व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पुढील परिणामाचा” विचार करा

“पुढील परिणामाचा” विचार करा

“पुढील परिणामाचा” विचार करा

जीवनाच्या प्रवासात आपल्याला अनेक लहान-मोठ्या, महत्त्वाच्या-बिनमहत्त्वाच्या निवडी कराव्या लागतात. कोणत्याही रस्त्यावर चालायला सुरुवात करण्याआधी तो रस्ता नेमका कोठे जातो हे आपण शोधून काढणे अतिशय महत्त्वाचे आहे. काहींना जीवनात घेतलेल्या निर्णयांचा आता भयंकर पस्तावा होत आहे. कदाचित तुमच्याही बाबतीत असे घडले असावे. आणि आता तुम्ही म्हणत असाल, ‘हा रस्ता नेमका कुठं जातो हे जर मला आधीच माहीत असतं तर मी या रस्त्यावर पहिली गोष्ट म्हणजे आलोच नसतो.’

अनुभवी प्रवासी प्रत्येक रस्त्याची माहिती काढतो. तो कदाचित एखाद्या नकाशाचा उपयोग करील किंवा त्या भागात राहणाऱ्‍या लोकांना विचारपूस करेल. रस्त्यावर लावलेल्या दिशाफलकांकडे तो नक्कीच लक्ष देईल. पण, जीवनाचा प्रवास करताना, कोणता उत्तम रस्ता धरायचा हे आपल्याला कसे समजू शकेल? प्राचीन इस्राएल लोकांविषयी देवाने एकदा मोशेद्वारे असे म्हटले: “ते ज्ञानी असते, ते हे समजले असते, त्यांनी आपल्या पुढील परिणामाचा विचार केला असता तर किती बरे होते!”—अनुवाद ३२:२९, पं.र.भा.

सर्वोत्कृष्ट सल्ला

जीवनाच्या प्रवासासाठी आपण ज्या रस्त्यावर वाटचाल सुरू केली आहे त्याचा ‘पुढील परिणाम’ काय असेल याबद्दल आपण साशंक असण्याची गरज नाही. कोणता चांगला रस्ता आपण धरला पाहिजे याविषयी सर्व मानवी वाटसरूंना देवाशिवाय आणखी कोण उत्तम सल्ला देऊ शकेल? मानवाने कोणकोणत्या मार्गांनी जीवन प्रवास केला आहे अर्थात त्याने कोणकोणते निर्णय घेतले आहेत आणि त्यांचे परिणाम काय झाले आहेत हे त्याने पाहिले आहे. बायबल म्हणते: “मनुष्याचे मार्ग परमेश्‍वराच्या दृष्टीसमोर आहेत, आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करितो.”—नीतिसूत्रे ५:२१.

यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांची तो काळजी घेतो. त्याचे वचन बायबल याद्वारे तो, सर्वात उत्तम असलेल्या कोणत्या रस्त्यावर ते वाटचाल करू शकतात हे सांगतो. त्याविषयी असे म्हटले आहे: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” तेव्हा, कोणत्याही रस्त्यावर चालण्यास सुरू करण्याआधी प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने केले त्याप्रमाणे आपण यहोवाचा सल्ला विचारात घेतला पाहिजे. दाविदाने देवाला अशी प्रार्थना केली होती: “ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव.”—स्तोत्र ३२:८; १४३:८.

एका भरवशाच्या, अनुभवी वाटसरूने दाखवलेला मार्ग जर आपण धरला तर, आपल्याठायी आत्मविश्‍वास येईल व आपल्याला सुरक्षित वाटेल. तेव्हा आपण, हा मार्ग नेमका कोठे जातोय, याची काळजी करणार नाही. दाविदाने यहोवाचा सल्ला व मार्गदर्शन विचारले आणि त्यानुसार तो वागला. यामुळे, त्याला मनःशांती लाभली. याबद्दलचे सुरेख वर्णन २३ व्या स्तोत्रात दिले आहे. दावीद तेथे म्हणतो: “परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करितो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो. मृत्युच्छायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात.”—स्तोत्र २३:१-४.

दुष्टांचे भवितव्य काय आहे?

