व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवे आकाश व नवी पृथ्वी

नवे आकाश व नवी पृथ्वी

अध्याय ४२

नवे आकाश व नवी पृथ्वी

१. देवदूत, योहानाला हजार वर्षीय राजवटीच्या सुरवातीस पुन्हा एकदा नेतो तेव्हा तो कशाचे वर्णन देतो?

 हा वैभवी दृष्टांत उलगडत असता तो देवदूत योहानाला पुन्हा एकदा हजार वर्षीय राजवटीच्या सुरवातीस नेतो. तो कशाचे वर्णन देतो? “नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रहि राहिला नाही.” (प्रकटीकरण २१:१) चित्तवेधक देखावा दृष्टीक्षेपात येतो!

२. (अ) सा. यु. पू. ५३७ मध्ये पुनर्स्थापित यहूद्यांच्या बाबतीत नवे आकाश व नवी पृथ्वी या यशयाच्या भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली? (ब) यशयाच्या भविष्यवाणीची पुढील पूर्णता होईल हे आम्हास कसे समजते व हे अभिवचन कशा रितीने पूर्ण होते?

योहानाच्या काळाच्या हजारो वर्षांआधी, यहोवाने यशयास म्हटले होते: “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यशया ६५:१७; ६६:२२) पहिल्यांदा ह्‍या भविष्यवाणीची पूर्णता सा. यु. पू ५३७ मध्ये विश्‍वासू यहूदी बाबेली दास्यत्वातून ७० वर्षांनी यरुशलेमेत पुन्हा आले तेव्हा झाली. त्या पुनःस्थापनेत, त्यांनी “नवे आकाश” म्हणजे एका नवीन सरकारी व्यवस्थेखाली एक शुद्ध समाज, “नवी पृथ्वी” बनवली. तथापि, प्रेषित पेत्राने या भविष्यवाणीच्या पुढील पूर्णतेकडे निर्देश करीत म्हटले: “तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) आता योहान दाखवतो की ह्‍या वचनाची पूर्णता प्रभूच्या दिवसात होत आहे. “पहिले आकाश व पहिली पृथ्वी”, सैतान व त्याच्या दुरात्म्यांच्या प्रभावाखाली असलेली सैतानाची संघटित व्यवस्था व तिजवर शासन करणारी सरकारी रचना निघून जाईल. दुष्ट व बंडखोर मानवजातीचा खवळलेला “समुद्र” अस्तित्वात राहणार नाही. त्याच्या ऐवजी देवाचे राज्य, या नव्या सरकाराखाली एक नवी पार्थिव संघटना—“नवे आकाश व नवी पृथ्वी” ही असेल.—पडताळा प्रकटीकरण २०:११.

३. (अ) योहान कशाचे वर्णन देतो व नवे यरुशलेम काय आहे? (ब) नवे यरुशलेम कसे ‘स्वर्गातून उतरते’?

योहान पुढे म्हणतो: “तेव्हा मी पवित्र नगरी, नवी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजविलेली होती.” (प्रकटीकरण २१:२) नवी यरुशलेम ही ख्रिस्ताची वधू, जे मरणापर्यंत विश्‍वासू राहिले व वैभवी येशूसोबत राजे व याजक होण्यास उठविले अशा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी बनली आहे. (प्रकटीकरण ३:१२; २०:६) पार्थिव यरुशलेम हे जसे पुरातन इस्राएलमध्ये शासनाचे केंद्र होते, तसेच नव्या व्यवस्थीकरणाचे सरकार भव्य नवे यरुशलेम व तिचा वर यांनी मिळून बनले आहे. हे नवे आकाश आहे. ती ‘नवरी स्वर्गातून उतरत आहे’ हे अक्षरशः नव्हे तर, तिने पृथ्वीकडे आपले लक्ष वळविले आहे असा याचा अर्थ होतो. कोकऱ्‍याच्या वधूला, संपूर्ण मानवजातीवर एक धार्मिक सरकार चालवण्यात त्याची निष्ठावान सोबतीण व्हावयाचे आहे. खरेच, नव्या पृथ्वीसाठी हा आशीर्वाद आहे!

४. नवीनच स्थापित झालेल्या इस्राएल राष्ट्राला दिले तसे देव आता कोणते अभिवचन देतो?

