व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

आम्हाला मूल हवे असल्यामुळे, सत्याचे ज्ञान मिळण्याआधी मी व माझ्या पत्नीने ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ या पद्धतीचा स्वीकार केला होता. आमची सर्वच फलित बीजे (भ्रूण) वापरण्यात आली नाहीत. काही गोठवून ठेवण्यात आली. ही फलित बीजे राखून ठेवली पाहिजेत का, की ती नष्ट करता येतील?

▪ ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) पद्धतीचा स्वीकार करण्याची निवड करणाऱ्‍या दांपत्यांना ज्या अनेक महत्त्वाच्या नैतिक बाबींचा सामना करावा लागतो त्यांपैकी ही केवळ एक बाब आहे. प्रत्येक दांपत्य आपल्या निर्णयांबद्दल यहोवाला जबाबदार आहे. पण, या कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञानात काय समाविष्ट आहे हे जाणून घेण्यास हा लेख मदत करू शकतो.

सन १९७८ मध्ये इंग्लंडमधील एक स्त्री जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची आई झाली. तिच्या बीजवाहिन्यांमध्ये अडथळा असल्यामुळे तिच्या बीजांचा शुक्रजंतूशी संयोग होत नव्हता. यामुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. डॉक्टरांनी एका शस्त्रक्रियेद्वारे तिच्या शरीरातील एक परिपक्व बीज काढले आणि ते एका काचेच्या बशीत ठेवून तिच्या पतीच्या शुक्रजंतूशी त्याचे फलन घडवून आणले. या गर्भाला पोषक द्रव्यात ठेवून वाढू देण्यात आले आणि नंतर तो तिच्या गर्भाशयात सोडण्यात आला जेथे त्याचे रोपण झाले. काही काळाने तिने एका मुलीला जन्म दिला. या व अशा इतर पद्धतींना नंतर इन व्हिट्रो (काचेच्या बशीत) फर्टिलायझेशन किंवा आयव्हीएफ म्हणण्यात आले.

नेमकी पद्धत वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी असली, तरी सहसा आयव्हीएफमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असतात: बीजकोषात पुष्कळ बीजे निर्माण करण्यासाठी पत्नीला काही आठवडयांसाठी जननशक्‍ती वाढवणारी शक्‍तिशाली औषधे दिली जातात. शुक्रजंतू मिळवण्यासाठी पतीला कदाचित हस्तमैथुन करण्यास सांगितले जाऊ शकते. या स्त्रीबीजांबरोबर पतीच्या शुक्रजंतूंचा संयोग प्रयोगशाळेत घडवून आणला जातो. एकाच वेळी अनेक बीजांचे फलन होऊन त्यांचे मानवी गर्भ तयार होऊ शकतात. नुकत्याच तयार झालेल्या गर्भांचे एखाद-दोन दिवसांनी काळजीपूर्वक परीक्षण केले जाते व त्यांच्यापैकी काही दोषपूर्ण तर नाहीत ना, आणि कोणते निरोगी असून रोपण होण्यास व वाढण्यास सक्षम आहेत हे ठरवले जाते. सुमारे तिसऱ्‍या दिवशी एक नव्हे, तर सहसा दोन तीन उत्तम प्रतीचे गर्भ पत्नीच्या गर्भाशयात सोडले जातात. यामुळे गर्भधारणा घडून येण्याची शक्यता वाढते. जेव्हा एक किंवा अधिक गर्भांचे रोपण होते तेव्हा पत्नी गरोदर राहते आणि काही काळाने ती बाळाला जन्म देईल अशी अपेक्षा केली जाते.

