व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’

‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’

‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’

‘वाइटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंका.’—रोमकर १२:२१.

१. आपण वाइटाला जिंकू शकतो असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

खऱ्‍या उपासनेला कडा विरोध करणाऱ्‍यांविरुद्ध टिकाव धरणे शक्य आहे का? आपल्याला या दुष्ट जगात परत ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या शक्‍तींवर विजय मिळवणे शक्य आहे का? होय, या दोन्ही गोष्टी शक्य आहेत! आपण असे कोणत्या आधारावर म्हणू शकतो? प्रेषित पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रात जे म्हटले त्याच्या आधारावर. त्याने असे लिहिले: ‘वाइटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंका.’ (रोमकर १२:२१) आपण जर यहोवावर भरवसा ठेवला आणि जगाला आपल्यावर वर्चस्व न मिळवू देण्याचा पक्का निर्धार केला तर या जगातील वाइटाला आपल्यावर कधीही विजय मिळवता येणार नाही. शिवाय, “वाइटाला जिंका” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक वाक्यांशावरून असे दिसून येते की जर आपण वाइटाविरुद्ध आपली आध्यात्मिक लढाई सातत्याने लढत राहिलो तर आपण त्यावर विजय मिळवू शकतो. जे आपले लक्ष विचलित होऊ देतात व लढण्याचे थांबवतात फक्‍त अशांवरच हे दुष्ट जग व त्याचा दुष्ट शासक दियाबल सैतान विजय मिळवू शकेल.—१ योहान ५:१९.

२. आपण नहेम्याच्या जीवनातील काही घटना का विचारात घेणार आहोत?

पौलाच्या काळाच्या जवळजवळ ५०० वर्षांआधी जेरुसलेममध्ये राहणाऱ्‍या देवाच्या एका सेवकाने, वाइटाला जिंकण्याविषयी पौलाचे शब्द अगदी खरे असल्याचे सिद्ध केले. देवाचा हा सेवक, नहेम्या होता. त्याने अधार्मिक लोकांच्या विरोधाला तर यशस्वीरित्या तोंड दिलेच पण त्यासोबतच त्याने बऱ्‍याने वाइटाला जिंकले. त्याला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले? तो कशामुळे यशस्वी होऊ शकला? आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता आपण नहेम्याच्या जीवनातील काही घटना विचारात घेऊ या. *

३. नहेम्या कशाप्रकारच्या वातावरणात राहात होता आणि त्याने कोणते मोठे कार्य साध्य केले?

नहेम्या अर्तहशश्‍त राजाच्या दरबारात सेवा करत होता. खऱ्‍या देवावर विश्‍वास नसलेल्या लोकांमध्ये राहात असूनही नहेम्या त्या “युगाबरोबर समरूप” झाला नाही. (रोमकर १२:२) यहुदामध्ये गरज उद्‌भवली तेव्हा नहेम्या आपल्या आरामदायी जीवनाचा त्याग करून, जेरूसलेमपर्यंतचा जिकिरीचा प्रवास करून गेला व तेथे त्याने शहराच्या वेशींची पुनर्बांधणी करण्याचे मोठे कार्य हाती घेतले. (रोमकर १२:१) स्वतः जेरुसलेमचा सुभेदार असूनही नहेम्या दररोज आपल्या इस्राएली बांधवांसोबत “पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत” राबला. परिणामस्वरूप, केवळ दोन महिन्यांच्या आत हे मोठे कार्य पूर्ण झाले! (नहेम्या ४:२१; ६:१५) हा एक अद्‌भुत पराक्रमच म्हणावा लागेल, कारण बांधकाम सुरू असताना इस्राएलीयांना निरनिराळ्या प्रकारचा विरोध सहन करावा लागला. नहेम्याला विरोध करणारे कोण होते आणि त्यांचा काय इरादा होता?

४. नहेम्याचा विरोध करणाऱ्‍याचा काय इरादा होता?

