व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व दुःखांचा अंत लवकरच का होणार आहे?

सर्व दुःखांचा अंत लवकरच का होणार आहे?

सर्व दुःखांचा अंत लवकरच का होणार आहे?

“तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे.”—अनुवाद ३२:४.

१, २. (क) सदासर्वकाळ जगण्याची आशा तुम्ही का जोपासता? (ख) भवितव्याविषयी अद्‌भुत वचन देणाऱ्‍या देवावर पुष्कळ लोक विश्‍वास का ठेवत नाहीत?

तुम्ही नंदनवनात आहात, अशी कल्पना करायला तुम्हाला आवडते का? तुम्ही, या अद्‌भुत ग्रहावर नवनवीन शोध लावत आहात, या ग्रहावरील भिन्‍नभिन्‍न अनंत जिवंत प्राण्यांविषयी शिकत आहात, अशी कदाचित तुम्ही कल्पना कराल. किंवा, इतरांबरोबर पृथ्वीची निगा राखण्यात व या पृथ्वीचे एका विश्‍वव्यापी बागेत रुपांतर करण्याच्या कामात तुम्हाला मिळणाऱ्‍या समाधानाचा तुम्ही विचार कराल. किंवा, आजच्या धावपळीच्या जीवनामुळे तुम्हाला कला, वास्तुशिल्प, संगीत या क्षेत्रात तुमची कौशल्ये विकसित करण्यास अथवा तुमचे आवडते छंद जोपासण्यास वेळ मिळत नसल्यामुळे नंदनवनात तुम्ही ते पूर्ण करत असल्याची कल्पना कराल. काहीही असो, बायबल ज्याला “खरे जीवन” म्हणते अर्थात यहोवाने आपल्यासाठी जे अनंतकाळचे जीवन उद्देशिले होते त्या जीवनाची आशा तुम्ही बाळगता.—१ तीमथ्य ६:१९.

बायबलमधील ही आशा इतरांना सांगितल्याने किती आनंद मिळतो शिवाय तो एक अमूल्य विशेषाधिकार देखील आहे, नाही का? परंतु अनके जण ही आशा झिडकारतात. त्यांना वाटते की ही आशा केवळ एक भ्रम आहे, ती भोळ्याभाबड्या लोकांचे कधीही खरे न होणारे स्वप्न आहे. नंदनवनात अनंतकालिक जीवनाची आशा देणाऱ्‍या देवावर विश्‍वास ठेवण्यासही त्यांना कठीण वाटते. का बरे? काहींना, दुष्टाईची समस्या सतावत असते. त्यांच्या मनात हा प्रश्‍न असतो, की जर देव आहे आणि जर तो सर्वशक्‍तिमान व प्रेमळ आहे तर या जगात अजूनही दुष्टपणा व दुःख कसे? ते असा तर्क करतात, की कोणताही देव दुष्टाई खपवून घेणार नाही; आणि जर देव आहे तर तो एकतर सर्वशक्‍तिमान नसेल किंवा त्याला आपली कसलीही काळजी नाही. काही लोकांना हा तर्क पटतो. सैतानाने खरोखरच हे सिद्ध करून दाखवले आहे, की आपण मानवांची मने अंधळी करू शकतो.—२ करिंथकर ४:४.

३. कोणत्या कठीण प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यास आपण लोकांना मदत करू शकतो व असे करण्यासाठी आपण एका अनोख्या स्थितीत का आहोत?

यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण एका अनोख्या स्थितीत आहोत. आपल्याला, सैतानाकडून व त्याच्या जगाकडून फसवणूक झालेल्या लोकांना मदत करायची आहे. (१ करिंथकर १:२०; ३:१९) पुष्कळ लोक बायबलमधील अभिवचनांवर विश्‍वास का ठेवत नाहीत हे आपण समजतो. ते मुळात यहोवालाच ओळखत नाहीत. त्यांना कदाचित त्याचे नाव, त्याच्या नावाचा अर्थ, त्याच्या गुणांविषयी थोडीबहुत अथवा काहीच माहीत नसेल किंवा तो दिलेली वचने पाळतो या त्याच्या नावलौकिकाविषयी काहीही माहीत नसेल. आपल्याला हे ज्ञान मिळाले आहे म्हणून आपण किती धन्य आहोत! ‘ज्यांची बुद्धी अंधकारमय’ आहे अशा लोकांना आपण, “देवाने दुष्टाईला व दुःखाला अजूनपर्यंत का काढून टाकले नाही?” या लोक विचारत असलेल्या सर्वात कठीण प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यास मदत कशी करू शकतो याचा आपण वेळोवेळी विचार करणे उचित आहे. (इफिसकर ४:१८) सर्वात आधी आपण, या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर कसे देता येईल त्याची चर्चा करू या. मग दुष्टाईच्या समस्या यहोवाने ज्याप्रकारे हाताळली त्यावरून त्याचे गुण कसे दिसून येतात त्याची चर्चा करूया.