पण अशा गर्भांचे काय जे चांगल्या प्रतीचे नसल्यामुळे, दोषपूर्ण असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे वापरण्यात आले नाहीत? उपयोगात न आणलेल्या या गर्भांना तसेच ठेवल्यास ते लवकरच नष्ट होतील. असे होण्यापूर्वी या जास्तीच्या गर्भांना द्रवरूपातील नायट्रोजनमध्ये गोठवून ठेवले जाते. का? कारण आयव्हीएफच्या पहिल्याच प्रयत्नात गर्भधारणा झाली नाही तर कधीकधी, गोठवून ठेवलेल्यांपैकी काही गर्भांचा वापर दुसऱ्‍या प्रयत्नात, कमी खर्चात केला जातो. पण यामुळे काही नैतिक प्रश्‍न उभे राहतात. ज्या दांपत्याने वरील प्रश्‍न विचारला त्यांना, आणि त्यांच्यासारख्या अनेकांना, गोठवून ठेवलेल्या गर्भांचे काय करावे याविषयीचा निर्णय घेणे खूप कठीण जाते. कदाचित त्यांना आणखी मुले नको असतील. पालकांच्या वयामुळे किंवा लागणाऱ्‍या खर्चामुळे दुसरा प्रयत्न करणे कदाचित शक्य नसेल. एकाच वेळी तीन किंवा त्यापेक्षा जास्त गर्भधारणा झाल्यास त्यासोबत संभवणाऱ्‍या धोक्यांची त्यांना काळजी वाटत असेल. * दांपत्यापैकी एका किंवा दोघांचाही मृत्यू किंवा पुनर्विवाह झाला तर गुंतागुंत आणखी वाढू शकते. असे अनेक प्रश्‍न उद्‌भवू शकतात आणि परिणामस्वरूप काही दांपत्ये प्रयोगशाळेत गर्भ गोठवून ठेवण्याचा खर्च वर्षानुवर्षे उचलत राहतात.

२००८ मध्ये एका प्रमुख भ्रूणवैज्ञानिकाने द न्यू यॉर्क टाइम्स यात असे म्हटले की जास्तीच्या भ्रूणांचे काय करावे याविषयी बरीच दांपत्ये द्विधा मनःस्थितीत पडली होती. त्या लेखात म्हटले होते: “देशभरात जवळजवळ चार लाख भ्रूण प्रयोगशाळांत गोठवून ठेवलेले आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे . . . हे भ्रूण योग्य प्रकारे गोठवून ठेवण्यात आले तर ते दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे टिकून राहू शकतात. पण सामान्य तापमानावर आणल्यावर त्यांपैकी सर्वच भ्रूण जिवंत राहत नाहीत.” (तिरपे वळण आमचे.) हे तथ्य काही ख्रिश्‍चनांना विचार करण्यास भाग पाडते. का?

आयव्हीएफमुळे उद्‌भवणाऱ्‍या प्रश्‍नांचा सामना करत असलेली ख्रिस्ती दांपत्ये एका वेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय परिस्थितीचा विचार करू शकतात. असाध्य परिस्थितीत असलेल्या व जीवनरक्षक यंत्रणेवर, जसे की कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वासावर (व्हेंटिलेटर) असलेल्या आपल्या प्रिय व्यक्‍तीसंबंधी काय निर्णय घ्यावा हे एखाद्या ख्रिश्‍चनाला ठरवावे लागू शकते. खरे ख्रिस्ती, वैद्यकीय उपचारांसंबंधी हलगर्जीपणा करण्याच्या विरोधात आहेत; निर्गम २०:१३ व स्तोत्र ३६:९ मध्ये सांगितल्याप्रमाणे ते जीवनाचा आदर करतात. ८ मे १९७४ च्या अवेक! मासिकाच्या अंकात असे म्हटले होते: “जीवन पवित्र आहे या देवाच्या दृष्टिकोनाबद्दल आदर बाळगणारे बायबल तत्त्वांनुसार जीवन जगू इच्छितात. ते शुद्ध विवेक राखून सरकारांच्या नियमांच्या अधीन राहू इच्छितात. त्यामुळे अशा व्यक्‍ती केव्हाही दयामरणाचा मार्ग निवडणार नाहीत,” ज्यात जाणीवपूर्वक रुग्णाच्या जीवनाचा अंत केला जातो. पण काही परिस्थितींत एक व्यक्‍ती केवळ कृत्रिम यंत्रणेच्या साहाय्याने जिवंत असते. अशा वेळी आपल्या प्रिय व्यक्‍तीला पुढेही या कृत्रिम यंत्रणेवर ठेवावे की नाही याचा निर्णय कुटुंबातील सदस्यांना घ्यावा लागतो.