विरोध करणाऱ्‍यांपैकी सर्वात प्रमुख सनबल्लट, तोबीया व गेशेम हे होते. हे सर्व यहुदाच्या आसपास राहणारे प्रतिष्ठित पुरुष होते. ते देवाच्या लोकांचे शत्रू असल्यामुळे, त्यांनी ‘[नहेम्या] इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला हे ऐकले, तेव्हा त्यांस फार वाईट वाटले.’ (नहेम्या २:१०,१९) नहेम्याच्या शत्रूंनी त्याने हाती घेतलेले बांधकाम ठप्प पाडण्याचा जणू ध्यासच घेतला होता आणि यासाठी त्यांनी निरनिराळ्या कुयुक्‍त्‌या रचण्यासही कमी केले नाही. नहेम्याने स्वतःस ‘वाइटाने जिंकले जाऊ दिले’ का?

“त्यास मोठा क्रोध आला”

५, ६. (क) नहेम्याच्या शत्रूंनी बांधकाम चाललेले पाहून काय केले? (ख) नहेम्या विरोध करणाऱ्‍यांना का घाबरला नाही?

नहेम्याने आपल्या लोकांना निर्भयतेने आवाहन केले: “चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू.” याला लोकांनी उत्तर दिले: “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” नहेम्या आपल्याला सांगतो: “त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधिली,” पण विरोध करणाऱ्‍यांनी “आमची निर्भर्त्सना केली; आम्हास तुच्छ लेखून ते म्हणाले: ‘तुम्ही के काय मांडिले आहे? राजाविरुद्ध बंड करिता काय?’” त्यांचे हे टोमणे व खोटे आरोप ऐकून नहेम्या घाबरला नाही. त्याने विरोध करणाऱ्‍यांना सांगितले: “स्वर्गींचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार.” (नहेम्या २:१७-२०) हे “सत्कार्य” पूर्णत्वास न्यायचा नहेम्याने दृढनिश्‍चय केला होता.

विरोध करणाऱ्‍यांपैकी, सनबल्लटास “मोठा क्रोध आला” आणि तो इस्राएलीयांचा आणखीनच उपहास करू लागला: “हे दुर्बळ यहूदी काय करणार? . . . आंच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगारांतून निवडून घेऊन ते पुनः कामास लागण्याजोगे करितील काय?” तोबीयाही या उपहासात सामील होऊन म्हणाला: “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.” (नहेम्या ४:१-३) नहेम्याची यावर काय प्रतिक्रिया होती?

७. नहेम्याने विरोध करणाऱ्‍यांच्या आरोपांना कशी प्रतिक्रिया दाखवली?

नहेम्याने या सर्व उपहासाकडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्याने देवाच्या आज्ञेचे पालन केले आणि सूड उगवण्याचा प्रयत्न केला नाही. (लेवीय १९:१८) त्याऐवजी त्याने ही गोष्ट यहोवाच्या हाती सोपवली आणि अशी प्रार्थना केली: “हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भर्त्सना करीत आहेत ती त्यांच्या शिरी उलट आण.” (नहेम्या ४:४) “सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे” या यहोवाच्या आश्‍वासनावर त्याने भरवसा ठेवला. (अनुवाद ३२:३५) आणि नहेम्या व त्याचे लोक ‘कोट बांधीत गेले.’ त्यांनी आपल्या कार्यातून आपले लक्ष विचलीत होऊ दिले नाही. पाहता पाहता, “कोट निम्मा तयार झाला; कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते.” (नहेम्या ४:६) खऱ्‍या उपासनेच्या शत्रूंना ते बांधकाम ठप्प पाडण्यात यश आले नाही! आपण नहेम्याचे अनुकरण कसे करु शकतो?

८. (क) विरोध करणारे आपल्यावर खोटे आरोप लावतात तेव्हा आपण नहेम्याचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो? (ख) विरोध करणाऱ्‍यांना उलट उत्तर न देणे शहाणपणाचे आहे हे दाखवणारा एखादा तुम्हाला आलेला किंवा तुम्ही ऐकलेला अनुभव सांगा.

