व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाट पाहण्याचं थांबवू नका!

वाट पाहण्याचं थांबवू नका!

“त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा.”—हब. २:३.

गीत क्रमांक: ३२, ४५

१, २. यहोवाच्या अभिवचनांबद्दल देवाच्या सेवकांचा दृष्टिकोन काय आहे?

यहोवाच्या सेवकांनी त्याची अभिवचनं पूर्ण होण्याची अगदी धीरानं वाट पाहिली होती. उदाहरणार्थ, बाबेलोनी लोकांकडून यहूदा राज्याचा विनाश होण्याची यिर्मया वाट पाहत होता आणि इ.स.पू. ६०७ साली तसंच घडलं. (यिर्म. २५:८-११) यहोवा गुलामगिरीत असलेल्या यहुद्यांना सोडवून पुन्हा त्यांच्या देशात आणेल अशी भविष्यवाणी यशयानं केली आणि त्यानं म्हटलं, “जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.” (यश. ३०:१८) मीखालाही यहोवाची अभिवचनं पूर्ण होतील अशी खात्री होती. म्हणूनच तो म्हणाला, “मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करेन.” (मीखा ७:७) देवाच्या सेवकांनीही शेकडो वर्षांपासून, वचनयुक्त मसीहाच्या किंवा ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहिली होती.—लूक ३:१५; १ पेत्र १:१०-१२. *

आज आपणदेखील यहोवाच्या राज्याविषयीच्या भविष्यवाण्या पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत. या राज्याचा राजा येशू, लवकरच देवाच्या सेवकांना या दुष्ट जगातून वाचवणार आहे. तो दुष्ट लोकांचा नाश करून सर्व दुःखांचा अंत करणार आहे. (१ योहा. ५:१९) यहोवाचा दिवस कोणत्याही क्षणी येऊ शकतो. तेव्हा, आपण नेहमी त्या दिवसासाठी तयार असलं पाहिजे आणि त्या दिवसाची वाट पाहत राहिली पाहिजे.

३. बऱ्याच वर्षांपासून अंत येण्याची वाट पाहत असताना आपल्या मनात कोणता प्रश्न येऊ शकतो?

पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण होईल त्या दिवसाची आपण अगदी आतुरतेनं वाट पाहत आहोत. (मत्त. ६:१०) पण, कदाचित आपण असा विचार करू, की ‘इतकी वर्षं आपण वाट पाहिली पण अंत तर आला नाही. मग आता अंत लवकरच येईल अशी अपेक्षा करत राहणं कितपत योग्य आहे?’ चला या प्रश्‍नाचं उत्तर आता आपण पाहू या.

अंत लवकरच येईल अशी अपेक्षा आपण का करावी?

४. आपण जागृत का राहिलं पाहिजे?

अंत लवकरच येईल अशी अपेक्षा करत राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण, स्वतः येशूनंच आपल्या शिष्यांना “जागृत राहा” अशी आज्ञा दिली होती! (मत्त. २४:४२; लूक २१:३४-३६) शिवाय, यहोवाची संघटनाही आपल्याला तेच करण्याची आठवण करून देते. आपण “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत” राहावी आणि नवीन जगाविषयी यहोवानं दिलेल्या अभिवचनांवर आपलं लक्ष केंद्रित करावं असं उत्तेजन देवाची संघटना आपल्याला वारंवार देते.—२ पेत्र ३:११-१३ वाचा.

५. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत राहणं गरजेचं आहे असं का म्हणता येईल?

पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांनी यहोवाच्या दिवसाची वाट पाहिली हे खरं आहे. पण, आज आपल्यासाठी त्या दिवसाची वाट पाहत राहणं आणखी जास्त महत्त्वाचं आहे. असं का? कारण, येशूनं दिलेल्या चिन्हांवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की १९१४ पासून तो देवाच्या राज्याचा राजा म्हणून कार्य करत आहे. तसंच, आपण शेवटल्या दिवसांत किंवा ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत हेदेखील यावरून दिसून येतं. उदाहरणार्थ, येशूनं केलेल्या भविष्यवाणीनुसार जगाची परिस्थिती आणखीनच खालावत चालली आहे आणि राज्याची सुवार्तादेखील संपूर्ण पृथ्वीवर घोषित केली जात आहे. (मत्त. २४:३, ७-१४) शिवाय, युगाच्या समाप्तीचा हा काळ आणखी किती दिवसांचा असेल हे येशूनं सांगितलं नव्हतं. त्यामुळे अंत केव्हाही येईल अशी अपेक्षा करत आपण नेहमी तयार असलं पाहिजे.