प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा उत्तम मार्ग

४, ५. देवाने दुःखाला अजूनपर्यंत का काढून टाकले नाही, असा प्रश्‍न जेव्हा घरमालक पहिल्यांदा विचारतो तेव्हा आपण काय केले पाहिजे? स्पष्ट करा.

देवाने दुःखाला अजूनपर्यंत का काढून टाकले नाही? असा जेव्हा लोक आपल्याला प्रश्‍न विचारतात तेव्हा आपण त्याचे उत्तर कसे देतो? आपण कदाचित त्यांना लगेचच सविस्तर उत्तर देण्यास, अगदी एदेन बागेत काय झाले त्यापासून सुरुवात करू. काही बाबतीत हे उचित ठरेल. पण एक सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. आधी आपल्याला पाया घालावा लागेल. (नीतिसूत्रे २५:११; कलस्सैकर ४:६) वरील प्रश्‍नांची उत्तरे देण्याआधी, आपण तीन मुद्द्‌यांचा विचार करूया जे आपल्याला एखाद्या व्यक्‍तीला मदत करण्यास उपयोगी पडतील.

पहिले, जगात चाललेल्या दुष्टाईमुळे घरमालक अस्वस्थ असल्याचे तुम्हाला दिसत असेल तर कदाचित त्याच्यावर किंवा त्याच्या प्रिय जनांवर व्यक्‍तिशः दुष्टाईचा परिणाम झाल्याची शक्यता असू शकेल. अशावेळी खरी सहानुभूती दाखवून सुरुवात करणे सुज्ञपणाचे ठरेल. प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “शोक करणाऱ्‍याबरोबर शोक करा.” (रोमकर १२:१५) सहानुभूती दाखवल्याने किंवा “समसुखदुःखी” झाल्याने घरमालक प्रभावीत होईल. (१ पेत्र ३:८) आपल्याला घरमालकाची काळजी वाटते, हे जर त्याला जाणवले तर तो आपल्या बोलण्याकडे लक्ष देण्याची शक्यता आहे.

६, ७. खोल बायबल विषयावर जेव्हा एक व्यक्‍ती तिला अस्वस्थ करणारा प्रश्‍न विचारते तेव्हा आपण तिची प्रशंसा करणे उचित का ठरू शकते?

दुसरे, हा प्रश्‍न विचारल्याबद्दल प्रामाणिक घरमालकाची प्रशंसा करा. काहींना असे वाटत असते, की आपल्या मनात असे प्रश्‍न येतात म्हणजे आपण विश्‍वासहीन आहोत किंवा आपल्या मनात देवाबद्दल आदर नाही. कदाचित त्यांना कोणा धार्मिक शिक्षकाने असे सांगितलेले असावे. परंतु अशाप्रकारचे प्रश्‍न विचारल्याने त्या व्यक्‍तीत विश्‍वासाची कमी आहे, असे नाही. बायबल काळातील विश्‍वासू लोकांनीसुद्धा असेच प्रश्‍न विचारले. जसे की, स्तोत्रकर्ता दावीद याने असे विचारले: “हे परमेश्‍वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टीआड का होतोस?” (स्तोत्र १०:१) त्याचप्रकारे, संदेष्टा हबक्कूकने देखील असे विचारले होते: “हे परमेश्‍वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावितोस? विपत्ति मला का दाखवितोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.”—हबक्कूक १:२, ३.

या विश्‍वासू लोकांच्या मनात देवाबद्दल गाढ आदर होता. पण असे अस्वस्थ करणारे प्रश्‍न विचारले म्हणून त्यांना फैलावर घेण्यात आले का? उलट, यहोवाला त्यांचे हे प्रामाणिक प्रश्‍न आपल्या वचनात लिहून घेणे उचित वाटले. आज, फोफावलेली दुष्टाई पाहून चिंताक्रांत झालेली व्यक्‍ती वास्तविकतेत आध्यात्मिकरीत्या भुकेली असेल. तिला या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे हवी असतील जी केवळ बायबलमध्ये देण्यात आली आहेत. जे आध्यात्मिकरीत्या उपाशी आहेत किंवा ज्यांना “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव” आहे अशा लोकांची येशूने प्रशंसा केली हे आठवा. (मत्तय ५:३, NW) अशा लोकांना येशूने वचन दिलेला आनंद मिळण्यास मदत करणे किती सन्मानाची गोष्ट आहे!

