व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे न्यायदंड—ते क्रूर होते का?

देवाचे न्यायदंड—ते क्रूर होते का?

या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी देवाने दिलेल्या न्यायदंडाची दोन उदाहरणे आपण बायबलमधून पाहू या. पहिले, नोहाच्या काळातील जलप्रलय आणि दुसरे, कनानी लोकांचे समूळ उच्चाटन.

नोहाच्या काळातील जलप्रलय

लोक काय म्हणतात? “देवानं एक जलप्रलय आणून सर्व मानवजातीचा नाश केला आणि फक्‍त नोहा व त्याच्या कुटुंबाचा बचाव केला, त्याअर्थी तो क्रूर आहे.”

बायबल काय म्हणते? देवाने म्हटले: “कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे.” (यहेज्केल ३३:११) यावरून कळते की नोहाच्या काळातील दुष्ट लोकांचा नाश करण्यात देवाला मुळीच आनंद झाला नाही. पण मग त्याने असे का केले?

बायबल म्हणते की प्राचीन काळी देवाने अधर्मी लोकांवर अशा प्रकारचा न्यायदंड बजावला तेव्हा देवाने “पुढे होणाऱ्‍या अभक्‍तांस उदाहरण देण्यासाठी” असे केले. (२ पेत्र २:५, ६) देवाने ज्या पद्धतीने न्यायदंड बजावले त्यावरून आपण काय शिकतो?

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, लोकांचा नाश करण्यात यहोवाला आनंद होत नसला, तरी निर्दयी लोकांच्या वाईट कृत्यांची तो दखल घेतो व त्यांना शिक्षा देतो. पण यहोवा लवकरच सर्व अन्यायांचा व दुःखांचा अंत करेल.

दुसरी गोष्ट म्हणजे, देवाने प्राचीन काळी ज्या प्रकारे कार्य केले त्यावरून दिसते की न्यायदंड बजावण्याआधी तो लोकांना प्रेमळपणे ताकीद देतो. नोहा धार्मिकतेचा प्रचारक होता पण बऱ्‍याच लोकांनी त्याचे ऐकले नाही. बायबल म्हणते: “जलप्रलय प्रत्यक्ष येईपर्यंत लोकांनी विश्‍वास ठेवला नाही. मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली.”—मत्तय २४: ३९, सुबोधभाषांतर.

पुढेही देवाने न्यायदंड बजावताना हीच पद्धत अनुसरली का? होय. उदाहरणार्थ, त्याने इस्राएली लोकांना हा इशारा दिला, की जर इतर राष्ट्रांप्रमाणे त्यांनी दुष्ट कार्ये केली तर तो त्यांच्या शत्रूंना त्यांच्यावर हल्ला करण्यास, त्यांची राजधानी जेरुसलेमचा नाश करण्यास आणि त्यांना बंदी बनवून नेण्यास अनुमती देईल. पण तरी इस्राएली लोक दुष्टाईच्या मार्गाला लागले, इतकेच काय तर ते मुलांचे बलिदानही देऊ लागले. यहोवाने त्यांच्यावर न्यायदंड बजावला का? होय, पण न्यायदंड बजावण्याआधी यहोवाने बऱ्‍याच वेळा संदेष्ट्यांना पाठवून इस्राएली लोकांनी वाईट मार्गापासून दूर व्हावे म्हणून त्यांना इशारा दिला. तो असेही म्हणाला: “प्रभु परमेश्‍वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.”—आमोस ३:७.

तुमचा काय फायदा होणार आहे? यहोवाने प्राचीन काळी ज्या पद्धतीने न्यायदंड बजावले त्यावरून आपल्याला आशा मिळते. निर्दयीपणे वागणाऱ्‍या लोकांचा नाश केला जाईल याची खातरी आपण बाळगू शकतो. बायबल म्हणते: “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:९-११) मानवजातीला सर्व दुःखांपासून सुटका करणाऱ्‍या अशा न्यायदंडाबद्दल तुम्हाला काय वाटते? असा न्यायदंड देणारी व्यक्‍ती निर्दयी आहे की प्रेमळ?

कनानी लोकांचे समूळ उच्चाटन

लोक काय म्हणतात? “कनानी लोकांचा नाश इतका क्रूर होता की त्याची तुलना आजच्या जातिसंहारांशी करता येईल.”