हे खरे आहे की ज्या दांपत्याने आयव्हीएफ पद्धत निवडली व तयार झालेले गर्भ प्रयोगशाळेत साठवून ठेवले त्यांची परिस्थिती वरील परिस्थितीपेक्षा वेगळी आहे. पण एक पर्याय त्यांना सुचवला जाऊ शकतो तो म्हणजे द्रवरूपातील नायट्रोजनमध्ये गोठवून ठेवलेले भ्रूण सामान्य तापमानावर आणणे. कृत्रिम वातावरणातून काढल्यावर हे भ्रूण फार काळ टिकू शकणार नाहीत. असे करायचे किंवा नाही हे दांपत्याला ठरवावे लागेल.—गलती. ६:७.

गर्भधारणा घडून येण्यासाठी आणि एका बाळाला जन्म देण्यासाठी एखाद्या दांपत्याने स्वतःहून आयव्हीएफ पद्धत निवडली असेल. हे दांपत्य कदाचित गर्भ गोठवून ठेवण्यासाठी; किंवा भविष्यात पुन्हा आयव्हीएफच्या साहाय्याने बाळाला जन्म देण्यासाठी त्या गर्भांचा वापर करता यावा म्हणून ते प्रयोगशाळेत ठेवण्यासाठी लागणारा खर्च उचलण्याचा निर्णय घेतील. पण, दुसरे एखादे दांपत्य कदाचित असा विचार करतील की प्रयोगशाळेत ठेवलेले त्यांचे गर्भ केवळ कृत्रिम यंत्रणेच्या साहाय्याने जिवंत ठेवले जात आहेत. त्यामुळे हा खर्च आपण बंद करू शकतो असे कदाचित ते ठरवतील. अशा परिस्थितीत असलेले ख्रिस्ती त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करून निर्णय घेण्याबाबत देवाला जबाबदार आहेत. त्यांची एक शुद्ध विवेक बाळगण्याची इच्छा असली पाहिजे. तसेच त्यांनी दुसऱ्‍यांच्या विवेकाकडेही दुर्लक्ष करू नये.—१ तीम. १:१९.

प्रजननविषयक अंतःस्रावविज्ञानाच्या एका तज्ज्ञाला असे आढळले की बरीच दांपत्ये “त्यांच्या [गोठवून ठेवलेल्या] गर्भांचं काय करायचं हे ठरवताना गोंधळात पडतात आणि सोबतच त्यांना खूप चिंताही वाटते.” त्यांनी शेवटी असे म्हटले: “काही दांपत्यांना वाटतं की यासंबंधी चांगला निर्णय घेणं अशक्य आहे.”

यावरून स्पष्टच आहे की आयव्हीएफसारखे तंत्रज्ञान स्वीकारण्याचा विचारसुद्धा करण्याअगोदर खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी याच्याशी संबंधित असलेल्या सर्व गंभीर बाबींचा सारासार विचार केला पाहिजे. बायबल असा सल्ला देते: “धोका पाहून विचारवंत बाजूला होतो; अविचारी मात्र पुढे जातात आणि परिणाम भोगतात.”—नीति. २२:३, मराठी कॉमन लँग्वेज.

एक पुरुष आणि स्त्री एकत्र राहत आहेत आणि बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरण्याकरता त्यांची लग्न करण्याची इच्छा आहे. पण तो पुरुष त्या विशिष्ट देशात बेकायदेशीर रीत्या राहत असल्यामुळे तेथील सरकार या जोडप्याला लग्न करण्याची परवानगी देत नाही. अशा वेळी त्यांनी ‘विश्‍वासूपणाचे घोषणापत्र’ या दस्तऐवजावर सही केल्यास त्यांना बाप्तिस्मा घेता येईल का?