८. कोणत्या गोंधळवून टाकणाऱ्‍या शिकवणुकींमुळे लोक, जगात चाललेल्या दुष्टाईसाठी देव जबाबदार आहे असा विश्‍वास करतात आणि आपण अशा लोकांना कशाप्रकारे मदत करू शकतो?

तिसरे, आज जगात फोफावलेल्या दुष्टाईसाठी देव जबाबदार नाही हे समजण्यास आपल्याला त्या व्यक्‍तीला मदत करावी लागेल. आपण राहत असलेल्या या जगावर देव राज्य करतो, आपल्याबाबतीत जे काही होते ते सर्व देवाने केव्हाच विधीलिखीत केले आहे आणि मानवजातीला पीडित करण्यामागे रहस्यमय कारणे आहेत, अशी पुष्कळ लोकांना शिकवण दिली जाते. या सर्व शिकवणुकी खोट्या आहेत. या शिकवणुकी देवाचा अपमान करतात आणि असे भासवतात जणू काय तोच जगात चाललेल्या दुष्टाईसाठी व दुःखासाठी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्या समजूतीत सुधार करण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाचा उपयोग करावा लागेल. (२ तीमथ्य ३:१६) यहोवा नव्हे तर दियाबल सैतान या भ्रष्ट व्यवस्थीकरणाचा शासक आहे. (१ योहान ५:१९) यहोवाने आपल्या बुद्धिमान प्राण्यांचे जीवन आधीच विधीलिखित केलेले नाही. तर त्याने प्रत्येकाला चांगले आणि वाईट, बरोबर आणि चूक यांत निवड करण्याचे स्वातंत्र्य व संधी दिली आहे. (अनुवाद ३०:१९) यहोवा केव्हाही दुष्टाईचा स्रोत नाही. त्याला दुष्टाईचा वीट आहे आणि ज्यांना अन्याय सहन करावा लागतो अशांची त्याला काळजी आहे.—ईयोब ३४:१०; नीतिसूत्रे ६:१६-१९; १ पेत्र ५:७.

९. यहोवा देवाने दुःखाला अजूनपर्यंत का काढून टाकले नाही याचे कारण समजण्यास लोकांना मदत करण्याकरता ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासवर्गाने’ कोणती प्रकाशने तयार केली आहेत?

हा असा पाया घातल्यावर तुम्हाला दिसून येईल, की घरमालक आता, देवाने दुःखाला अजूनपर्यंत का काढून टाकले नाही या प्रश्‍नाचे कारण ऐकण्यास तयार आहे. तुमच्या मदतीकरता ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासवर्गाने’ अनेक उपयुक्‍त प्रकाशने तयार केली आहेत. (मत्तय २४:४५-४७) उदाहरणार्थ, सन २००५/०६ च्या “देवाच्या आज्ञेत राहा” या प्रांतीय अधिवेशनात सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! ही पत्रिका प्रकाशित करण्यात आली होती. या पत्रिकेतील मजकूर तुम्ही वाचून काढू शकता. तसेच बायबल नेमके काय शिकवते? या आता १५७ भाषांत उपलब्ध असलेल्या पुस्तकातील एक संपूर्ण अध्याय या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाची चर्चा करतो. तेव्हा अशा प्रकाशनांचा पुरेपूर उपयोग करून घ्या. या प्रकाशनांत, एदेन बागेत उभ्या झालेल्या विश्‍वव्यापी सार्वभौमत्त्वाच्या वादविषयाच्या आणि यहोवाने हा वादविषय असा का हाताळला त्याच्या शास्त्रवचनीय कारणांचा खुलासा करण्यात आला आहे. या विषयाला हात घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ती ही, की तुम्ही घरमालकासमोर सर्वात महत्त्वपूर्ण ज्ञानभंडार उघडत आहात. यहोवा आणि त्याच्या अद्‌भुत गुणांचे हे ज्ञानभंडार आहे.

यहोवाच्या गुणांवर लक्ष केंद्रित करा

१०. देवाने दुःखाला अजूनपर्यंत का राहू दिले आहे याचे कारण समजायला पुष्कळ लोकांना जड का जाते व कोणती माहिती त्यांना साहाय्यक ठरू शकेल?