जीवनाच्या प्रवासाला निघालेला आणखी एक वाटसरू, जो कदाचित स्तोत्रकर्ता आसाफ किंवा त्याचा एखादा वंशज असावा, त्याने कबूल केले की तो योग्य मार्गावर चालत असताना, अर्थात देवाची सेवा करताना ‘त्याचे पाय लटपटण्याच्या लागास आले होते’ अर्थात तो भटकता भटकता वाचला होता. काय झाले होते? बेईमान व हिंसक लोक धनसंपत्तीत ऐष करत असल्याचे त्याने पाहिले होते व “दुर्जनांचा उत्कर्ष पाहून” तो त्यांचा हेवा करू लागला होता. त्याच्या मते हे लोक “सर्वदा स्वस्थ” होते. इतकेच नव्हे तर स्तोत्रकर्त्याला, आपण निवडलेला धार्मिकतेचा मार्ग बरोबर आहे का, असाही संशय वाटू लागला होता.—स्तोत्र ७३:२, ३, ६, १२, १३.

मग एके दिवशी हा स्तोत्रकर्ता यहोवाच्या पवित्रस्थानात गेला आणि दुष्ट लोकांच्या भवितव्याचा विचार करू लागला. त्याने म्हटले, की मी “त्या लोकांचा शेवट मनात आणिला.” त्याला ज्या लोकांचा हेवा वाटत होता त्या दुष्ट लोकांचे भवितव्य काय आहे यावर त्याने विचार केला. तेव्हा त्याला जाणवले, की हे लोक तर “निसरड्या जागांवर उभे” होते व ‘एका क्षणात त्यांची धूळधाण’ होणार होती. आणि स्तोत्रकर्त्याने जी वाट धरली होती ती कोठे जात होती? तो स्वतःच कबूल करतो: “तू [यहोवा] . . . गौरवाने माझा स्वीकार करिशील.”—स्तोत्र ७३:१७-१९, २४.

या नाही तर त्या मार्गाने किंवा काळे धंदे करून पैसा कमावणाऱ्‍यांच्या भवितव्याचा विचार केल्यामुळे, स्तोत्रकर्त्याच्या मनातील घालमेल दूर झाली. आपण उचित मार्गावर आहोत, असे त्याला जाणवले. त्याने शेवटी म्हटले: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.”—स्तोत्र ७३:२८.

तुम्ही कोठे चालला आहात त्याचे भान ठेवा

आपल्याला देखील कदाचित अशाच निवडी कराव्या लागतील. तुम्हाला कदाचित, एका आकर्षक बिझनेस कॉन्ट्रॅक्टची, प्रमोशनची किंवा बक्कळ पैसा कमवून देणाऱ्‍या उद्योगात पार्टनर बनण्याची ऑफर दिली जाईल. अर्थात, कोणत्याही नवीन कारभारात धोके तर असतातच. तेव्हा, ‘पुढील परिणामांचा’ विचार करण्यातच विवेकीपणा आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे कोणते काही परिणाम होऊ शकतात? तुम्ही स्वीकारलेल्या कामामुळे तुम्हाला घरापासून दूर राहावे लागेल का आणि परिणामतः तुमच्यावर किंवा तुमच्या विवाहसोबत्यावर ताण येईल का? तुम्हाला बिझनेसमधल्या किंवा हॉटेलमधल्या अथवा इतर ठिकाणी जगिक लोकांबरोबर जास्त वेळ घालवावा लागेल का? रस्ता पुढे कसा आहे याचे अर्थात संभाव्य परिणामांचे काळजीपूर्वक परीक्षण केल्याने तुम्हाला सुज्ञ निर्णय घेता येईल. शलमोनाने दिलेल्या ताकीदीकडे लक्ष द्या: “तुम्ही कोठे चालला आहात त्याचे भान ठेवा.”—नीतिसूत्रे ४:२६, NW.