▪ वरवर पाहिल्यास हा या समस्येवरील उपाय आहे असे वाटू शकते, पण बायबलनुसार हा मार्ग योग्य ठरणार नाही. असे का म्हणता येईल हे समजून घेण्यासाठी ‘विश्‍वासूपणाचे घोषणापत्र’ या दस्तऐवजाचा उद्देश काय आहे आणि तो कोणत्या परिस्थितीत वापरला जाऊ शकतो हे आपण सर्वप्रथम पाहू या.

खालील परिच्छेदांत वर्णन केलेल्या कारणांमुळे ज्यांना लग्न करण्यास प्रतिबंध केला जातो, असा पुरुष व स्त्री साक्षीदारांसमोर ‘विश्‍वासूपणाचे घोषणापत्र’ या दस्तऐवजावर सह्‍या करू शकतात. या दस्तऐवजातील लिखित निवेदनात ते दोघे एकमेकांना विश्‍वासू राहण्याची आणि शक्य झाल्यास आपल्या संबंधास कायदेशीर स्वरूप देण्याची शपथ घेतात. देवासमोर आणि साक्षीदारांसमोर या जोडप्याने एकमेकांना विश्‍वासू राहण्याची लेखी स्वरूपात हमी दिल्यामुळे मंडळी त्यांच्या विवाहास कायदेशीर विवाहाप्रमाणेच लेखेल.

‘विश्‍वासूपणाचे घोषणापत्र’ हा दस्तऐवज का आणि केव्हा वापरला जातो? यहोवाने विवाह व्यवस्थेची स्थापना केली आणि तो या व्यवस्थेचा आदर करतो. त्याच्या पुत्राने म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:५, ६; उत्प. २:२२-२४) येशूने पुढे असेही म्हटले: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या [लैंगिक अनैतिकता] कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.” (मत्त. १९:९) त्याअर्थी, जारकर्म म्हणजेच लैंगिक अनैतिकता हे बायबलनुसार घटस्फोट घेण्याचे व विवाहसंबंध संपुष्टात आणण्याचे एकमेव कारण आहे. उदाहरणार्थ, एखाद्या पुरुषाने विवाहबाह्‍य लैंगिक संबंध ठेवल्यास, त्याची पत्नी त्याला घटस्फोट द्यावा किंवा नाही हे ठरवू शकते. जर तिने त्याला घटस्फोट दिलाच, तर ती दुसऱ्‍या माणसाशी लग्न करण्यास मोकळी असेल.

पण गतकाळात काही देशांतील मुख्य चर्च घटस्फोटासंबंधी बायबलच्या या स्पष्ट भूमिकेचा स्वीकार करत नव्हते. ते असे शिकवायचे की घटस्फोट कोणत्याही कारणासाठी दिला जाऊ शकत नाही. यामुळे, चर्चचा पगडा असलेल्या काही देशांतील नागरी कायद्यात कोणत्याही कारणामुळे, अगदी येशूने सांगितलेल्या जारकर्माच्या रास्त कारणामुळेही घटस्फोट घेण्याची मुभा नाही. इतर देशांत, घटस्फोट घेणे शक्य आहे पण त्याची प्रक्रिया अतिशय वेळखाऊ, गुंतागुंतीची आणि खर्चीक आहे. त्यामुळे घटस्फोट मिळवण्यासाठी कितीतरी वर्षे लागू शकतात. या देशांच्या बाबतीत असे म्हणता येईल की देवाने ज्याची परवानगी दिली आहे ते करण्यापासून चर्च किंवा सरकार लोकांना अडवीत आहे.—प्रे. कृत्ये ११:१७.