६. अंत जवळ येईल तसतशी जगातील परिस्थिती वाईट होत जाईल हे आपल्याला कशावरून कळतं?

तर मग, ‘युगाची समाप्ती’ भविष्यात येणाऱ्या अशा काळाला सूचित करते का, जेव्हा जगातील परिस्थिती याहूनही वाईट असेल? बायबल म्हणतं की “शेवटल्या काळी” लोक आणखीनच वाईट होत जातील. (२ तीम. ३:१, १३; मत्त. २४:२१; प्रकटी. १२:१२) त्यामुळे, आता जरी परिस्थिती वाईट असली तरी पुढे ती आणखी वाईट होत जाईल हे आपण जाणतो.

७. शेवटल्या दिवसांतील परिस्थितीविषयी मत्तय २४:३७-३९ या वचनांतून आपल्याला काय समजतं?

काहींना असं वाटेल की ‘मोठं संकट’ सुरू होण्याआधी सर्व देशांत युद्धं लढली जातील आणि अनेक जणांना आजारपणाचा किंवा अन्नटंचाईचा सामना करावा लागेल. (प्रकटी. ७:१४) पण समजा असं झालंच तर बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत हे सर्वांनाच स्पष्टपणे दिसून येईल आणि ज्यांना बायबलमध्ये आवड नाही अशांच्याही ते लक्षात येईल. पण, येशूनं असं म्हटलं होतं की शेवटल्या दिवसांत अनेक जण ‘दखल घेणार नाहीत’ किंवा त्यांच्या लक्षातही येणार नाही. ते दररोजच्या जीवनात नेहमीसारखेच व्यस्त राहतील आणि अचानक यहोवाचा दिवस येईल तेव्हा त्यांना धक्का बसेल. (मत्तय २४:३७-३९ वाचा.) तेव्हा, मोठं संकट येण्याआधी जगाची परिस्थिती इतकी वाईट होईल, की त्यामुळे अंत जवळ आहे हे लोकांना मान्यच करावं लागेल अशी अपेक्षा आपण करू नये.—लूक १७:२०; २ पेत्र ३:३, ४.

८. येशूनं दिलेल्या चिन्हांबद्दल जागृत राहिल्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची खात्री पटली आहे?

येशूनं दिलेल्या चिन्हांचा मुख्य हेतू त्याच्या शिष्यांना शेवटल्या काळाचा स्पष्ट इशारा देण्याचा होता. आणि त्याच्या शिष्यांनीही आपण जागृत असल्याचं नेहमीच दाखवलं आहे. (मत्त. २४:२७, ४२) सन १९१४ पासून येशूनं दिलेल्या चिन्हांचे वेगवेगळे भाग पूर्ण होत आहेत. त्यामुळे, आपल्याला याची पूर्ण खात्री आहे की आपण खरंच शेवटल्या दिवसांत, ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत. सैतानाच्या या दुष्ट जगाच्या अंताची वेळ यहोवानं आधीच ठरवली आहे.

९. अंत लवकरच येईल अशी अपेक्षा आपण का केली पाहिजे?

तर मग, अंत लवकरच येईल अशी अपेक्षा आपण का करतो? कारण, स्वतः येशूनंच तशी आज्ञा आपल्याला दिली आहे. शिवाय, शेवटल्या काळाविषयी येशूनं दिलेली चिन्हं पूर्ण होत असल्याचंदेखील आपण स्पष्टपणे पाहत आहोत. केवळ ऐकलेल्या गोष्टींवर भरवसा असल्यामुळे अंत जवळ आहे असं आपण म्हणत नाही, तर बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत याची खात्री असल्यामुळे आपण असं म्हणतो. तेव्हा, अंत जवळ येत असताना आपण नेहमी सतर्क आणि जागृत असलं पाहिजे.

आपण किती काळ वाट पाहावी?

१०, ११. (क) येशूनं आपल्या शिष्यांना “जागृत राहा” अशी आज्ञा का दिली? (ख) अंत येण्यास उशीर होत आहे असं वाटत असलं तरी आपण काय केलं पाहिजे असं येशूनं सांगितलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० आपल्यापैकी बरेच जण अनेक वर्षांपासून यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत. त्याचा दिवस येण्याची ते आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण, अंत अजूनही आलेला नाही म्हणून आपला धीर खचू देऊ नका. उलट, तो दिवस लवकरच येईल अशी खात्री बाळगा. येशू लवकरच सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी येईल तेव्हा आपण तयार असलं पाहिजे. येशूनं आपल्या शिष्यांना काय सांगितलं होतं ते आठवा. तो म्हणाला होता, “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणा एका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हाला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हाला झोपा काढत असलेले पाहील. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”—मार्क १३:३३-३७.