कधीकधी शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा घरातच आपला विरोध करणारे आपल्याला टोमणे मारतात व आपल्यावर खोटे आरोप लावतात. पण या खोट्या आरोपांना सगळ्यात चांगले उत्तर आपण बायबलच्या पुढील तत्त्वानुसार वागून देऊ शकतो: “मौन धरण्याचा . . . समय असतो.” (उपदेशक ३:१,) याचा अर्थ, नहेम्याप्रमाणेच आपणही अपमानास्पद शब्दांना उलट उत्तर देण्यापासून स्वतःला आवरतो. (रोमकर १२:१७) आपण प्रार्थना करून देवाजवळ आपले मन मोकळे करतो आणि “मी फेड करीन” असे म्हणणाऱ्‍यावर पूर्ण भरवसा ठेवतो. (रोमकर १२:१९; १ पेत्र २:१९,२०) असे वागण्याद्वारे आपण विरोध करणाऱ्‍यांना, आज आपल्यावर सोपवण्यात आलेल्या कार्यापासून, अर्थात देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यापासून आपले लक्ष विचलीत करू देत नाही. (मत्तय २४:१४; २८:१९,२०) जितक्यांदा आपण विरोधामुळे खचून न जाता, प्रचार कार्यात सामील होतो तितक्यांदा आपण दाखवतो की आपणही नहेम्यासारखेच विश्‍वासू आहोत.

‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’

९. नहेम्याच्या शत्रूंनी आता कशाप्रकारच्या विरोधाचा त्यांच्यावर मारा केला आणि नहेम्याने याला कशी प्रतिक्रिया दाखवली?

नहेम्याच्या काळात खऱ्‍या उपासकांचा विरोध करणाऱ्‍यांनी जेव्हा हे ऐकले की “यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे” तेव्हा त्यांनी ‘यरुशलेमेबरोबर लढण्याकरता’ आपल्या तरवारी उचलल्या. आता यहुद्यांचे काही खरे नाही असे भासू लागले. कारण उत्तरेकडून शोमरोनी, पूर्वेकडून अम्मोनी, दक्षिणेकडून अरबी आणि पश्‍चिमेकडून अश्‍दोदी लोकांचे सैन्य त्यांच्याविरुद्ध आले. जेरुसलेमला चहुकडून वेढा पडला होता; बांधकाम करणाऱ्‍यांना पळ काढण्याचा कोणताच मार्ग उरला नव्हता! त्यांनी करावे तरी काय? नहेम्या सांगतो, “आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली.” शत्रूंनी धमकी दिली: ‘आम्ही त्यांस मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडू.’ हे कळल्यावर नहेम्याने बांधकाम करणाऱ्‍यांना “हाती तरवारी, बरच्या व धनुष्ये देऊन” त्यांना शहराचे रक्षण करण्याकरता नेमले. मानवी दृष्टिकोनाने पाहिल्यास, मूठभर यहुदी असंख्य शत्रूंच्या सैन्याविरुद्ध जिंकणे शक्यच नव्हते. पण नहेम्याने त्यांना प्रोत्साहन दिले: “त्यांची भीति धरू नका; थोर व भयावह जो परमेश्‍वर त्याचे स्मरण [करा.]”—नहेम्या ४:७-९,११,१३,१४.

१०. (क) अचानक घटनांना एक वेगळेच वळण का लागले? (ख) नहेम्याने कोणती खबरदारीची पावले उचलली?

१० पण अचानक घटनांना वेगळेच वळण लागले. शत्रूंनी माघार घेतली. का? नहेम्या सांगतो, “देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली.” पण नहेम्याला जाणीव होती की धोका अजूनही नाहीसा झालेला नाही. म्हणून, त्याने दूरदर्शीपणा दाखवून बांधकाम करणाऱ्‍यांच्या कामाच्या पद्धतीत थोडा फेरबदल केला. तेव्हापासून, बांधकाम करणारे “एका हाताने काम करीत व दुसऱ्‍या हातात शस्त्रे धारण करीत.” तसेच शत्रूंनी हल्ला केल्यास बांधकाम करणाऱ्‍यांना सावध करण्यासाठी नहेम्याने एकाला ‘रणशिंग वाजवण्यास’ नेमले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने लोकांना निश्‍चयपूर्वक सांगितले की “आपला देव आपल्यातर्फे लढेल.” (नहेम्या ४:१५-२०) या आश्‍वासनाने प्रोत्साहन मिळाल्यामुळे व शत्रूंच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सुसज्ज असल्यामुळे बांधकाम करणारे नेटाने आपले काम करत राहिले. या अहवालावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

११. राज्याच्या कार्यावर बंदी आहे अशा देशांतही वाइटापुढे टिकाव धरण्यास खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कशामुळे साहाय्य मिळते आणि ते कशाप्रकारे बऱ्‍याने वाइटाला जिंकतात?