योहान पुढे असे कळवतो: “आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी: ‘पाहा! देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.’” (प्रकटीकरण २१:३) यहोवाने पूर्वी नव्या इस्राएल राष्ट्रासोबत नियमशास्त्राचा करार केला तेव्हा त्याने असे अभिवचन दिले होते: “मी तुमच्यामध्ये माझी वसति करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल.” (लेवीय २६:११, १२) आणि आता यहोवा विश्‍वासू मानवांना ह्‍याच प्रकारचे अभिवचन देतो. हजार वर्षांच्या न्याय काळात ते त्याचे खास लोक होतील.

५. (अ) हजार वर्षांच्या राजवटीत देव मानवजातीसोबत कशी वस्ती करील? (ब) हजार वर्षांच्या राजवटीनंतर देव मानवजातीत कशी वस्ती करील?

हजार वर्षांच्या राजवटीत, यहोवा देव मानवजातीसोबत त्याचा प्रतिष्ठित पुत्र, येशू ख्रिस्त याच्या प्रतिनिधीत्वाद्वारे तात्पुरत्या व्यवस्थेत “वस्ती” करील. तथापि, हजार वर्षांच्या राजवटीनंतर येशू जेव्हा त्याच्या पित्याला राज्य सोपून देईल, तेव्हा कोणत्याही प्रतिष्ठित प्रतिनिधीची वा मध्यस्थाची गरज भासणार नाही. यहोवा कायम व थेट मार्गाने ‘त्याच्या लोकांबरोबर’ आध्यात्मिकतेत वास करील. (पडताळा योहान ४:२३, २४.) पुनःर्स्थापित मानवजातीसाठी केवढा हा विशेषाधिकार!

६, ७. (अ) कोणत्या भव्य अभिवचनांना योहान प्रकट करतो व त्यांचा उपभोग कोण घेतील? (ब) यशया आध्यात्मिक तसेच भौतिक नंदनवनाचे वर्णन कसे देतो?

योहान आणखी पुढे म्हणतो: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) पुन्हा एकदा, आम्हाला पूर्वीच्या अभिवचनांची आठवण करुन दिली जात आहे. यशया देखील अशा वेळेची वाट पाहत होता जेव्हा मरण व शोक राहणार नाही आणि दुःखाऐवजी अत्यानंद असेल. (यशया २५:८; ३५:१०; ५१:११; ६५:१९) योहान आता पुष्टी देतो की हजार वर्षांच्या न्यायाच्या दिवसात ह्‍या अभिवचनांची मोठ्या आश्‍चर्यकारकपणे पूर्णता होईल. पहिल्यांदा मोठा लोकसमुदाय ह्‍या आशीर्वादांचा आनंद घेईल. “राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा,” त्यांना सांभाळत “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण ७:९, १७) शेवटी जे सर्व पुनरुत्थित होतील व यहोवाच्या तरतुदींवर विश्‍वास ठेवतील ते त्यांच्याबरोबर असतील व आध्यात्मिक तसेच भौतिक नंदनवनाचा आनंद उपभोगतील.

“तेव्हा,” यशया म्हणतो, “अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील.” होय, “तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशया ३५:५, ६) त्या वेळी, सुद्धा, “ते घरे बांधून त्यात राहतील, द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील, ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.” (यशया ६५:२१, २२) यास्तव, त्यांचे पृथ्वीवरुन निर्मूलन होणार नाही.

८. ह्‍या भव्य अभिवचनांविषयी स्वतः यहोवा खात्रीपूर्वक काय म्हणतो?

ह्‍या अभिवचनांवर मनन करत असता आमचे मन भव्य पूर्वदृष्टांताने कसे भरुन जाते! प्रेमळ स्वर्गीय सरकाराखाली विश्‍वासू मानवजातीकरिता उत्कृष्ट योजना राखून ठेवल्या आहेत. ही सर्व अभिवचने खरोखरच पूर्ण होतील का? पात्म बेटावरील कैदेत असलेल्या वृद्ध माणसाचे हे केवळ स्वप्न आहे का? यहोवा स्वतः याचे उत्तर देतो: “तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, ‘पाहा! मी सर्व गोष्टी नवीन करितो.’ तो म्हणाला: ‘लिही; कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.’ तो मला म्हणाला: ‘झाले! मी अल्‌फा व ओमेगा, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे.’”प्रकटीकरण २१:५, ६अ.

