व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप आहेत का?

तुमच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप आहेत का?

तुमच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप आहेत का?

क्लार्क्स नटक्रॅकर हा करड्या-पांढऱ्‍या रंगाचा गाणारा पक्षी उत्तर अमेरिकेच्या पश्‍चिमेकडील जंगलांत आढळतो. हा पक्षी दर वर्षी जवळजवळ ३३,००० बी बियाणे गोळा करून २,५०० वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवतो. एवढा खटाटोप कशासाठी? हिवाळ्यात या भागात कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे, उपजतच ‘अत्यंत शहाणा’ असणारा हा पक्षी आधीच ही तरतूद करून ठेवतो.—नीतिसूत्रे ३०:२४.

मानवांजवळ याहीपेक्षा अद्‌भुत अशी एक क्षमता आहे. ही क्षमता म्हणजे, गतकाळातील अनुभवांवरून धडा घेऊन या ज्ञानाच्या साहाय्याने भविष्याकरता योजना करणे. याबाबतीत मानव, यहोवाने निर्मिलेल्या इतर सर्व पशुपक्ष्यांच्या तुलनेत श्रेष्ठ आहे. शलमोन या अत्यंत बुद्धिमान राजाने म्हटल्याप्रमाणे, “मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो.”—नीतिसूत्रे १९:२१, सुबोध भाषांतर.

तरीपण, उद्या काय होईल हे निश्‍चित माहीत नसल्यामुळे मानवांना सहसा भविष्याविषयी काही गोष्टी गृहीत धरूनच योजना आखाव्या लागतात. उदाहरणार्थ, उद्या आपण काय करणार हे ठरवताना, तुम्ही हे गृहीत धरलेले असते की उद्याही सूर्य उगवणार आणि आपण जिवंत असणार. यांपैकी पहिल्या गृहीतकाबद्दल खात्री देता येते, पण दुसरे तितके निश्‍चित नसते. म्हणूनच बायबलचा एक लेखक, याकोब असे म्हणतो: “तुम्हाला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय?”—याकोब ४:१३, १४.

यहोवा देवाला मात्र अशा मर्यादा नाहीत. तो तर “आरंभीच शेवट कळवितो.” त्याने जे ठरवले आहे ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईलच. तो म्हणतो: “माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.” (यशया ४६:१०) पण, मानवाच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप नसतात तेव्हा काय घडते?

देवाच्या संकल्पाच्या अनुरूप नसलेल्या मानवी योजना

जवळजवळ ४,००० वर्षांपूर्वी, मानववंशाने एकाच ठिकाणी वस्ती करावी म्हणून काही लोकांनी बाबेल येथे एक मोठा बुरूज बांधायचे ठरवले. ते म्हणाले, “चला, आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”—उत्पत्ति ११:४.

पण, पृथ्वीसाठी देवाचा संकल्प अगदीच वेगळा होता. त्याने नोहा व त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा केली होती: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति ९:१) तर मग, बाबेल येथे विद्रोह करू पाहणाऱ्‍या त्या लोकांना देवाने काय केले? त्याने त्यांची भाषा अशी गोंधळवून टाकली की त्यांना एकमेकांचे बोलणे समजेनासे झाले. याचा काय परिणाम झाला? “परमेश्‍वराने तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.” (उत्पत्ति ११:५-८) अशा रीतीने, बाबेलच्या त्या लोकांना एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकावा लागला. तो म्हणजे, मानवाच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप नसतात तेव्हा “यहोवाचा जो संकल्प तोच ठरेल.” (नीतिसूत्रे १९:२१, पं.र.भा.) गतकाळातील घटनांवरून शिकता येण्यासारख्या अशा धड्यांचा तुम्ही आपल्या जीवनावर प्रभाव पडू देता का?

एका धनवान माणसाने केलेली चूक

आज कदाचित कोणी बुरूज बांधण्याची योजना करणार नाही. पण, बरेच जण बँकेत भरपूर पैसा साठवण्याची किंवा मालमत्ता गोळा करण्याची योजना करतात. निवृत्त झाल्यावर आरामशीर राहता यावे हा यामागचा हेतू असतो. अर्थात, आपल्या मेहनतीचे फळ उपभोगण्याची इच्छा असणे अगदी स्वाभाविक आहे. शलमोनाने लिहिले, “प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१३.

पण या देणगीचा आपण कशा प्रकारे वापर करतो, याबद्दल आपल्याला देवाला जाब द्यावा लागेल. सुमारे २,००० वर्षांपूर्वी येशूने आपल्या शिष्यांना हाच मुद्दा समजावण्यासाठी एक दृष्टान्त दिला होता. तो म्हणाला: “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्‍न साठवावयास मला जागा नाही.’ मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन: मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, “हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.”’” (लूक १२:१६-१९) या धनवान मनुष्याची योजना तशी योग्यच वाटते, नाही का? याआधी उल्लेख केलेल्या क्लार्क्स नटक्रॅकर या पक्षाप्रमाणे हा मनुष्यही आपल्या भविष्यासाठीच तरतूद करत होता असे वाटते.

पण या मनुष्याच्या विचारसरणीत खोट होती. येशू पुढे म्हणाला: “परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल?’” (लूक १२:२०) मनुष्याने उद्योग करून सुख मिळवावे ही देवाची देणगी आहे असे जे शलमोनाने म्हटले होते, त्याचे येशू येथे खंडन करत होता का? नाही. मग येशू काय सांगण्याचा प्रयत्न करत होता? येशूने म्हटले: “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”—लूक १२:२१.