या सल्ल्याकडे आपण सर्वांनीच पण विशेषतः तरुणांनी लक्ष दिले पाहिजे. एका तरुणाने कामोत्तेजक दृश्‍ये असलेला एक व्हिडिओ भाड्याने आणला. त्याने नंतर सांगितले, की हा व्हिडिओ पाहिल्यावर तो इतका उत्तेजित झाला की तो, जवळच राहते म्हणून माहीत असलेल्या एका वेश्‍येकडे गेला. पण शुद्धीवर आल्यावर मात्र त्याचे अंतःकरण दोषीभावनेने दबून गेले, त्याचा विवेक त्याला सतत बोचू लागला. इतकेच नव्हे तर आपल्याला एखादा गुप्तरोग होतोय की काय म्हणूनही त्याला धास्ती लागली. या तरुणाच्या बाबतीत जे काही घडले अगदी तसेच वर्णन बायबलमध्ये करण्यात आले आहे: “तो तत्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो.” त्याने ‘पुढील परिणामांचा’ आधीच विचार केला असता तर किती बरे झाले असते!—नीतिसूत्रे ७:२२, २३.

मार्गावरील दिशाफलकांवर भरवसा ठेवा

मार्गावरील दिशाफलकांकडे दुर्लक्ष करणे उचित नाही हे तर कोणीही मान्य करेल. परंतु, जीवनाच्या रस्त्यावर वाटचाल करणारे काही लोक हीच चूक करतात. दिलेला सल्ला त्यांच्या आवडीचा नसला की ते चक्क त्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. यिर्मयाच्या काळातील काही इस्राएली लोकांचे उदाहरण घ्या. इस्राएल राष्ट्राची द्विधा मनःस्थिती झाल्यामुळे यहोवा देवाने त्यांना असा सल्ला दिला: “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला.” पण इस्राएल लोकांनी, “आम्ही चालणार नाही,” असे उद्दामपणे म्हटले. (यिर्मया ६:१६) त्यांच्या या हेकेखोर वृत्तीचा ‘पुढील परिणाम’ काय झाला? सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोन्यांनी जेरुसलेम शहराचा पूर्णपणे विध्वंस केला आणि त्यातील रहिवाशांना बंदिवान म्हणून बॅबिलोनला पकडून नेले.

देवाने ठरवून दिलेल्या दिशाफलकांकडे दुर्लक्ष केल्यास आपले भले कधीच होणार नाही. शास्त्रवचने आपल्याला असा आग्रह करतात: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.

देव देत असलेल्या चिथावण्या, “आत येण्यास मनाई आहे” यासारख्या सूचना फलकांसारख्या आहेत. जसे की, बायबल म्हणते: “दुर्जनांच्या मार्गांत शिरू नको; [मनाई आहे] दुष्टांच्या मार्गाने चालू नको.” (नीतिसूत्रे ४:१४) मनाई केलेल्या मार्गांपैकी एका मार्गाचे वर्णन नीतिसूत्रे ५:३, ४ मध्ये केले आहे: “परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते.” काहींना, अनैतिक संबंध, मग तो एखाद्या वेश्‍येसोबत असो अथवा इतर कोणासोबतही असो, आकर्षक असल्याचे वाटेल. पण, नैतिक आचरणावर नियंत्रण ठेवणाऱ्‍या “मनाई आहे” यासारख्या फलकांकडे दुर्लक्ष केल्याने विनाश हा ठरलेलाच आहे.

तेव्हा, अशा अनैतिक मार्गावर पहिले पाऊल टाकण्याआधी स्वतःला विचारा: ‘हा रस्ता मला कुठं घेऊन जाईल?’ थोडे थांबून तुम्ही ‘पुढील परिणामांचा’ नुसता विचार जरी केला तरी, तुम्ही गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्‍या मार्गावर पाऊल टाकणार नाही. जे या दिशाफलकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात त्यांना, एड्‌स, गुप्तरोग, नको असलेले गर्भारपण, गर्भपात, बिघडलेला नातेसंबंध, दोषी विवेक, या सर्व गोष्टी भोगाव्या लागतात. अनैतिक मार्गावर चालणाऱ्‍यांचे काय होईल त्याविषयी प्रेषित पौलाने स्पष्टपणे असे म्हटले: “ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—१ करिंथकर ६:९, १०.