९. भविष्यकालीन आशीर्वाद नक्कीच पूर्ण होतील असा दृष्टिकोन आम्ही का बाळगावा?

विश्‍वासू मानवजातीसाठी यहोवा जणू काय हस्ताक्षर करीत किंवा भविष्यकालीन आशीर्वादांची हमी देत आहे. हमी देत असलेल्या अशा व्यक्‍तिस प्रश्‍न करण्याचे कोणाला धैर्य होईल? होय, यहोवाने उद्‌गारलेली अभिवचने इतकी निश्‍चित आहेत की, जणू काय ती आधीच पूर्ण झालीत: “झाले!” यहोवाच “जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्वसमर्थ,” तोच “अल्‌फा व ओमेगा” नव्हे का? (प्रकटीकरण १:८) होय, निश्‍चित तोच आहे! तो स्वतः अशी घोषणा करतो: “मी आदि आहे, मी अंत आहे; मजवेगळा देव नाहीच.” (यशया ४४:६) या कारणामुळे, तो भविष्यवाण्या प्रेरित करु शकतो व तपशीलवारपणे त्यांची पूर्तता करु शकतो. हे किती विश्‍वास दृढ करणारे आहे! यासाठी तो असे अभिवचन देतो: “पाहा! मी सर्व गोष्टी नवीन करितो”! या आश्‍चर्यकारक गोष्टी खऱ्‍याच घडतील का ही शंका बाळगण्याऐवजी, आम्ही स्वत:स याबद्दल विचारले पाहिजे: ‘हे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी व्यक्‍तिगतरित्या काय करावयास हवे?’

तान्हेल्यांला “पाणी”

१०. यहोवा कोणते “पाणी” देतो व ते कशास चित्रित करते?

१० यहोवा स्वतः असे जाहीर करतो: “मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्‍याचे पाणी फुकट देईन.” (प्रकटीकरण २१:६ब) ही तहान भागवायची असेल तर एखाद्याला त्याच्या आध्यात्मिक गरजांविषयी जागृत असले पाहिजे व यहोवाने पुरविलेल्या ‘जलाशयाचा’ स्वीकार करण्यास हवा. (यशया ५५:१; मत्तय ५:३) हे कोणते “पाणी” आहे? शोमरोनात एका विहिरीजवळ येशूने एका स्त्रीला साक्ष देताना या प्रश्‍नाचे उत्तर दिले. त्याने तिला म्हटले: “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” ते ‘जीवनाच्या झऱ्‍याचे पाणी’, मानवजातीला परिपूर्ण जीवनाकडे निरविण्याची देवाकडील योजना येशूद्वारे वाहत आहे. त्या शोमरोनी स्त्रीप्रमाणेच, त्या झऱ्‍याचे पाणी भरपूर पिण्यास आम्ही किती उत्सुक असले पाहिजे! आणि तिच्यासारखेच, आपल्या ऐहिक आवडींचा त्याग करुन इतरांना सुवार्ता सांगण्यास आपण किती सज्ज असले पाहिजे!—योहान ४:१४, १५, २८, २९.

विजय मिळविणारे

११. यहोवा कोणते अभिवचन देतो व हे शब्द प्रथमतः कोणास लागू होतात?

११ जे कोणी ते तजेला देणारे “पाणी” पितील त्यांना विजय मिळविता आला पाहिजे, असे यहोवा पुढे म्हणतो: “जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्‍या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.” (प्रकटीकरण २१:७) सात मंडळ्यांना दिलेल्या संदेशांमधील अभिवचनांप्रमाणेच हे अभिवचन आहे; यास्तव, हे शब्द अभिषिक्‍त शिष्यांना प्रथमतः लागू व्हावयास हवेत. (प्रकटीकरण २:७, ११, १७, २६-२८; ३:५, १२, २१) येशूचे आध्यात्मिक बांधव युगांपासून नव्या यरुशलेमेचा भाग बनण्याच्या विशेष हक्काची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होते. येशूप्रमाणेच, त्यांनीही विजय मिळविला तर त्यांच्या आशा पूर्ण होतील.—योहान १६:३३.