११ येशूनं १९१४ पासून राज्य करण्यास सुरवात केली आहे हे जेव्हा त्याच्या शिष्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांना जाणवलं की अंत आता केव्हाही येऊ शकतो. त्यामुळे, त्यांनी जास्तीतजास्त प्रचारकार्य करण्याद्वारे आपण अंतासाठी तयार आहोत हे दाखवलं आहे. येशूनं म्हटलं की तो कदाचित “मध्यरात्रीस कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी” येईल. मग, त्याच्या शिष्यांनी काय करण्याची गरज आहे? येशूनं म्हटलं: “जागृत राहा.” म्हणून, वाट पाहण्यात आता बराच वेळ गेलेला आहे असं आपल्याला वाटत असलं, तरी अंत अजूनही खूप लांब आहे किंवा आपल्या जीवनकाळात येणारच नाही असा विचार करणं निश्‍चितच योग्य ठरणार नाही.

१२. हबक्कूकनं यहोवाला काय विचारलं आणि त्याला काय उत्तर मिळालं?

१२ जेरुसलेमच्या नाशाविषयी घोषणा करताना हबक्कूक संदेष्ट्यानं धीरानं वाट पाहिली. त्याच्याआधीही इतर संदेष्ट्यांनी अनेक वर्षांपर्यंत विनाशाचा संदेश घोषित केला होता. पण, पूर्वी कधी नव्हती इतकी दुष्टता आणि अन्याय वाढला असल्याचं त्यानं पाहिलं. म्हणून त्यानं यहोवाकडे मदतीची याचना केली आणि विचारलं, “हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू?” विनाश केव्हा येईल हे यहोवानं हबक्कूकला सांगितलं नाही, पण त्यानं असं अभिवचन दिलं की “त्याला, विलंब लागावयाचा नाही.” यहोवानं त्याला असंही सांगितलं की “त्याची वाट पाहा.”—हबक्कूक १:१-४; २:३ वाचा.

१३. हबक्कूक कोणता चुकीचा विचार करू शकला असता, आणि त्याचा काय परिणाम झाला असता?

१३ पण, समजा अशा वेळी हबक्कूक निराश झाला असता आणि त्यानं असा विचार केला असता, की ‘जेरुसलेमच्या नाशाची मी कितीतरी वर्षांपासून वाट पाहतोय. आतापर्यंत तर तो आला नाही आणि लवकर येईल असंही काही वाटत नाही. मग मी कशासाठी त्याबद्दल लोकांना सांगत राहू? बाकीचे लोक आहेत ना ते काम करायला!’ त्यानं असा विचार केला असता तर काय झालं असतं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे यहोवासोबतचं त्याचं नातं तुटलं असतं. शिवाय, जेरुसलेमच्या नाशात त्याचाही जीव गेला असता.

१४. यहोवा आपल्याला वाट पाहत राहण्याचं उत्तेजन देत राहिला यासाठी आपण त्याचे कृतज्ञ का असू?

१४ कल्पना करा की तुम्ही नवीन जगात पोचला आहात. शेवटल्या दिवसांबद्दल यहोवानं ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्या अगदी तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत. यहोवावरील तुमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. आणि तो त्याची इतरही अभिवचनं पूर्ण करेल याची तुम्हाला पक्की खात्री पटली आहे. (यहोशवा २३:१४ वाचा.) यहोवा आपल्याला वाट पाहत राहण्याचं उत्तेजन देत राहिला आणि अगदी योग्य वेळी त्यानं अंत आणला म्हणून आपण त्याचे खरंच खूप कृतज्ञ असू.—प्रे. कृत्ये १:७; १ पेत्र ४:७.

वाट पाहत असताना सेवाकार्यात व्यस्त राहा

तुम्ही आवेशानं सुवार्ता सांगत आहात का? (परिच्छेद १५ पाहा)

१५, १६. अंत जवळ असताना प्रचारकार्यात जास्तीतजास्त मेहनत घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे?

