आणि त्याचे सहराजे राज्य करत असलेल्या राज्याद्वारे त्यांना फायदा प्राप्त होईल.—उत्पत्ति ३:१५; दानीएल २:४४; प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३; प्रकटीकरण २०:५, ६.

“जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि”

एक स्वर्गीय आणि एक पार्थिव असे दोन पैलू असलेले तारण, प्रेषित योहानाने पाहिलेल्या दृष्टांतात उल्लेखण्यात आले आहेत. त्याने स्वर्गीय सिंहासनावर विराजमान झालेले राजे पाहिले ज्यांना ख्रिस्ताच्या विश्‍वासू शिष्यांमधून निवडण्यात आले होते. ख्रिस्ताच्या या सहराजांविषयी बायबल म्हणते, की ते “पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:९, १०) देवाचा उद्देश साध्य करण्यात दुहेरी पैलू आहे—येशू ख्रिस्त आणि त्याचे सहराजे यांनी मिळून बनलेल्या स्वर्गीय राज्याच्या निदर्शनाखालील पुनर्स्थापित पृथ्वी. या सर्व ईश्‍वरी व्यवस्थांमुळे, देवाच्या मूळ उद्देशानुसार पृथ्वीचे नंदनवनात पुन्हा रुपांतर होणे शक्य होते.

आपल्या आदर्श प्रार्थनेत येशूने आपल्या शिष्यांना, “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” अशी प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९, १०) पृथ्वीचा नाश झाला तर किंवा ती स्वर्गाचे केवळ एक प्रतिक असेल तर या शब्दांना काही अर्थ राहील का? तसेच, सर्वच धार्मिक जर स्वर्गात गेले तर मत्तय ६:९, १० मधील शब्दांना काही अर्थ राहील का? शास्त्रवचनांत—सृष्टीच्या अहवालापासून थेट प्रकटीकरण पुस्तकातील दृष्टांतांपर्यंत—पृथ्वीबद्दल देवाची काय इच्छा आहे हे स्पष्ट आहे. पृथ्वीला नंदनवन बनवण्याचा देवाचा उद्देश आहे. तो ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन देतो. पृथ्वीवरील विश्‍वासू जन त्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतात.

पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना सार्वकालिक जीवन देण्याचा निर्माणकर्त्याचा मूळ हेतू होता. देव ‘बदललेला नाही.’ (मलाखी ३:६; योहान १७:३; याकोब १:१७) शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून या नियतकालिकाने अर्थात टेहळणी बुरूजने ईश्‍वरी उद्देशाच्या पूर्णतेतील दोन पैलूंचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आपल्याला, शास्त्रवचनांत पृथ्वीच्या पुनर्स्थापनेविषयी असलेल्या प्रतिज्ञा समजण्यास मदत झाली. याबाबतीत आणखी माहिती मिळवण्याचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत. तुम्ही एकतर यहोवाच्या साक्षीदारांबरोबर याबद्दल चर्चा करू शकता किंवा या मासिकाच्या प्रकाशकांशी संपर्क साधू शकता. (w०६ ८/१५)

[तळटीप]

^ परि. 5 पुष्कळ बायबल अनुवाद, ईरेट्‌स या इब्री शब्दाचा अनुवाद “पृथ्वी” असे करण्याऐवजी, “देश” करत असले तरी, स्तोत्र ३७:११, २९ मध्ये वापरण्यात आलेला ईरेट्‌स या शब्दाचा अर्थ केवळ, इस्राएल राष्ट्राला देण्यात आलेला देश असा होत नाही. विल्यम विल्सन यांच्या ओल्ड टेस्टमेंट वर्ड स्टडीज यांत ईरेट्‌सची व्याख्या अशाप्रकारे करण्यात आली आहे: “ईरेट्‌सचा व्यापक अर्थ, निवासयोग्य आणि अनिवासयोग्य भाग असलेली संपूर्ण पृथ्वी; त्याचा मर्यादित अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही भाग, एखादा देश अथवा राष्ट्र.” तेव्हा, इब्री शब्दाचा प्राथमिक अर्थ आपला ग्रह किंवा विश्‍व अर्थात पृथ्वी असा होतो.—पाहा, टेहळणी बुरूज मार्च १, १९८७, पृष्ठ ३१.

[४ पानांवरील चित्र]

भविष्यात पृथ्वीचे पुन्हा नंदनवन होईल, असे बायबल स्पष्टपणे सांगते

[७ पानांवरील चित्र]

पृथ्वीचा जर नाश होणार आहे तर येशूच्या आदर्श प्रार्थनेला काही अर्थ राहील का?