१२. प्रकटीकरण २१:७ मधील यहोवाचे अभिवचन मोठ्या लोकसमुदायाच्या बाबतीत कसे पूर्ण होईल?

१२ सर्व राष्ट्रातील मोठा लोकसमुदायही या अभिवचनाची वाट पाहून आहे. त्यांनीही मोठ्या संकटातून पार होईपर्यंत देवाची सेवा निष्ठेने करत, विजय मिळवला पाहिजे. यानंतर ‘जे राज्य जगाच्या स्थापनेपासून त्यांच्याकरिता सिद्ध केले आहे’ त्या पृथ्वीवरील वतनात ते प्रवेश करु शकतील. (मत्तय २५:३४) यांना व प्रभूची पृथ्वीवरील इतर मेंढरे जे हजार वर्षांच्या अंती झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होतात या सर्वांना “पवित्र जन” म्हटले आहे. (प्रकटीकरण २०:९) ते यहोवा देव त्यांचा निर्माणकर्ता यासोबत त्याच्या सार्वत्रिक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून पवित्र व निष्ठावान नातेसंबंधाचा आनंद घेतील.—यशया ६६:२२; योहान २०:३१; रोमकर ८:२१.

१३, १४. देवाच्या भव्य अभिवचनांचे वारस होण्यासाठी, कोणत्या चालीरिती दृढनिश्‍चियाने आम्ही टाळल्या पाहिजेत व का?

१३ या महान आशेला दृष्टिक्षेपात ठेवत असता, यहोवाच्या साक्षीदारांना भ्रष्ट होत चाललेल्या या सैतानी जगापासून शुद्ध राहणे हे किती महत्वपूर्ण ठरेल बरे! आम्ही दृढ, निश्‍चयी व ठाम असले पाहिजे की जेणेकरुन दियाबल आम्हास अशा संगतीत खेचू शकणार नाही. स्वतः यहोवा त्याचे वर्णन अशाप्रकारे करतो: “परंतु भेकड, विश्‍वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्‍यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.” (प्रकटीकरण २१:८) होय, भावी वारसदाराने ह्‍या जुन्या व्यवस्थीकरणाला अस्वच्छ केलेल्या चालिरितींना टाळले पाहिजे. विश्‍वासू राहून त्याने सर्व प्रलोभनांवर व दबावांवर विजय मिळविला पाहिजे.—रोमकर ८:३५-३९.

१४ ख्रिस्ती धर्मजगत, येशूची वधू असल्याचा दावा करते, तरी योहानाने वर्णिलेली सर्व अमंगळ कृत्ये तिच्यामध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यास्तव ती मोठ्या बाबेलच्या शेष भागासोबत सार्वकालिक नाशाप्रत जाते. (प्रकटीकरण १८:८, २१) याचप्रमाणे, अभिषिक्‍तांपैकी वा मोठ्या लोकसमुदायातील कोणीही या चालीरिती उचलतील किंवा त्यास प्रोत्साहन देण्यास सुरवात करील, त्या सर्वांना सार्वकालिक नाशाचा सामना करावा लागेल. ह्‍या कृत्यांना ते चिकटून राहिले तर, अभिवचनांचे ते वारस होऊ शकणार नाहीत. तसेच, नव्या पृथ्वीवर, जर कोणी अशी कृत्ये करण्याची सुरवात करील तर त्याचा त्वरेने नाश केला जाईल, म्हणजेच पुनरुत्थानाची कसलीच आशा नसणाऱ्‍या दुसऱ्‍या मरणात त्याला जावे लागेल.—यशया ६५:२०.

१५. विजेते या अर्थाने कोण उल्लेखनीय आहेत व कोणत्या दृष्टांताने प्रकटीकरणाला अत्युच्च कळसास नेले जाते?

१५ विजेत्यांमध्ये कोकरा, येशू ख्रिस्त आणि त्याची वधू १,४४,००० नवी यरुशलेम हे उल्लेखनीय आहेत. त्यामुळे नव्या यरुशलेमच्या उत्कृष्ट दृष्टांताने प्रकटीकरणाला अत्युच्च कळसाला नेणे किती योग्य असेल! योहान आता शेवटच्या दृष्टांताचे वर्णन करतो.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३०२ पानांवरील चित्रे]

नव्या पार्थिव संघटनेत, सर्वांसाठी आनंदी काम व संगत असेल