१५ आपण नेहमी यहोवाच्या सेवेवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे याची आठवण यहोवाची संघटना आपल्याला वारंवार देत राहील. यामुळे, देवाच्या सेवेत व्यस्त राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. शिवाय, अंत जवळ असल्यामुळे लोकांना राज्याचा संदेश सांगणं किती निकडीचं आहे हेदेखील आपल्याला स्पष्टपणे समजेल. येशूनं दिलेली चिन्हं आपल्या काळात पूर्ण होत आहेत याची आपल्याला खात्री आहे आणि अंत लवकरच येणार आहे हेदेखील आपण ओळखून आहोत. त्यामुळेच, आपण यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात अगदी महत्त्वाचं स्थान देतो आणि त्याच्या राज्याविषयी सुवार्ता सांगत राहतो.—मत्त. ६:३३; मार्क १३:१०.

१६ इतरांना सुवार्ता सांगण्याद्वारे आपण त्यांना सैतानाच्या जगाच्या नाशातून स्वतःचा बचाव करण्यासाठी मदत करत असतो. १९४५ साली वेल्हेम गस्टलोफ नावाचं एक मोठं जहाज पाण्यात बुडालं. समुद्रात घडलेल्या सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी ही एक दुर्घटना होती. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून आपल्या एका बहिणीचा आणि तिच्या पतीचा बचाव झाला. तिला अजूनही आठवतं की जहाज बुडताना एक स्त्री अशी ओरडत होती: “माझी सूटकेस! माझे दागिने! खालच्या कॅबीनमध्ये आहेत. गेलं, संपलं सगळं!” पण, इतर प्रवाशांनी मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट ओळखली, ती म्हणजे लोकांचा जीव. त्यामुळे लोकांना वाचवण्यासाठी ते धडपड करू लागले. आजदेखील लोकांचा जीव धोक्यात आहे. आपणही स्वतःचं हित न पाहणाऱ्या त्या प्रवाशांसारखं असलं पाहिजे. प्रचारकार्याचं महत्त्वं ओळखून त्यावर आपलं लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे. लोकांना या दुष्ट जगाच्या अंतातून स्वतःचा जीव वाचवता यावा म्हणून, आपल्या परीनं होताहोईल तितकी मदत आपण त्यांना केली पाहिजे.

नेहमी योग्य निर्णय घ्या आणि प्रचारकार्याची निकड लक्षात ठेवा (परिच्छेद १७ पाहा)

१७. अंत खूप जवळ आहे असं आपण का म्हणू शकतो?

१७ बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. त्यामुळे, या दुष्ट जगाचा अंत किती जवळ आहे हे आपण ओळखतो. मोठ्या बाबेलवर, अर्थात खोट्या धर्मावर लाक्षणिक “दहा शिंगे” आणि “श्वापद” हल्ला करतील त्या वेळेची आपण वाट पाहत आहोत. (प्रकटी. १७:१६) पण, हे घडण्यासाठी अजूनही खूप वेळ बाकी आहे असं आपण गृहीत धरू नये. हे लक्षात ठेवा की स्वतः यहोवा त्यांच्या मनात खोट्या धर्मावर हल्ला करण्याची कल्पना घालेल. म्हणून, हे कोणत्याही क्षणी घडू शकतं! (प्रकटी. १७:१७) सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत खूप जवळ आला आहे. त्यामुळे आपण येशूच्या सूचनेचं पालन केलं पाहिजे. त्यानं म्हटलं, “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.” (लूक २१:३४, ३५; प्रकटी. १६:१५) तेव्हा, आपण सर्व जण सतर्क राहून यहोवाच्या सेवेत व्यस्त राहू या. आणि असा भरवसा बाळगू या, की जे यहोवाची “आशेने वाट पाहतात, त्यांच्यासाठी तो कार्य करतो.”—यश. ६४:४, सुबोध भाषांतर.

१८. पुढच्या लेखात कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात येईल?

१८ या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना आपण यहूदानं दिलेल्या सल्ल्याचं पालन करत राहू या. त्यानं म्हटलं, “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहू. २०, २१) पण, देवाचं नवीन जग लवकरच येईल अशी आपल्याला खात्री आहे आणि त्याची आपण वाट पाहत आहोत हे आपण कसं दाखवू शकतो? पुढच्या लेखात आपण याविषयी चर्चा करणार आहोत.

^ परि. 1 बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठ २०० वर मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या आणि त्यांच्या पूर्णतेची सूची देण्यात आली आहे.