यहोवाची अशी इच्छा आहे की आपण त्याला विचारात घेऊनच कोणत्याही योजना कराव्यात. येशू आपल्या श्रोत्यांना हेच सांगू इच्छित होता. दृष्टान्तातील धनवान मनुष्य सुभक्‍ती, सुबुद्धी व प्रीती यांसारखे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे देवाच्या दृष्टीने धनवान होऊ शकला असता. पण त्याच्या शब्दांतून अशा गोष्टींबद्दल त्याला आस्था असल्याचे मुळीच दिसून येत नाही. कापणीच्या वेळी आपल्या पिकातील काही पीक गरीब लोकांसाठी मागे ठेवण्याची किंवा यहोवाला अर्पण करण्याची इच्छा तो एकदाही व्यक्‍त करत नाही. देवाच्या इच्छेच्या अनुरूप असणाऱ्‍या या कार्यांना त्याच्या जीवनात मुळीच स्थान नव्हते. त्याच्या योजना त्याच्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा व सोयी-सवलतींवरच पूर्णपणे केंद्रित होत्या.

आजही बहुतेक लोकांच्या जीवनातील ध्येये येशूच्या दृष्टान्तातील त्या धनवान मनुष्यासारखीच आहेत हे तुमच्या पाहण्यात आले आहे का? भौतिकवादी विचारसरणीला बळी पडून व दैनंदिन गरजा व इच्छांना प्राधान्य देऊन आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातूनही सहज घडू शकते, मग आपण श्रीमंत असो वा गरीब. पण असे घडू नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

“सर्वसामान्य” जीवन जगणे

येशूच्या दृष्टान्तातील धनवान मनुष्याच्या अगदी उलट, तुम्ही कदाचित आर्थिक अडचणींना तोंड देत असाल. अशा परिस्थितीतही, विवाहित असल्यास तुम्ही आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मुलांना चांगले मूलभूत शिक्षण देण्यासाठी आवश्‍यक योजना करतच असाल. किंवा अविवाहित असल्यास, आपले कोणावर ओझे होऊ नये म्हणून तुम्ही नोकरी मिळवण्याचा किंवा आहे ती नोकरी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल. ही सर्व ध्येये निश्‍चितच उचित आहेत.—२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२; १ तीमथ्य ५:८.

तरीसुद्धा, नोकरी-धंदा करणे, खाणे-पिणे किंवा दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, सर्वसामान्य जीवन जगणे हे देखील एका व्यक्‍तीला देवाच्या इच्छेविरुद्ध वागायला लावू शकते. ते कसे? येशूने म्हटले: “नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही [“त्यांनी दुर्लक्ष केले,” NW]; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”—मत्तय २४:३७-३९.

जलप्रलयाआधी बहुतेक लोक सर्वसामान्य जीवन जगत होते. निदान त्यांच्या मते तरी, ते जीवन सर्वसामान्य होते. पण त्यांचा खरा दोष हा होता, की त्या काळच्या दुष्ट जगाचा जलप्रलयाद्वारे नाश करण्याचा देवाचा जो संकल्प होता, त्याकडे त्यांनी “दुर्लक्ष केले.” त्यांना तर उलट नोहाचीच जीवनशैली विचित्र वाटली असावी. पण जलप्रलय आला तेव्हा मात्र, नोहा व त्याच्या कुटुंबाचीच जीवनशैली योग्य होती हे सिद्ध झाले.

आज, उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांवरून हेच सिद्ध होते की आपण शेवटल्या काळात राहात आहोत. (मत्तय २४:३-१२; २ तीमथ्य ३:१-५) लवकरच, देवाचे राज्य सध्याच्या जगास ‘चूर्ण करून त्यास नष्ट करील.’ (दानीएल २:४४) ते राज्य या पृथ्वीला एक नंदनवन बनवेल. रोगराई व मृत्यू राहणार नाही. (यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:३-५) पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी शांती सलोख्याने राहतील व कोणीही उपाशी राहणार नाही.—स्तोत्र ७२:१६; यशया ११:६-९.

पण ही कारवाई करण्याअगोदर, यहोवाचा असा संकल्प आहे की त्याच्या राज्याची सुवार्ता ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून सर्व जगात गाजविली जावी.’ (मत्तय २४:१४) देवाच्या या संकल्पानुसार, आज जवळजवळ सत्तर लाख यहोवाचे साक्षीदार २३६ देशांत व चारशे पेक्षा जास्त भाषांतून या सुवार्तेची घोषणा करत आहेत.

जगातील लोकांना कदाचित यहोवाच्या साक्षीदारांची जगण्याची पद्धत काहीशी विचित्र, किंवा हास्यास्पदही वाटत असेल. (२ पेत्र ३:३, ४) जलप्रलयाआधीच्या लोकांप्रमाणेच आजही बहुतेक लोक दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकलेले आहेत. जे समाजाच्या दृष्टीने सर्वसामान्य असलेली जीवनशैली स्वीकारत नाहीत त्यांना वेड्यांत काढले जाण्याची शक्यता आहे. पण देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांच्या दृष्टिकोनातून, त्याच्या सेवेला आपल्या जीवनात प्राधान्य देण्यातच शहाणपण आहे.

म्हणूनच, तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा वा मध्यमवर्गीय, भविष्याकरता तुमच्या योजना वेळोवेळी पडताळून पाहणे सुज्ञपणाचे ठरेल. आणि असे करताना स्वतःला हा प्रश्‍न विचारा, ‘माझ्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप आहेत का?’ (w०८ ७/१)

[९ पानांवरील चित्र]

मानवाच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप नसतात तेव्हा यहोवाचा संकल्पच स्थिर राहतो

[१० पानांवरील चित्र]

येशूच्या दृष्टान्तातील धनवान मनुष्याने योजना करताना देवाचा संकल्प विचारात घेतला नाही