१० यहोवाने मानवांना सैतानाच्या प्रभावाखाली स्वतःवर राज्य करण्याची अनुमती का दिली आहे हे समजण्यास लोकांना मदत करताना यहोवाच्या अद्‌भुत गुणांकडे त्यांचे लक्ष वेधा. पुष्कळ लोकांना माहीत आहे, की देव शक्‍तिशाली आहे. त्याला सर्वसमर्थ देव असे संबोधले जात असल्याचे ते ऐकत आले आहेत. पण, मग तो अन्याय व दुःख लगेच काढून टाकण्यास आपल्या अमर्याद शक्‍तीचा उपयोग का करत नाही हे समजायला त्यांना जड जाते. त्यांना कदाचित यहोवाच्या इतर गुणांची जसे की त्याचे पावित्र्य, न्याय, बुद्धी व प्रेम या गुणांची समज नसावी. यहोवा, अतिशय परिपूर्ण व संतुलित मार्गाने हे गुण दाखवतो. म्हणूनच बायबल म्हणते: “त्याची कृति परिपूर्ण आहे.” (अनुवाद ३२:४) तेव्हा, या वादविषयावर सहसा विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना तुम्ही कशाप्रकारे या गुणांवर जोर देऊ शकता? काही उदाहरणांचा विचार करा.

११, १२. (क) आदाम आणि हव्वेने पाप केले तेव्हा त्यांना क्षमा करण्याचा प्रश्‍न का नव्हता? (ख) यहोवा सदासर्वकाळ पाप का खपवून घेणार नाही?

११ यहोवा आदाम आणि हव्वेला क्षमा करून वाद तिथल्या तिथेच मिटवू शकला नसता का? आदाम आणि हव्वेच्या बाबतीत क्षमा करण्याचा प्रश्‍नच नव्हता. परिपूर्ण मानव यानात्याने या दोघांनी जाणून-बुजून यहोवाचे सार्वभौमत्व नाकारले आणि त्याऐवजी सैतान त्यांना जे सांगत होता ते ऐकण्याची त्यांनी निवड केली. त्यामुळे या बंडखोरांनी आपल्या चुकीबद्दल जराही पश्‍चात्ताप दाखवला नाही. परंतु, लोक जेव्हा असे विचारतात, की यहोवाने यांना क्षमा का केली नाही तेव्हा ते खरे तर असे विचारत असतात, की यहोवा आपल्या अपेक्षांचा दर्जा थोडासा कमी करून पाप आणि बंड खपवून का घेऊ शकला नाही? या प्रश्‍नाच्या उत्तराचा, यहोवाचा स्वभाव असलेल्या गुणाशी अर्थात त्याच्या पावित्र्याशी अगदी जवळून संबंध आहे.—निर्गम २८:३६; ३९:३०.

१२ बायबल यहोवाच्या पावित्र्यावर अनेकदा जोर देते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे या भ्रष्ट जगातील खूप कमी लोकांना हा गुण समजतो. यहोवा स्वच्छ, शुद्ध आणि सर्व पापापासून वेगळा आहे. (यशया ६:३; ५९:२) पापाच्या बाबतीत पाहता, त्याने पापाच्या प्रायश्‍चित्तासाठी किंवा पाप नाहीसे करण्यासाठी एका मार्गाची व्यवस्था केली आहे; पण तो सदासर्वकाळ ते खपवून घेणार नाही. जर यहोवा सदासर्वकाळ पाप खपवून घेण्यास तयार झाला असता तर आपल्याला भवितव्यासाठी कसलीच आशा उरली नसती. (नीतिसूत्रे १४:१२) यहोवा आपल्या नियुक्‍त समयी सर्व सृष्टीला पुन्हा एकदा पवित्र अवस्थेत आणेल. हे अगदी शंभर टक्के खरे आहे, कारण तीच तर पवित्र यहोवाची इच्छा आहे.

१३, १४. एदेन बागेतील बंडखोरांचा नाश न करणे यहोवाने का पसंत केले?