११ कधीकधी खऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही हिंसक विरोधाला तोंड द्यावे लागते. काही देशांत तर उपद्रवी विरोधकांचे जणू मोठे सैन्यच खऱ्‍या उपासनेविरुद्ध उभे आहे. मानवी दृष्टीने विचार केल्यास, या देशांतील आपल्या सहविश्‍वासी बांधवांचा विजय होणे शक्यच नाही. तरीपण, या साक्षीदारांना पूर्ण खातरी आहे की ‘देव त्यांच्यातर्फे लढेल.’ आणि खरोखरच आपल्या विश्‍वासांसाठी छळ सहन करणाऱ्‍यांना वारंवार प्रत्यय आला आहे की यहोवा त्यांच्या प्रार्थना ऐकतो आणि शक्‍तिशाली शत्रूंची ‘मसलत व्यर्थ करतो.’ राज्याच्या कार्यावर प्रतिबंध आहे अशा देशांतही ख्रिस्ती कोणत्या न कोणत्या मार्गाने सुवार्तेची घोषणा करतच राहतात. जेरुसलेममध्ये बांधकाम करणाऱ्‍यांनी ज्याप्रमाणे आपली कार्यपद्धत बदलली त्याचप्रमाणे आज यहोवाचे साक्षीदारही विरोधकांचा हल्ला झाल्यास दूरदर्शीपणा दाखवून प्रचारकार्याच्या पद्धतीत आवश्‍यक फेरबदल करतात. अर्थात ते खरोखरची शस्त्रे वापरत नाहीत. (२ करिंथकर १०:४) शारीरिक दुखापत करण्याची धमकी दिली जाते तेव्हासुद्धा ते आपले प्रचार कार्य ठप्प पडू देत नाहीत. (१ पेत्र ४:१६) त्याउलट, हे धैर्यवान बंधूभगिनी ‘बऱ्‍याने वाइटाला जिंकतात.’

‘चल, आपण एकमेकांस भेटू’

१२, १३. (क) नहेम्याच्या विरोधकांनी कोणता मार्ग अवलंबला? (ख) नहेम्याने आपल्या विरोधकांना जाऊन भेटण्याचा प्रस्ताव का स्वीकारला नाही?

१२ थेट हल्ला करणे व्यर्थ आहे हे नहेम्याच्या शत्रूंनी ओळखले तेव्हा त्यांनी धूर्त मार्गांनी विरोध करायचे ठरवले. त्यांनी तीन डाव रचले. हे कोणते होते?

१३ सर्वप्रथम नहेम्याच्या शत्रूंनी त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. ते त्याला म्हणाले: “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांस भेटू.” ओनो हे जेरुसलेम व शोमरोनच्या मधोमध होते. तर या शत्रूंनी असे सुचवले की आपसांतील वाद मिटवण्याच्या हेतूने नहेम्याने अर्धे अंतर पार करून त्यांच्याकडे यावे. नहेम्या असा विचार करू शकला असता की ‘असे करण्यास काही हरकत नाही. शेवटी लढाई करण्यापेक्षा, वाटाघाटी करण्याचा मार्ग केव्हाही चांगलाच आहे.’ पण नहेम्याने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही. याचे कारण तो स्वतःच सांगतो: “मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा मनसुबा होता.” नहेम्याने त्यांचा धूर्त डाव ओळखला आणि तो त्याला बळी पडला नाही. चार वेळा त्याने आपल्या विरोधकांना सांगितले: “मला येण्याला सवड नाही; मी काम सोडून तुम्हाकडे का यावे, काम का बंद पाडावे?” नहेम्याला हातमिळवणी करण्यास भाग पाडण्याचे शत्रूंचे सर्व प्रयत्न फसले. नहेम्याने आपले लक्ष बांधकामावर केंद्रित ठेवले.—नहेम्या ६:१-४.

१४. नहेम्याने खोटे आरोप करणाऱ्‍यांना कसा प्रतिसाद दिला?