उदाहरणार्थ, एखादे जोडपे अशा देशात राहत असेल जेथे घटस्फोट घेणे अशक्य किंवा अतिशय कठीण असेल; तो कायदेशीर रीत्या मान्य होण्यास अनेक वर्षे लागत असतील. जर या जोडप्याने पूर्वीचा कायदेशीर विवाह संपुष्टात आणण्यासाठी सर्व वाजवी प्रयत्न केलेले असतील; आणि ते देवाच्या दृष्टीने विवाह करण्यास मोकळे असतील तर ते ‘विश्‍वासूपणाच्या घोषणापत्रावर’ सही करू शकतात. ही ख्रिस्ती मंडळीने खास अशा देशांत वापरण्यासाठी केलेली एक दयाळू तरतूद आहे. पण बहुतेक देशांत, जेथे घटस्फोट घेणे काहीसे खर्चीक किंवा गुंतागुंतीचे असले तरीही शक्य आहे, तेथे ही तरतूद वापरली जाऊ नये.

‘विश्‍वासूपणाच्या घोषणापत्राचा’ उद्देश समजून न घेतल्यामुळे, जेथे घटस्फोट घेणे शक्य आहे अशा देशांत राहणाऱ्‍या काहींनी, केवळ गुंतागुंत व गैरसोय टाळण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणापत्रावर सही करता येईल का, असे विचारले आहे.

सुरुवातीला दिलेल्या प्रश्‍नाकडे परत जाऊ या. हे जोडपे लग्न न करताच एकत्र राहत आहे आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा आहे. बायबलनुसार दोघेही लग्न करण्यास मोकळे आहेत; दोघांपैकी कोणाचेही पूर्वी लग्न झालेले नाही. पण, तो पुरुष बेकायदेशीर रीत्या त्या देशात राहत आहे. त्यामुळे सरकार एका बेकायदेशीर परदेशी रहिवाशाच्या विवाहाला संमती देत नाही. (बऱ्‍याच देशांत, एक जण किंवा दोघेही बेकायदेशीर रीत्या राहत असले, तरीसुद्धा सरकारकडून त्यांच्या विवाहाला परवानगी दिली जाते.) सदर प्रकरणात, त्या देशात घटस्फोटाची तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे ‘विश्‍वासूपणाच्या घोषणापत्राचा’ पर्याय या देशाला लागू होत नाही. या जोडप्याच्या बाबतीत पाहता, दोघांपैकी कोणाला घटस्फोट घ्यायचा असून तसे करण्यापासून त्याला अडवले जात आहे अशी परिस्थिती नाही. ते दोघेही लग्न करण्यास मोकळे आहेत. पण, पुरुष बेकायदेशीर रहिवासी असताना, ते लग्न कसे करू शकतात? कदाचित त्यांना दुसऱ्‍या देशात जावे लागेल, जेथे त्याचे बेकायदेशीर रहिवासी असणे लग्न करण्याच्या आड येणार नाही. किंवा, सध्या राहत असलेल्या देशातच कायदेशीर रीत्या राहता येण्यासाठी त्याने आवश्‍यक औपचारिकता पूर्ण केल्या, तर तेथे राहूनही त्यांना विवाह करता येईल.

या जोडप्याला आपले जीवन देवाच्या स्तरांच्या व कैसराच्या नियमाच्या एकवाक्यतेत आणणे नक्कीच शक्य आहे. (मार्क १२:१७; रोम. १३:१) त्यांनी कायदेशीर रीत्या विवाह केल्यास, ते बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरू शकतील.—इब्री १३:४.