१३ यहोवाने एदेन बागेतील बंडखोरांचा नाश करून पुन्हा नव्याने सुरुवात का केली नाही? असे करण्याची त्याच्याजवळ निश्‍चित्तच शक्‍ती होती; लवकरच तो सर्व दुष्टांचा नाश करण्याकरता या शक्‍तीचा उपयोग करणार आहे. पण काहींच्या मनात असा प्रश्‍न येईल: ‘विश्‍वात फक्‍त तीनच पापी होते तेव्हाच त्याने असे का केले नाही? आज जगात पसरलेले पाप आणि आपण बघत असलेले दुःख हे सर्व तेव्हाच टाळता आले नसते का?’ यहोवाने हा मार्ग अवलंबविण्याचे का निवडले नाही? अनुवाद ३२:४ म्हणते: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” यहोवाला न्यायाची सर्वश्रेष्ठ जाणीव आहे. खरे पाहता, यहोवाला “न्याय प्रिय आहे.” (स्तोत्र ३७:२८) यहोवाला न्याय प्रिय असल्यामुळेच त्याने एदेन बागेतील बंडखोरांचा नाश केला नाही. असे का?

१४ सैतानाने केलेल्या बंडाळीमुळे यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या अधिकाराविषयी वाद उभा राहिला. यहोवाच्या न्यायाच्या जाणीवेमुळे, सैतानाने उभ्या केलेल्या वादाला न्यायी उत्तर देणे आवश्‍यक ठरले. यहोवाविरुद्ध बंड करणारे नाशास पात्र असले तरीसुद्धा त्यांचा तिथल्या तिथे नाश केल्याने न्यायी उत्तर पुरवता आले नसते. तो किती शक्‍तिशाली आहे हे सिद्ध झाले असते खरे परंतु वाद त्याच्या शक्‍तिविषयी नव्हता. शिवाय, यहोवाने आदाम आणि हव्वेला आपला उद्देश बोलून दाखवला होता. त्याने त्यांना मुले प्रसवून पृथ्वी व्यापून टाकण्यास व पृथ्वीवरील प्राण्यांवर सत्ता चालवण्यास सांगितले होते. (उत्पत्ति १:२८) यहोवाने आदाम आणि हव्वेचा नाश केला असता तर मानवांविषयी त्याने बोलून दाखवलेला उद्देश निरर्थक ठरला असता. पण यहोवाच्या न्यायामुळे हा परिणाम शक्य नव्हता कारण त्याचा उद्देश नेहमीच पूर्ण होतो.—यशया ५५:१०, ११.

१५, १६. एदेन बागेत उभ्या राहिलेल्या वादावर जेव्हा लोक स्वतःचा “उपाय” सांगतात तेव्हा आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो?

१५ विश्‍वातील कोणीही यहोवापेक्षा अधिक चातुर्याने बंडाळीची समस्या हाताळू शकला असता का? एदेन बागेत झालेल्या बंडाळीवर काही लोक स्वतःचा “उपाय” सुचवतील. तेव्हा एका अर्थाने ते असे सुचवत नसतात का, की त्यांच्याजवळ वाद हाताळण्याचे अधिक उत्तम उपाय आहेत? असे ते कदाचित दुष्ट हेतूने करणार नाहीत, पण त्यांना यहोवा आणि त्याच्या भय-प्रेरक बुद्धीची समज नसते. रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने देवाच्या बुद्धीविषयीची तसेच ‘पवित्र रहस्याची’ अर्थात विश्‍वासू मानवजातीची सुटका करण्याकरता व यहोवाच्या नावाचे पवित्रिकरण करण्याकरता मशिही राज्याचा उपयोग करण्याचा यहोवाचा जो उद्देश होता त्याविषयी फक्‍त वरवर माहिती दिली नाही तर या विषयाच्या अगदी खोलात शिरून माहिती दिली. ज्याने हा उद्देश रचला होता त्या देवाच्या बुद्धीविषयी पौलाला कसे वाटले? प्रेषित पौल आपल्या पत्राची समाप्ती अशा शब्दांत करतो: “जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.”—रोमकर ११:२५; १६:२५-२७.

१६ पौलाला हे समजले होते, की यहोवा “एकच ज्ञानी देव” आहे; विश्‍वात केवळ तोच बुद्धीचे शिखर आहे. देवाच्या सार्वभौमत्वाच्या योग्यतेला सैतानाने केलेल्या आव्हानाला कसे उत्तर द्यायचे हे सोडाच पण, अपरिपूर्ण मानवांपैकी कोणाच्या मनात, कोणतीही समस्या सोडवण्याचा सर्वात उत्तम उपाय येईल? यास्तव, आपण लोकांना जो “मनाने सुज्ञ” आहे त्या देवाबद्दल आपल्याप्रमाणे भीती बाळगण्यास मदत केली पाहिजे. (ईयोब ९:४) आपण यहोवाची बुद्धी जितक्या चांगल्याप्रकारे समजू तितके अधिक आपण हा भरवसा बाळगू की गोष्टी हाताळण्याची त्याची पद्धत ही सर्वोत्तम पद्धत आहे.—नीतिसूत्रे ३:५, ६.