१४ दुसऱ्‍यांदा, नहेम्याच्या शत्रूंनी त्याच्याविषयी खोट्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. नहेम्याचा राजा अर्तहशश्‍त याच्याविरुद्ध “बंड करण्याचा विचार” आहे असा त्यांनी आरोप लावला. पुन्हा एकदा नहेम्याला ते म्हणाले: “आपण एकत्र जमून वाटाघाट करू.” आणि पुन्हा एकदा नहेम्याने नकार दिला कारण शत्रूंचा मनसुबा त्याने ओळखला होता. नहेम्या सांगतो, “आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हास भेवडावयास पाहत होते.” पण यावेळी नहेम्याने आपल्या शत्रूंच्या आरोपांचे खंडन केले. तो म्हणाला: “तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे.” शिवाय, नहेम्याने मदतीकरता यहोवाला प्रार्थना केली व “माझा हात दृढ कर” अशी त्याला विनंती केली. त्याला पूर्ण भरवसा होता की यहोवाच्या मदतीने आपण शत्रूंचा डाव उलटून बांधकाम प्रकल्प पूर्णत्वास नेऊ.—नहेम्या ६:५-९.

१५. एका खोट्या संदेष्ट्याने नहेम्याला कोणता सल्ला दिला आणि नहेम्याने हा सल्ला का स्वीकारला नाही?

१५ तिसऱ्‍यांदा, नहेम्याच्या शत्रूंनी नहेम्याला देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने, त्याचा विश्‍वासघात करण्यासाठी शमाया नावाच्या एका इस्राएली मनुष्याचा उपयोग केला. शमाया नहेम्याला म्हणाला: “चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्‍यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील.” शमायाने असे भासवले जणू नहेम्याचा जीव धोक्यात आहे आणि मंदिरात लपून बसल्यास तो आपला जीव वाचवू शकतो. पण नहेम्या हा याजक नव्हता. देवाच्या मंदिरात लपणे हे त्याच्याकरता एक पाप ठरले असते. आपला जीव वाचवण्याकरता देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास नहेम्या तयार होता का? नहेम्याने असे उत्तर दिले: “मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.” नहेम्या या सापळ्यातही का अडकला नाही? कारण शमाया हा त्याच्यासारखाच इस्राएली असला तरी, “देवाने त्यांस पाठविले नाही” हे त्याला माहीत होते. त्याला पक्की खात्री होती की एका खऱ्‍या संदेष्ट्याने कधीही त्याला देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा सल्ला दिला नसता. पुन्हा एकदा नहेम्याने त्या दुष्ट विरोधकांना स्वतःवर विजय मिळवू दिला नाही. त्यानंतर काही काळातच तो असे वृत्त देऊ शकला की “अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्‍न दिवसांच्या आत कोट बांधून झाला.”—नहेम्या ६:१०-१५; गणना १:५१; १८:७.

१६. (क) खोटे मित्र, खोटे आरोप करणारे व खोटे बांधव यांच्याशी आपण कशाप्रकारे वागावे? (ख) आपल्या विश्‍वासांच्या बाबतीत आपण कधीही हातमिळवणी करत नाही हे तुम्ही घरी, शाळेत व कामाच्या ठिकाणी कसे दाखवू शकता?

१६ नहेम्याप्रमाणे आपल्यालाही कदाचित खोटे मित्र, खोटे आरोप करणारे आणि खोटे बांधव यांच्याकडून विरोध होऊ शकतो. काही लोक आपल्याला त्यांच्यासोबत वाटाघाट करण्याचे, हातमिळवणी करण्याचे सुचवू शकतात. ते आपल्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न करतील की यहोवाच्या सेवेतला आपला आवेश थोडा कमी केला तर आपण यहोवाच्या सेवेसोबतच जगिक ध्येयेही साध्य करू शकतो. पण आपण हातमिळवणी करण्यास नकार देतो कारण देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान आहे. (मत्तय ६:३३; लूक ९:५७-६२) विरोध करणारे कधीकधी आपल्याविरुद्ध खोटे आरोपही पसरवतात. नहेम्याच्या विरोधात ज्याप्रमाणे राजाविरुद्ध बंड करण्याचा आरोप लावण्यात आला, त्याचप्रमाणे काही देशांत आपल्या विरोधात असा आरोप केला जातो की आपण राष्ट्राकरता धोकेदायक आहोत. काही आरोपांचे न्यायालयांत खंडन करण्यात आपल्याला यश आले आहे. पण प्रत्येक घटनेचा निष्कर्ष काहीही असला तरी आपण पूर्ण खात्रीनिशी यहोवाला प्रार्थना करतो की त्याने त्याच्या इच्छेनुरूप आपल्या सर्व कार्यांचे मार्गदर्शन करावे. (फिलिप्पैकर १:७) कधीकधी, यहोवाची सेवा करण्याचे ढोंग करणाऱ्‍यांकडूनही विरोध होऊ शकतो. नहेम्याच्याच एका देशबंधूने ज्याप्रमाणे त्याला आपला जीव वाचवण्याकरता देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्याचा सल्ला दिला होता त्याचप्रमाणे धर्मत्यागी झालेले पूर्वीचे साक्षीदार आपल्याला या ना त्या मार्गाने हातमिळवणी करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण आपण धर्मत्यागी व्यक्‍तींच्या वाऱ्‍यालाही उभे राहात नाही. आपल्याला माहीत आहे की देवाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने नव्हे तर त्यांचे पालन केल्याने आपला जीव वाचेल! (१ योहान ४:१) होय, यहोवाच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारच्या दुष्ट किंवा वाईट योजनांवर विजय मिळवू शकतो.