“हाच मार्ग आहे”

कधीकधी मात्र, अमुक एखादा मार्ग नेमका कोठे जातो हे आपल्याला दिसत नाही अर्थात आपण घेतलेल्या निर्णयांचा परिणाम काय होईल, हे आपल्याला समजत नाही. म्हणूनच, देवाच्या प्रेमळ काळजीबद्दल व त्याच्या स्पष्ट मार्गदर्शनाबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! यहोवाने म्हटले: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यशया ३०:२१) यहोवा दाखवत असलेला मार्ग कोठे जातो बरे? हा मार्ग संकोचित व कठीण असला तरी, तो सार्वकालिक जीवनाकडे जातो, असे येशूने म्हटले.—मत्तय ७:१४.

तुम्ही जो मार्ग धरला आहे त्याविषयी थोडे थांबून विचार करा. हा मार्ग उचित आहे का? तो नेमका कोठे चालला आहे? प्रार्थनेद्वारे यहोवाकडे मार्गदर्शन मागा. ‘रस्त्याच्या नकाशाचा’ अर्थात बायबलचा उपयोग करा. तुम्हाला कदाचित अनेक वर्षांपासून देवाच्या मार्गावर चालणाऱ्‍या एखाद्या अनुभवी वाटसरूचा सल्ला घ्यावासा वाटेल. सल्ला विचारल्यावर, आपण दिशा बदलली पाहिजे, असे जर तुम्हाला जाणवले तर त्वरित कार्य करा.

एखाद्या प्रवाशाला जेव्हा मार्गावरील दिशाफलकावरून, तो योग्य मार्गाने चालला आहे याची खात्री मिळते तेव्हा तो पुढे जाण्यास धजतो. तुमच्या जीवन मार्गाचे परीक्षण केल्यावर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही धार्मिक मार्गाने चालला आहात तर असेच पुढे चालत राहा. कारण सर्वात आनंददायी प्रतिफळ तर मार्गाच्या शेवटीच आहे.—२ पेत्र ३:१३.

प्रत्येक मार्ग अथवा रस्ता कोठे न कोठे तरी जातो. निवडलेल्या मार्गाच्या शेवटी जेव्हा तुम्ही पोचता, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? तिथे पोचल्यावर, “अरेरे, मी ह्‍या मार्गाऐवजी दुसरा मार्ग निवडला असता तर किती बरे झाले असते,” असे तेव्हा म्हणून काही उपयोग होणार नाही. यास्तव, जीवनाच्या रस्त्यावर पुढचे पाऊल टाकण्याआधी अर्थात जीवनात कोणताही निर्णय घेण्याआधी, “मी घेतलेल्या निर्णयाचा ‘पुढील परिणाम’ काय होईल,” हा प्रश्‍न स्वतःला विचारायला विसरू नका. (w०८ ९/१)

[३० पानांवरील चौकट/चित्रे]

‘पुढील परिणाम’ काय असेल?

तरुणांसमोर अनेक मोह येतात. इतर तरुण सर्रासपणे करत असलेल्या गोष्टी अजमावून पाहण्याचे त्यांच्यावर अनेक दबाव येतात. पुढे याची काही उदाहरणे दिली आहेत.

कोणीएक तुम्हाला सिगारेट ओढण्याचे आव्हान देतो.

◼ एक सदिच्छा बाळगणारा शिक्षक तुम्हाला विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याचे उत्तेजन देतो.

◼ तुम्हाला एका पार्टीला बोलवले जाते जिथे मादक पेये व कदाचित अमली पदार्थ खुल्लमखुल्ला मिळतील.

◼ कोणीतरी तुम्हाला म्हणेल, ‘इंटरनेटवर तू तुझा प्रोफाईल पोस्ट का करत नाहीस?’

◼ एखादी मैत्रीण तुम्हाला तिच्याबरोबर हिंसक किंवा अनैतिक दृश्‍ये असलेला एखादा चित्रपट पाहण्यास बोलवेल.

वर उल्लेख केलेल्या कोणत्याही परिस्थितींपैकी एखादी परिस्थिती तुमच्यासमोर आल्यास तुम्ही काय कराल? या मोहांना बळी पडाल, की ‘पुढील परिणाम’ काय होतील याचा काळजीपूर्वक विचार कराल? “मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखाऱ्‍यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय?” असे स्वतःला विचारून आपण विवेकीपणा दाखवू.—नीतिसूत्रे ६:२७, २८.