यहोवाच्या प्रमुख गुणाची भूमिका मान्य करणे

१७. देवाने दुःखाला अजूनपर्यंत का राहू दिले आहे या विचाराने जे अस्वस्थ होतात त्यांना, यहोवाच्या प्रेमाची अधिक समज प्राप्त केल्यानंतर कशी मदत होऊ शकेल?

१७ “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) या प्रभावशाली शब्दांत बायबल यहोवाच्या प्रमुख गुणाची ओळख करून देते. त्याच्या इतर गुणांपैकी हा गुण सर्वात विलोभनीय आणि फोफावलेल्या दुष्टाईमुळे अस्वस्थ झालेल्यांना सांत्वन देणारा गुण आहे. पापामुळे यहोवाच्या सृष्टीवर बराच विनाशकारक परिणाम झाला आहे; तर या प्रत्येक परिणामाला यहोवाने ज्याप्रकारे हाताळले आहे त्या प्रत्येक मार्गात त्याने प्रेम दाखवले आहे. प्रेमाने प्रवृत्त होऊन यहोवाने आदाम आणि हव्वेच्या पापी संततीला आशा दिली. त्याच्याशी बोलण्याकरता व स्वीकृत नातेसंबंध जोडण्याकरता त्याने एका मार्गाची व्यवस्था केली. पापांची पूर्ण क्षमा मिळण्याचा आणि परिपूर्ण व सार्वकालिक जीवन पुन्हा प्राप्त करण्याचा मार्ग खुला करण्याकरता प्रीतीने देवाला खंडणी देण्यास प्रवृत्त केले. (योहान ३:१६) आणि प्रीतीने त्याला मानवजातीशी सहनशीलतेने वागण्यास तसेच होता होईल तितक्या लोकांना, सैतानाला नाकारून यहोवाला आपला सार्वभौम म्हणून निवडण्याची संधी देण्यास प्रवृत्त केले आहे.—२ पेत्र ३:९.

१८. कोणत्या माहितीमुळे आपण धन्य आहोत आणि पुढील लेखात आपण कोणत्या विषयाची चर्चा करणार आहोत?

१८ एका विनाशकारक दहशतवादी हल्ल्याचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर एका पाळकाने असे म्हटले: “देवाने दुष्टाई व दुःख अजूनपर्यंत का काढले नाही, याचे कारण आपल्याला माहीत नाही.” पण आपण किती धन्य आहोत, नाही का? आपल्याजवळ या विषयाची अगदी सखोल माहिती आहे. (अनुवाद २९:२९) शिवाय, यहोवा सुज्ञ, न्यायी व प्रेमळ असल्यामुळे तो लवकरच सर्व दुःखाचा अंत करील हे आपल्याला माहीत आहे. नव्हे तो आपल्याला तसे वचनही देतो. (प्रकटीकरण २१:३, ४) पण अनेक शतकांपासून जे मरण पावलेले आहेत त्यांना कसलीही आशा नाही का? एदेनातील वादविषय यहोवाने ज्याप्रकारे हाताळला त्यामुळे या मृत लोकांसाठी काही आशा उरली नाही का? नाही. प्रीतीने त्याला याही लोकांसाठी एक तरतूद करण्यास प्रवृत्त केले आहे. तो त्यांचे पुनरुत्थान करणार आहे. पुढील लेख या विषयाची अधिक चर्चा करेल. (w०७ ५/१५)

तुमचे काय उत्तर आहे?

• देवाने दुःख अजूनपर्यंत का काढून टाकले नाही असे जेव्हा एक व्यक्‍ती विचारते तेव्हा आपण काय म्हणू शकतो?

• एदेनातील बंडखोरांना यहोवाने ज्याप्रकारे हाताळले त्यावरून त्याचा पवित्रपणा व त्याची न्यायबुद्धी कशी दिसून आली?

• आपण लोकांना यहोवाच्या प्रीतीबद्दल अधिक समज प्राप्त करण्यास मदत का केली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

जगात चालेल्या दुःखामुळे अस्वस्थ होणाऱ्‍या लोकांना मदत करण्याचे मार्ग शोधा

[१५ पानांवरील चित्रे]

विश्‍वासू दावीद आणि हबक्कूकने देवाला प्रामाणिक प्रश्‍ने विचारली