बायबल काय म्हणते? “त्याचे [देवाचे] सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) देवाच्या न्यायाची तुलना मानवी युद्धांशी करणे योग्य नाही. असे का? कारण देव मानवांसारखा नाही. तो आपले मन वाचू शकतो म्हणजे आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे तो चांगले ओळखतो.

उदाहरणार्थ, देवाने सदोम व गमोरा या शहरांचा न्याय केला आणि त्या शहरांचा नाश करण्यास ठरवले तेव्हा विश्‍वासू पुरुष अब्राहामाला देवाचा निर्णय योग्य आहे की नाही याची खातरी करून घ्यायची होती. त्याचा न्यायी देव “दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार” करेल या गोष्टीचा तो विचारसुद्धा करू शकत नव्हता. पण देवाने त्याला प्रेमळपणे असे आश्‍वासन दिले की सदोम शहरांत त्याला दहा नीतिमान लोक जरी सापडले तरी त्यांच्या चांगुलपणामुळे तो त्या शहराचा नाश करणार नाही. (उत्पत्ति १८:२०-३३) तर मग स्पष्टच आहे की देवाने त्या लोकांचे हृदय चाळून पाहिले आणि त्यांच्या वाईट कृत्यांची दखल घेतली.—१ इतिहास २८:९.

त्याचप्रमाणे, कनानी लोक दुष्ट कृत्ये करत असल्याचे देवाने पाहिले आणि त्याने त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. कनानी लोक त्यांच्या निर्दयीपणासाठी नावाजलेले होते. ते लहान मुलांना आगीत अर्पण करायचे. * (२ राजे १६:३) यहोवाने इस्राएल लोकांना संपूर्ण प्रदेशावर कब्जा करण्याची आज्ञा दिली होती हे कनानी लोकांना चांगल्या प्रकारे माहीत होते. तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याचा त्याने जबरदस्त पुरावा दिला होता. पण जे लोक कनान देश सोडून जाण्यास तयार नव्हते, इतकेच नव्हे तर इस्राएल लोकांविरुद्ध युद्ध करायलाही तयार झाले ते जाणूनबुजून फक्‍त इस्राएलांविरुद्धच नव्हे तर यहोवाविरुद्धही उभे राहिले.

शिवाय, ज्या कनानी लोकांनी दुष्टाईचा मार्ग सोडला आणि यहोवाचे उच्च नैतिक स्तर स्वीकारले त्यांचा यहोवाने नाश केला नाही. उदाहरणार्थ, कनानी राहाब जी एक वेश्‍या होती, तिचा व तिच्या कुटुंबाचा यहोवाने बचाव केला. तसेच, कनानी शहर गिबोन यातील रहिवाशांनी यहोवाच्या दयेची याचना केली तेव्हा त्यांना व त्यांच्या मुलांना जिवंत ठेवण्यात आले.—यहोशवा ६:२५; ९:३, २४-२६.

तुमचा काय फायदा होणार आहे? कनानी लोकांना देण्यात आलेल्या न्यायदंडावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस” जवळ येत आहे. (२ पेत्र ३:७) आपले जर यहोवावर प्रेम असेल तर तो जेव्हा त्याच्या न्यायी राज्याला नाकारणाऱ्‍या लोकांचा नाश करून सर्व दुःखांचा अंत करेल तेव्हा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

कनानी लोकांचा निर्दयीपणा नावाजलेला होता आणि त्यांनी जाणूनबुजून देवाचा आणि त्याच्या लोकांचा विरोध केला

यहोवा आपल्याला प्रेमळपणे याची आठवण करून देतो की पालक जे निर्णय घेतात त्यांचा प्रभाव त्यांच्या मुलांवर होतो. देवाचे वचन म्हणते: “तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.” (अनुवाद ३०:१९, २०) हे शब्द एका निर्दयी देवाचे आहेत का? की अशा देवाचे आहेत जो लोकांवर प्रेम करतो आणि त्यांनी योग्य निवड करावी अशी अपेक्षा करतो? (w१३-E ०५/०१)

^ पुरातत्त्वशास्त्रज्ञांना असे अवशेष सापडले आहेत ज्यांवरून दिसते की कनानी लोक उपासनेत लहान मुलांचे बळी द्यायचे.