[तळटीप]

^ परि. 6 पण वाढणाऱ्‍या भ्रूणात दोष आहे असे वाटल्यास किंवा एकापेक्षा जास्त गर्भांचे रोपण झाल्यास काय? जाणूनबुजून गर्भाची वाढ रोखणे गर्भपात ठरेल. आयव्हीएफ पद्धतीमुळे जुळी, तिळी किंवा त्यापेक्षा जास्त गर्भधारणा होणे सामान्य आहे; आणि यामुळे वेळेच्या अगोदर बाळाचा जन्म होणे किंवा आईला रक्‍तस्राव होणे यांसारख्या धोक्यांची संभावना वाढते. एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात अनेक गर्भ असल्यास तिला त्यांपैकी सर्वात चांगल्या प्रतीचा गर्भ निवडून बाकीचे गर्भ नष्ट करण्याविषयी सुचवले जाते. हा जाणीवपूर्वक गर्भपात असून, हे एखाद्याचा खून करण्यासारखे आहे.—निर्ग. २१:२२, २३; स्तो. १३९:१६.

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

अशा परिस्थितीत असलेले ख्रिस्ती त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करून निर्णय घेण्याबाबत देवाला जबाबदार आहेत

[१५ पानांवरील चौकट]

आयव्हीएफच्या इतर पद्धती

आयव्हीएफच्या पद्धतीची सुरुवात झाली तेव्हापासून अशा काही दुसऱ्‍या पद्धती उदयास आल्या ज्या नक्कीच बायबलमधून प्रकट होणाऱ्‍या देवाच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत. उदाहरणार्थ, कधीकधी एका स्त्रीच्या बीजांचे फलन अशा एका पुरुषाच्या शुक्रजंतूंशी केले जाते जो तिचा पती नसतो. अशा रीतीने तयार झालेल्या गर्भाचे नंतर तिच्या गर्भाशयात रोपण केले जाते. (समलिंगी स्त्रिया कधीकधी या पद्धतीचा उपयोग करतात.) किंवा एखाद्या पतीच्या शुक्रजंतूंनी त्याची पत्नी नसलेल्या दुसऱ्‍या एखाद्या स्त्रीच्या बीजांचे फलन केले जाते. त्यानंतर त्याची पत्नी यामुळे तयार झालेल्या गर्भांचे आपल्या गर्भाशयात रोपण करवून घेते.

याची आणखी एक पद्धत म्हणजे “भ्रूण दत्तक” घेणे. या पद्धतीत पत्नीच्या गर्भाशयात जे भ्रूण सोडले जातात त्यांत तिचे बीज किंवा तिच्या पतीचे शुक्रजंतूदेखील नसतात. दुसऱ्‍या एक पद्धतीत दांपत्याचे बीज व शुक्रजंतू यांचे आयव्हीएफ पद्धतीने गर्भाशयाबाहेर फलन घडवून आणले जाते. यामुळे तयार होणारे भ्रूण नंतर दुसऱ्‍या एका स्त्रीच्या (सरोगेट) गर्भाशयात सोडून त्यांचे रोपण केले जाते. ही स्त्री त्या दांपत्याच्या वतीने बाळाला आपल्या गर्भात वाढू देते आणि नंतर त्यास जन्म देते. *

देवाचे सेवक अशा प्रजनन पद्धती स्वीकारत नाहीत कारण ते देवाच्या या मार्गदर्शनाचे पालन करतात: “तू आपल्या शेजाऱ्‍याच्या पत्नीला आपले वीर्य देऊन अशुद्ध होऊ नको.” (लेवी. १८:२०, २९, NW; नीति. ६:२९) जेव्हा विवाहित नसलेल्या व्यक्‍तींच्या स्त्रीबीजांचे किंवा शुक्रजंतूंचे (किंवा दोन्हींचे) फलन केले जाते तेव्हा ते बायबल ज्यास पोर्निया म्हणते त्यात, म्हणजेच लैंगिक अनैतिकतेत मोडते. या पद्धतींत जननेंद्रियांचा गंभीर स्वरूपात गैरवापर होतो.—मत्त. ५:३२; १ करिंथ. ५:११; ६:९, १८; इब्री १३:४.

[तळटीप]

^ परि. 29 सावध राहा! (इंग्रजी), ८ मार्च १९९३, पृष्ठे २६-२७ वरील लेखात सरोगेट मातेविषयी (प्रतिमाता) चर्चा केली आहे.