वाइटाचा सामना करूनही सुवार्तेची घोषणा करणे

१७, १८. (क) सैतान व त्याचे सहकारी काय करू इच्छितात? (ख) तुमचा निर्धार काय आहे आणि का?

१७ देवाचे वचन ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांविषयी असे म्हणते: “त्यांनी कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे [सैतानाला] जिंकले.” (प्रकटीकरण १२:११) त्याअर्थी, सर्व वाइटाचा उगम सैतान याच्याविरुद्ध जिंकण्याचा आणि राज्य संदेशाच्या प्रचाराचा थेट संबंध आहे. म्हणूनच तर सैतान अभिषिक्‍त शेषवर्गाच्या आणि ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ कार्याला विरोध करण्याद्वारे वारंवार त्यांच्यावर हल्ला करत राहतो!—प्रकटीकरण ७:९; १२:१७.

१८ तर आपण पाहिल्याप्रमाणे, विरोध कधी शाब्दिक हल्ल्यांच्या रूपात, कधी शारीरिक दुखापत करण्याच्या धमक्यांच्या रूपात तर कधी धूर्त मार्गांनी होऊ शकतो. पण सैतानाचा इरादा मात्र एकच आहे आणि तो म्हणजे प्रचार कार्य ठप्प पाडणे. पण त्याने कितीही प्रयत्न केला तरी घोर निराशाच त्याच्या पदरी पडेल कारण प्राचीन काळातल्या नहेम्याप्रमाणेच देवाच्या लोकांचाही ‘बऱ्‍याने वाइटाला जिंकण्याचा’ पक्का निर्धार आहे. आणि हे साध्य करण्यासाठी ते, कार्य पूर्ण झाले आहे असे यहोवा म्हणत नाही तोपर्यंत सुवार्तेची घोषणा करतच राहतील!—मार्क १३:१०; रोमकर ८:३१; फिलिप्पैकर १:२७,२८. (w०७ ७/१)

[तळटीप]

^ परि. 2 या घटनांची पार्श्‍वभूमी समजून घेण्यासाठी नहेम्या १:१-४; २:१-६,९-२०; ४:१-२३; ६:१-१५ वाचावे.

तुम्हाला आठवते का?

• गतकाळात आणि आताही देवाच्या सेवकांना कशाप्रकारे विरोधाला तोंड द्यावे लागते?

• नहेम्याच्या शत्रूंचा मुख्य इरादा काय होता आणि आज देवाच्या शत्रूंचा इरादा काय आहे?

• आपण बऱ्‍याने वाइटाला कसे जिंकत राहू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३० पानांवरील चौकट/चित्र]

नहेम्याच्या पुस्तकातून शिकण्यासारखे धडे

देवाच्या सेवकांना कशास तोंड द्यावे लागते?

उपहास

धमक्या

फसवणूक

फसवणूक कोणकोण करू शकतात?

खोटे मित्र

खोटे आरोप करणारे

खोटे बांधव

देवाचे सेवक कशाप्रकारे वाइटाला जिंकू शकतात?

देवाने सोपवलेल्या कार्यात खंड न पडू देता ते करत राहण्याद्वारे

[३१ पानांवरील चित्र]

खरे ख्रिस्ती निर्भयतेने सुवार्तेची घोषणा करतात